Tuesday, May 25, 2010

वाचाळ तर वाचाळ!



" आयुष्यभर जमा केलेल्या अनुभवांची शिदोरी म्हणजे आत्मचरित्रं! वलयांकित माणसांच्या खाजगी आयुष्यात डोकावून पाहण्याची इतरांना असलेली तीव्र इच्छा बहुधा त्यांना आत्मकथनं लिहायला भाग पाडत असावी."

आयुष्यभर जमा केलेल्या अनुभवांची शिदोरी म्हणजे आत्मचरित्रं! वलयांकित माणसांच्या खाजगी आयुष्यात डोकावून पाहण्याची इतरांना असलेली तीव्र इच्छा बहुधा त्यांना आत्मकथनं लिहायला भाग पाडत असावी. मग ती मर्लिन मन्रोच्या रंगेल आयुष्यातील ‘रोमॅन्टिक एन्काउंटर्स’ असोत किंवा आपला ‘एकटा जीव’ दादा कोंडकेची लफडी असोत. त्यांच्या आयुष्यातल्या मसालेदार घटनांमुळं लोकांना त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचा मोह अनावर होतोच. पण भारतीय उपखंडातील राजकारणी जेव्हा आत्मचरित्र लिहिण्यासाठी लेखणी हाती घेतात, तेव्हा त्या पुस्तकातील मजकुराच्या विश्वासार्हतेबद्दल ब-याचदा शंका घेतली जाते. तसं त्यांचंही आयुष्य मसालेदारच असतं. कारण राजकारणाच्या पटात सोंगट्यांची मांडामांड करताना ‘नैतिक’ म्हणता येणार नाहीत, अशा ब-याच लांड्या-लबाड्या आणि लटपटी-खटपटी त्यांनी केलेल्या असतात. आपण घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांचं समर्थन आणि स्वत:ची ‘इमेज बिल्डिंग’ या हेतूनंच भारतीय उपखंडातील राजकारणी आत्मचरित्र लिहिण्याचा खटाटोप करतात. त्यामुळं त्यांच्या लिहिण्याला साहित्यमूल्य तर नसतंच, पण ‘क्रेडिबिलिटी’ नावाची गोष्ट औषधालाही सापडत नाही. ‘स्व-अनुनय’ करणारी अशी पुस्तके राजकारण्यांनी प्रसिद्ध केली की, वाद-प्रतिवादांचा धुरळा उडतोच. भारतीय साहित्यविश्वात तशी काही उदाहरणे आहेत. नरसिंह राव यांच्या ‘इनसायडर’मध्ये बाबरी मशिदीचं प्रकरण सोडलं, तर या पुस्तकाच्या खरेपणाबद्दल फारशा शंका घेतल्या गेल्या नाहीत. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात परराष्ट्रमंत्री राहिलेले जसवंतसिंग यांच्या ‘कॉल टू ऑनर’मुळे राजकारण्यांच्या पुस्तक लेखनाबद्दल वाचकांच्या मनात असलेली उरलीसुरली विश्वासार्हताही संपली. आता तो केवळ प्रसिद्धीमाध्यमांनी चघळण्याचा विषय बनला आहे. आत्मचरित्र लिहिणं हा स्वत:च्या चुका सार्वजनिकरीत्या कबूल करण्याचा भाग आहे, असं मानण्याचे दिवस इतिहासजमा झालेत. पुस्तकाचा ‘प्लॉट’ आता राजकीय गणितं सोडवण्यासाठी वापरला जाऊ लागलाय. सुरुवात नरसिंह रावांच्या ‘इनसायडर’पासूनच करू. काँग्रेसला उतरती कळा लागली होती, तेव्हा ते पंतप्रधान बनले. अल्पमतातलं सरकार चालवण्याची कसरत करणारा संसदीय विधिमंडळातील पहिला काँग्रेसी नेता, अशी ओळख त्यांना मिळाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांना देशाचा गाडा हाकावा लागला. बाबरी मशीद पडली, ती त्यांच्याच काळात. राव यांनी मनात आणलं असतं, तर मशीद पडण्यावाचून वाचली असती, असा आरोप त्यांच्यावर होत होता. या एका प्रकरणावरून त्यांना बरीच टीका सहन करावी लागली. इतकी की, त्यांची तोपर्यंतची कारकीर्द मातीमोल ठरण्याची भीती निर्माण झाली. पंतप्रधानपद उपभोगून पायउतार झाल्यानंतर त्यांनी बाबरी मशीद प्रकरणावरून आपल्या कपडय़ांना लागलेली धूळ झटकायचं ठरवलं. ‘इनसायडर’ लिहिण्यापाठीमागचा उद्देशही तोच असावा. कारण या पुस्तकातील बरीचशी पानं या प्रकरणाला वाहिली आहेत. पण या प्रकरणाच्या झळा त्यांना इतक्या बसल्या की, त्यांना ‘अयोध्या’ नावाचं स्वतंत्र पुस्तक लिहावं लागलं. ही मशीद आपण का वाचवू शकलो नाही, याची केविलवाणी कारणं त्यांनी या तीनशे पानी पुस्तकात दिली आहेत. १९९३मध्ये त्यांच्या सरकारला संसदेत बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यानंतर त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच देऊन आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला, या आरोपाला त्यांनी ‘इनसायडर’मधून उत्तर दिले खरे! पण न्यायालयाने या प्रकरणी त्यांच्यावर ताशेरे ओढलेच. इकडे राव यांनी बाबरीपतनाच्या परिणामांची जबाबदारी घ्यायला नकार दिला, तर लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या ‘माय कंट्री, माय लाइफ’ या पुस्तकात याच गोष्टीवरून नक्राश्रू ढाळले आहेत. ‘ज्या दिवशी मशीद पडली, तो आपल्या आयुष्यातील सर्वात दु:खदायक दिवस होता,’ असं त्यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केलंय. रथयात्रा काढून हिंदुत्वाचा नारा देत फिरणा-या अडवाणींना अशी प्रांजळ (?) कबुली देताना पाहून भलेभले राजकीय विश्लेषक चाट पडले. या पुस्तकातून त्यांनी एकीकडे हिंदुत्ववाद्यांना चुचकारताना बाबरी मशीद पडल्याबद्दल तीव्र दु:खही व्यक्त केले आहे. पण हे दु:ख केवळ वरवरचेच आहे, हे त्यांच्या पुस्तकातील पुढील परिच्छेद वाचताना लक्षात येतं. त्यात अडवाणी म्हणतात, ‘सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढल्यामुळे लोकांच्या रक्तात धर्मभावना किती तीव्र प्रमाणात रूजली आहे, हे माझ्या लक्षात आलं. माझ्या या चळवळीमुळं लोकांनी काँग्रेस-कम्युनिस्टांसारख्या दांभिक धर्मनिरपेक्षतावाद्यांना नाकारलं. भाजप हाच खराखुरा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, याची त्यांना जाणीव झाली.’ राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार सहा महिने अगोदरच बरखास्त करून २००४ मध्ये निवडणुका घेऊन पुन्हा सत्तेत यायचा त्यांचा प्रयत्न फसला. ‘इंडिया शायनिंग’चा चकचकितपणा शेवटी बेगडीच ठरला, हे मात्र त्यांनी आत्मचरित्रात मान्य केलंय. अगदी अलीकडच्या काळात दोन आत्मचरित्रांनी जाणकार वाचक आणि राजकीय विश्लेषकांची फार करमणूक केली. ती म्हणजे परवेझ मुशर्रफ यांचं ‘इन द लाइन ऑफ फायर’ आणि माजी परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग यांचं ‘ए कॉल टू ऑनर’! मुशर्रफसाहेबांनी त्यांच्या पुस्तकात तर फारच धमाल उडवून दिलीय. वास्तववादी आत्मकथन कुठे संपतं आणि काल्पनिक ललित लेखन कुठं सुरू होतं, यांच्यातील धूसर सीमारेषा मुशर्रफ यांचं पुस्तक वाचताना आणखीनच अस्पष्ट होत जाते. भारतीय लष्कराने ताबारेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरात प्रवेश केला, म्हणून १९९९मध्ये कारगिल युद्ध घडलं, असा तद्दन खोटारडेपणाचा आरोप त्यांनी या पुस्तकातून केला आहे. हा एक प्रसंग उदाहरणादाखल इथे नमूद केला असला, तरी त्यांच्या खोटारडेपणाचे पुरावे देणारे अनेक प्रसंग त्यांनी या सव्वातीनशे पानांमधून रंगवले आहेत. अपवाद फक्त त्यांच्या प्रेम-प्रकरणांचा असू शकेल. जसवंत सिंग यांनी ‘ए कॉल टू ऑनर’ हे पुस्तक लिहून भाजपलाच घायाळ केलं. कंदाहार प्रकरण असो, कारगिल युद्ध असो वा गुजरात दंगली असोत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाच लक्ष्य बनवून त्यांनी शरसंधान केलं. सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असताना वाजपेयी यांच्या कार्यकाळात झालेल्या महत्त्वाच्या घटनांच्या जबाबदारीपासून स्वत:ला नामानिराळं ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या आत्मचरित्रात स्पष्टपणे जाणवतो. ही शाब्दिक कसरत साधताना जसवंतजी सपशेल आडवे पडलेले दिसतात. भारताचं परराष्ट्र धोरण आखताना भाजपचा ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ त्यांनी केंद्रस्थानी ठेवला होता, याची अप्रत्यक्ष कबुली त्यांनी पुस्तकातूनच दिली आहे. बाबरी मशिदीचे पतन आणि गुजरात दंगलींबाबत त्यांनी हळहळ व्यक्त केली असली, तरी त्यांची धार्मिक कट्टरता त्यांच्या शब्दांतून प्रतीत होतेच. ‘भारतात फक्त एकच संस्कृती नांदते, ती म्हणजे हिंदू अथवा भारतीय! या दोन नावांपैकी तिला जे पाहिजे ते नाव तुम्ही देऊ शकता,’ असं त्यांनी ‘ए कॉल टू ऑनर’मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. सक्रिय राजकारणात असणाऱ्यांना सत्य सांगण्याची जोखीम पत्करणे अवघड असते. सत्यकथन त्यांच्या कारकीर्दीच्या मुळावर येऊ शकतं. त्यामुळे जर काही लिहायचंच झालं तर ते मखलाशी करूनच! तशीही आज राजकारण्यांची परिस्थिती ‘वाचाळ बहु बडबडला’ अशीच आहे. शब्द म्हणजे त्यांच्या दृष्टीने फारच स्वस्त गोष्ट! पुस्तक खपण्यासाठी काही तरी सनसनाटी लिहायचं, झालंच तर तेही साहित्यिक ऊर्मीतून नव्हे, तर ‘सेल्फ ग्लोरिफिकेशन’साठी! याचीच खूणगाठ मनाशी बांधत राजकारणी स्वत:बद्दल लिहायला बसतात. त्यांचा संघर्षमयी जीवनप्रवास इतरांसाठी प्रेरणेचा स्त्रोत ठरेलही. पण प्रश्न विश्वासार्हतेचा आहे.

Monday, May 24, 2010

साम्राज्यवादी अहंगंडाची उद्ध्वस्त धर्मशाळा


जे. जी. फॅरेलचं चाळीस वर्षापूर्वीचं ट्रबल्सपुस्तक मुंबईतल्या अनेक प्रतिष्ठित आणि नव्या- प्रशस्त चकचकीत दुकानांमध्ये सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे आत्ताच पुस्तकावर थेट मत व्यक्त करणं वा त्याच्या निवडक भागाचा अनुवाद वाचकांसाठी देणं अशक्य आहे. मात्र पुस्तकाची ओळख करून घ्यायला विलंब नको, यासाठी ख्यातकीर्त अमेरिकन समीक्षक मेरी व्हिपल यांनी ट्रबल्सबद्दल 2003मध्ये लिहिलेल्या समीक्षालेखाचा हा मराठी अनुवाद!

साम्राज्यवादी अहंगंडाची उद्ध्वस्त धर्मशाळा

पहिल्या महायुद्धापर्यंत जगातील एकमेव आर्थिक आणि लष्करी महासत्ता असलेल्या इंग्लंडच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणा-या आयरिश जनतेच्या लढ्यावर हे पुस्तक आधारलेलं आहे. आर्यलडच्या या लढ्याला 1922नंतर फारच धार आली. आयरिश जनतेचा मुक्तिलढा जसा तीव्र झाला, तसे इंग्लंडचे राक्षसी अत्याचारही! इंग्रजांची गुर्मी आणि आयरिश स्वातंत्र्यलढ्याविषयीची बेफिकिरी यामुळे ही क्रांती अटळ ठरली. आर्यलड- इंग्लंडमध्ये चाललेल्या लढ्यातून सर्वसामान्य जनता बेघर होत गेली. जे. जी. फॅरेल यांनी ट्रबल्समधून हाच विषय हाताळला आहे.

आर्यलडमधल्या वेक्सफोर्ड परगण्यातले 300 खोल्यांचे हॉटेल आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात ट्रबल्सफुलत राहते. या हॉटेलचा मालक एडवर्ड स्पेन्सर नामक गृहस्थ कट्टर प्रॉटेस्टंटपंथी आणि परंपरावादी मतांचा पगडा असलेला आहे. आपण फारच दयाळू आहोत, असा स्पेन्सरचा समज आहे. स्पेन्सर आपल्या हॉटेलमध्ये भाडय़ाने खोल्या घेऊन राहणा-या व्यक्तींकडून त्यांची इंग्लंडच्या राजाप्रती श्रद्धा आणि निष्ठा असल्याचं शपथपत्र लिहून घेऊ इच्छित असतो! पण या भाडेकरूंकडून त्याला साफ नकार मिळतो. पहिल्या महायुद्धाच्या जखमा हॉटेलच्या वास्तूमध्ये ठायीठायी, तसंच तिथल्या माणसांमध्येही जाणवत असतात. युद्धकाळात आणि युद्धाची धामधूम संपल्यानंतर हॉटेलच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्याची इतकी परवड झालेली आहे की, ते आता देखभालीच्याही पलीकडे गेले आहे. ‘आयरिश क्रांतीची सुरुवात झाल्यामुळे ब्रिटिश पर्यटकांनीही आर्यलडकडे पाठ फिरवली आहे. पर्यटकांचा अभाव आणि देखभालीकडे दुर्लक्ष, या दोन गोष्टींमुळे हॉटेलला उद्ध्वस्त धर्मशाळेचे स्वरूप आले आहे. कुणीही राहायला तयार नसलेल्या या हॉटेलात काही माणसं मात्र विनातक्रार राहतायत. भाडं भरण्याची क्षमता नसलेल्या वयोवृद्धांचा त्यात समावेश आहे. आयरिश क्रांतीचे नेतृत्व असलेल्या शिन फेनपक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हॉटेलच्या परिसरात हल्ले होताहेत. पण किरकोळ दंगलींपेक्षा त्यांचे स्वरूप मोठे नाही. या ऐकिव बातम्या हॉटेलमध्ये राहणा-यांच्या कानांवर पडतात. पण त्यांना कुणीही क्रांतिकारक दिसत मात्र नाही.

अशा वातावरणात मेजर ब्रँडन आर्चर हॉटेलमध्ये येतो. युद्धात सहभागी झालेल्या या लष्करी अधिका-याच्या मनात अनेक भावनिक कल्लोळ उठलेले असतात. रुग्णालयात उपचार घेऊन बाहेर पडलेला आर्चर हे भावनिक धक्के अद्यापही पचवण्याचा प्रयत्न करत आयुष्य जगत असतो. ‘मॅजेस्टिकनावाच्या या हॉटेलात तो आपल्या प्रेयसीच्या शोधात आलेला असतो. पण ती किंवा तिचे कुटुंबीय, यांच्यापैकी त्याचं स्वागत करायला तिथं कुणीच उपस्थित नसतं. आर्चर क्लॉस्ट्रोफोबियानं ( बंद असलेल्या ठिकाणाबद्दल वाटणारी भीती) पछाडलेला असतो. त्याही परिस्थितीत तिच्या शोधात तो तीन वर्ष तिथं राहतो. या तीन वर्षातली रणधुमाळी हा ट्रबल्सचा मुख्य कथाविषय आहे.

फॅरेलनं मॅजेस्टिकहॉटेलचे रूपक हे ब्रिटनच्या राणीच्या- ‘हर मॅजेस्टी क्वीन ऑफ इंग्लंडच्या आर्यलडवरील अनिर्बंध सत्तेसाठी वापरलं आहे. वाचकांना हॉटेलचे वर्णन वाचताना ते लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आर्यलडच्या आग्नेय दिशेला असलेले हे हॉटेल इंग्लंड आणि वेल्सला अगदी सामोरं असं उभं राहिलं आहे. आयरिश समुद्रावरून येणारं वारं, वादळ आणि लाटांनी या हॉटेलच्या वास्तूला प्रचंड धक्के बसत आहेत. तुटलेल्या खिडक्या, गळकं छप्पर आणि भिंतींमधून वाढलेला झाडोरा, अशी या हॉटेलची अवस्था झाली आहे. हॉटेलमधल्या एकमेव बारचं नावही इम्पिरियलअसं आहे. त्यात उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. या वर्णनातून ब्रिटिश साम्राज्याला लागलेली घरघर उभी करण्याचा प्रयत्न फॅरेलनं केला आहे. हॉटेलची ही अवस्था त्यानं अतिशय खोचक आणि विनोदी ढंगात सादर केली आहे. आर्चरची खोली बदलण्याची धडपड, एडवर्डचं वागणं, हॉटेलमध्ये उंदरांचा झालेला सुळसुळाट, या सा-या रूपकात्मक गोष्टी फॅरेलनं ब्रिटिश साम्राज्यवादाचं वर्णन करण्यासाठी आणि त्यावर कोरडे ओढण्यासाठी अतिशय चपखलपणे वापरल्या आहेत. असल्या वर्चस्ववादी शक्तींच्या रेट्यामुळे स्वत:चंच घर राहण्यासाठी कसं अयोग्य होत जातं, याचं विषण्ण करणारं वर्णन ट्रबल्समध्ये आहे.

हा लढा म्हणजे संस्कृतीच्या प्राथमिक अवस्थेत जगणा-या गावंढळ आयरिशांना सुसंस्कृत करणं, ही सुधारलेल्या ब्रिटिशांची नैतिक जबाबदारी आहे, असा अनेकांचा समज आहे. (हाच तो व्हाइट मॅन्स बर्डनचा अहंगंड!) तसं समजणा-या हॉटेलमधल्या काही भाडेकरूंविषयीचा प्रसंग रंगवताना फॅरेलच्या लिखाणाला धार चढते. पुस्तकाचा मोठा प्लॉट छोट्या छोट्या उपकथांमधून उलगडत जाताना तो जागतिक परिप्रेक्ष्यात घडणा-या घटनांचा उल्लेख करत राहतो. पहिल्या महायुद्धानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मिळालेले बळ, दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांचा संघर्ष, रशियातील बोल्शेव्हिकांचा हल्ला, शिकागोतल्या दंगलींचा संबंध आयरिश क्रांतीशी जोडताना त्याच्या प्रतिभेचा आविष्कार दिसतो. त्याच्या सीज ऑफ कृष्णापूरला जरी 1973मध्ये बुकर मिळालं असलं, तरी ट्रबल्सही त्याची सर्वोत्तम साहित्यकृती आहे. आयरिश स्वातंत्र्य चळवळीमागील भावनिक मुद्दे पूर्णपणे बाजूला सारत वाचकाला तो ब्रिटिश आणि आयरिश या दोघांच्याही बाजू कुठलाही पक्षपात करता दाखवतो, हेच त्याचे लेखक म्हणून यश आहे।

हरवलेलं बक्षीस..

सन 1971 पासून अतिप्रतिष्ठित बुकरपुरस्कारांसाठीच्या नियमांत बदल झाले. नव्या नियमांनुसार, चालू वर्षात जी पुस्तके प्रकाशित होतील, त्यांच्यापैकीच एक पुस्तक बुकरमिळण्यास पात्र ठरले. त्यामुळे 1970मध्ये प्रकाशित झालेली पुस्तके आपोआप पारितोषिकांसाठी अपात्र ठरली. जे. जी. फॅरेलचं ट्रबल्सही त्यातलंच. 1973मध्ये त्याला सीज ऑफ कृष्णपूरसाठी बुकर मिळालं. पण पुढली 40 वर्ष ट्रबल्समात्र पारितोषिकापासून वंचित राहिलं. सत्तरीतला हा अन्याय दूर करण्याचे ठरवीत बुकर समितीने 1970मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी एक सर्वोत्तम पुस्तक निवडून त्याला लॉस्ट मॅन बुकर प्राइझद्यायचं ठरवलं. 1070मधल्या सहा पुस्तकांतून फॅरेलच्या ट्रबल्सनं आजच्या वाचकांची सर्वाधिक पसंती मिळवली.

अवघ्या 44 वर्षाच्या आयुष्यात (जन्म : 25 जानेवारी 1935, मृत्यू : 11 ऑगस्ट 1979) जे. जी. फॅरेल यांनी साम्राज्यवादाचा अस्त कसा अटळच होता, हे सांगणा-या तीन कादंब-या लिहिल्या. या त्रयीपैकी ट्रबल्सही फॅरेल यांच्या थेट अनुभवांशी अधिक जवळची, त्यामुळे अधिक अस्सल होती. फॅरेल हेही आयरिश होते.

चाळीस वर्षापूर्वीचं हे पुस्तक मुंबईतल्या अनेक प्रतिष्ठित आणि नव्या- प्रशस्त चकचकीत दुकानांमध्ये सध्या उपलब्ध नाही. ‘मागवूअसे वायदेच सर्व पुस्तकविक्रेत्यांकडून प्रहार-बुकमार्कला ऐकावे लागले. त्यामुळे आत्ताच पुस्तकावर थेट मत व्यक्त करणं वा त्याच्या निवडक भागाचा अनुवाद वाचकांसाठी देणं अशक्य आहे. मात्र पुस्तकाची ओळख करून घ्यायला विलंब नको, यासाठी ख्यातकीर्त अमेरिकन समीक्षक मेरी व्हिपल यांनी ट्रबल्सबद्दल 2003मध्ये लिहिलेल्या समीक्षालेखाचा हा मराठी अनुवाद!