Saturday, April 30, 2011

कोऽहम ते सोऽहम!


पाउलो कोएलोची ‘ब्रिडा’ ‘स्व’च्या शोधात भांबावून गेलेल्या दुर्मीळ जमातीचं प्रतिनिधित्व करते. कोएलोने नव्वदच्या दशकात ‘ब्रिडा’ लिहिली. पण अजूनही ‘बेस्टसेलर’ची यादी ‘ब्रिडा’शिवाय पूर्ण होत नाही. अटळ दु:खातूनच प्रवासाचा सुखी शेवट होतो, हे सांगणा-या ‘ब्रिडा’ची ओळख.

सा-याच शंकांची अशी मागू नको तू उत्तरे
असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे!’

जगण्यातलं अर्थवाहीपण शोधण्याचा प्रयत्न करणा-या समस्त शंकासुरांना उद्देशून कविवर्य सुरेश भटांनी या ओळी लिहिल्या असाव्यात. प्रश्नांच्या वावटळीत सापडून भांबावून जायला होतं, पण शंका काही पाठ सोडत नाहीत. एखादा मार्ग निवडून मुक्कामाच्या ठिकाणी जायला निघावं, निम्मं अंतर कापून जावं, तेव्हा प्रवासातला फोलपणा लक्षात यायला सुरुवात होते. दिशाच चुकल्यानं भलत्याच गावी पोहोचल्याचं दु:ख काळीज कुरतडून टाकतं. पण म्हणून माणसानं जगण्याचा प्रवास अर्धवटच टाकून दिलाय, असं होत नाही. अनेक कोलंबस वादळात भरकटतात. त्यांची नाव अगदी नव्याको-या जगाच्या किना-याला लागते, तरीही सोन्याचा धूर ओकणारा प्रदेश न सापडल्याचा अपयशसोहळा त्यांचं मन साजरा करीत राहतं. एखाद्याच भाग्यवान मॅगेलॉनला अमेरिकेच्या रूपानं ‘नवे जग’ सापडल्याचा साक्षात्कार होतो. असे दर्यावर्दी बनायची खुमखुमी अनेकांत असते. एवढीशी नाव आणि अडीच हात लांब वल्ह्यांवर विसंबून ही मंडळी स्वत:ला अज्ञाताच्या महासागरात लोटून देतात. जगण्याचा अर्थ लावू पाहताना ‘स्व’चाही शोध घेण्याची ऊर्मी प्रबळ बनते. ती इतकी की, वल्हं तुटो अथवा नाव बुडो, ‘बेडा पार’ होईपर्यंत ते लाटा कापून पुढं जायचं थांबवीतच नाहीत. हा ‘कोऽ हम’पासून ‘सोऽहम’पर्यंतचा प्रवास करणं, हेच मुळात एक आनंदनिधान असतं. ‘मी कोण’ याचा शोध घेणा-यांना अपरिहार्यपणे येणारं एकाकीपण घाबरवून टाकतं. ‘त्यांनी’ निवडलेला रस्ता ओसाडगावाकडे जातो, असं ठरवून ‘त्यांचे’ सहप्रवासी तथाकथित राजमार्गाची निवड करतात. त्यामुळे ‘स्व’चा धांडोळा घेणारे स्वाभाविकपणे एकटे पडतात. पण ज्याला बाकीच्यांनी राजमार्ग ठरवलं, ती केवळ मेंढरांची पायवाट होती, हे समजलं की त्या एकटेपणाचा पुन्हा-पुन्हा अनुभव घ्यावासा वाटतो. अशाच अनुभवांना कादंबरीचं रूप देत पाउलो कोएलो या ब्राझीलियन लेखकाने नव्वदच्या दशकात ‘ब्रिडा’ लिहिली. अजूनही ‘बेस्टसेलर’ची यादी ‘ब्रिडा’शिवाय पूर्ण होत नाही. जादुविद्या शिकण्याच्या ध्यासानं पछाडलेली ही ब्रिडा नावाची आयरिश मुलगी. जादूच्या माध्यमातून तिला दैवी ताकदींबद्दल शिकायचं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आयुष्य समजून घ्यायचं होतं. उपजत जिज्ञासेने तिच्या बुद्धीला तर्कशुद्धतेची कठोर धार आलेली. त्यामुळे आपोआप समवयस्कांच्या कळपापासून अलग पडलेली. आयुष्याचं ईप्सित साध्य करण्यासाठी मार्ग दाखवणारे अगदी टोकाच्या विचारसरणीचे दोन शिक्षक तिला भेटतात. मॅगस आणि विक्का नामक या दोघा शिक्षकांनी आपापल्या मार्गाने जाऊन आयुष्याबद्दलचं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं असतं. ‘स्व’च्या शोधात भांबावून गेलेल्या दुर्मीळ जमातीचं ब्रिडा प्रतिनिधित्व करतं. आयुष्याचा खरा अर्थ शोधण्याच्या प्रक्रियेत ‘सोलमेट’ सापडणं किती आवश्यक आहे, हे विक्का तिला समजावून सांगते. ‘सोलमेट’ म्हणजे सुख-दु:खातला खरा जोडीदार! असं फक्त परिकथांमध्येच घडतं, हे मनाला बजावीत ब्रिडा विक्काला खुळचट ठरवते. माणसं ज्ञान, पैसा आणि सत्ता यापैकी एका ध्येयाच्या पाठीमागे धावत राहतात. पण ते खरंच त्यांचं उद्दिष्ट नसतं. ‘सोलमेट’ सापडला की असल्या उद्दिष्टांना अर्थ उरत नाही. जिज्ञासूपणाने आपल्या शिक्षकांचा असा उपदेश ऐकणाऱ्या ब्रिडालाही शेवटी तिचा ‘सोलमेट’ सापडतो. गमतीची किंवा दु:खाची गोष्ट ही की, हा ‘सोलमेट’ तिचा ‘बॉयफ्रेंड’ नसतो. ब्रिडाला ‘सोलमेट’ सापडण्याचा हा प्रवास कशी जीवघेणी वळणं घेत जातो, हे कादंबरी वाचूनच समजेल. स्वत:चा शोध घेण्याची आस, ही जगणा-या प्रत्येक व्यक्तीला मिळालेली दैवी देणगी असल्याचं विक्का आणि मॅगस तिला अप्रत्यक्षपणे सुचवतात, मात्र हा शोध तिने स्वत:च्याच बळावर पूर्ण करावा, अशी त्यांची इच्छा असते. पाउलोने निसर्गपूजकांच्या विस्मृतीत गेलेल्या धार्मिक परंपरांचा खुबीने वापर करून घेत हा शोध ‘ब्रिडा’मधून प्रवाहीपणे रेखाटला आहे. ब्रिडा! आयुष्य अगदी समरसून जगणारी मुलगी. नवेपणाच्या उत्साहानं अनेक अनुभवांना ती सामोरी जाते. ध्येय साध्य करण्याचे अनेक मार्ग तिला दिसत असतात. पण ती यापैकी कुठल्याही मार्गावरून चालायला कचरते. संकटांना घाबरून अजिबातच नव्हे! जर एक मार्ग निवडला तर इतर मार्ग कायमचे बंद होतील, ही भीती तिला सतावते. ब्रिडाच्या अपयशी प्रेमप्रकरणांच्या बाबतीतही हीच त-हा! त्यामुळे अपेक्षाभंगाचं दु:ख तिनं कायम सोसलेलं. पण तरीही ती नव्या अनुभवांच्या ओढीने पावलं पुढे टाकीत राहते. अटळ दु:खातूनच तिच्या प्रवासाचा सुखी शेवट होतो आणि ब्रिडा एका नव्या आयुष्यासाठी तयार होते.

ढगभर शब्द..!


"जपान-ऑस्ट्रेलियात बालपण घालवलेला ‘लंडन ऑब्झव्‍‌र्हर’चा ट्रॅव्हल करस्पॉन्डन्ट अलेक्झांडर फ्रेटरला भारतातील मान्सूनचं ष्टद्धr(7०)तुचक्र समजावून घेण्याची जबरदस्त जिज्ञासा। या जिज्ञासेतून तो भारतात आला आणि त्याने मान्सूनचा केरळपासून चेरापुंजीपर्यंत पाठलाग केला। हा प्रवास ‘चेसिंग द मान्सून’च्या रूपानं शब्दबध्द झाला आहे."



मान्सून आलाय! पण नेहमीसारखा गर्जत आणि वाजत-गाजत नाही. खुरडत-खुरडत तो मोठ्या कष्टाने पावलं टाकतोय. लोकांना त्याचं दर्शन व्हायला लागलंय. पाणीकपातीनं धास्तावलेला शहरातला माणूस धरणं कधी भरणार, याची वाट पाहतोय. तर चार महिने कोरडी पडलेली माती वापसा कधी धरणार, याचा घोर शेतक-याला जाळतो आहे. नुसत्याच दाटून येणा-या काळ्याशार ढगांनी भरभरून रीतं व्हावं, यासाठी महादेवाला साकडं घातलं जातंय. इतकं आपलं आणि त्याचं जिवा-शिवाचं नातं! पाच हजार वर्षाची आपली भारतीय संस्कृती घडवण्यात मान्सूनइतका दुसरा कशाचा संबंध नसेल. प्रत्येक परंपरागत विधीतून तो डोकावतोच. हे अद्भुत ऋतुचक्र समजावून घेण्यास प्रत्येक जिज्ञासू उत्सुक असतो. ‘लंडन ऑब्झव्‍‌र्हर’चा ट्रॅव्हल करस्पॉन्डन्ट अलेक्झांडर फ्रेटर त्याच उत्सुकतेनं भारलेला! बालपणीचा बराचसा काळ जपान-ऑस्ट्रेलियात घालवलेल्या फ्रेटरने आपल्या वडिलांप्रमाणेच चेरापुंजीचा पाऊस अनुभवण्याचं स्वप्न पाहिलेलं असतं. त्याचं हे स्वप्नच ‘चेसिंग द मान्सून’च्या रूपानं शब्दबध्द झालंय. अंदमानात मान्सून जन्म घेतो. केरळमध्ये भारतीय भूमीवरचं पहिलं पाऊल टाकतो. मग कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राला भिजवत उत्तर भारतात प्रवेश करतो. त्याअगोदर गुजरात, राजस्थानचं वाळवंट पावसानं न्हाऊन निघतं. मग तो भारतभर पसरतो. तिथून मुसंडी मारत तो थेट ईशान्येच्या चिंचोळ्या राज्यांत घुसतो. आपल्यासोबत आणलेलं ढगांचं भारंभार ओझं मेघालयातल्या चेरापुंजीवर आदळतो. इथं या नैऋत्य मोसमी वा-यांचा ‘क्लायमॅक्स’ अनुभवायला मिळतो. इतका की, जगात इतरत्र कुठेही एवढा धो-धो पाऊस बरसत नाही. फ्रेटर महाशय केरळपासून चेरापुंजीपर्यंतचा प्रवास करायचा ठरवतात, तोही मान्सूनबरोबरच! पण या प्रवासात साथ करायला त्याचं शरीर अजिबात तयार नव्हतं. कारण या सफरीचा निर्णय घेण्यापूर्वीच अगोदरच्या आठवड्यात तो भारताच्या उंब-याला पाय लावून परत पाठीमागे इंग्लंडला फिरलेला असतो. मध्ययुगातला ‘सिल्क रूट’ पाहण्याच्या अनिवार इच्छेने तो पाकव्याप्त काश्मिरात भटक-भटक भटकला. मानेची आणि पाठीच्या कण्याची वाट लावून घेतली. सूर्यप्रकाशात चमचमणा-या हिमालयाच्या राकापोशी पर्वतरांगा पाहून पलीकडल्या भारतात जाऊनच यावं, ही इच्छा त्याच्या मनात परत बळ धरते. सारं दुखणं विसरायला लावते. तिथून भारतात परतण्याचा बेत आखत असताना पाठीच्या दुखण्यानं आपली पाठ धरली असल्याचं त्याला जाणवतं. आपल्याला ‘मल्टीपल स्क्लेरॉसिस’ झालाय की काय, या भीतीपोटी लंडनच्या नॅशनल हॉस्पिटलमध्ये तो दाखल होतो. रुग्णालयात विश्रांती घेत असतानाच त्याला एक भारतीय जोडपं भेटतं. त्यांच्या गप्पांतून निघालेला ‘मान्सून राग’ त्याचं भारताविषयीचं आकर्षण पुन्हा जागृत करतो. दुखणं बरं झालेलं नसतानाही चंबुगबाळं आवरून भारताची वाट धरतो. केरळात पोहोचतो. भारतात आल्यानंतरचं आणि मान्सूनच्या आगमनापूर्वीचं चित्र तो पुस्तकातून उभं करतो, ते थेट एका अस्सल भारतीयाच्या नजरेतून! मान्सूनचा अंदाज वर्तवणा-या सतराशे साठ परंपरा त्याच्या पुस्तकातून ओसंडताना दिसतात. वातावरणात होत असलेले बदल तेथील बारीक-सारीक सांस्कृतिक संदर्भासह तो पुस्तकात उभे करतो. मान्सूनची वेळ चुकते, तसा मल्याळी लोकांच्या काळजाचा ठोकाही! स्थानिक वृत्तपत्रांमध्ये मान्सूनच्या प्रगतीबद्दल येणारी वर्णनं त्याच्या पुस्तकातून ठासून भरली आहेत. पण तो केवळ पुस्तकासाठी पूरक तपशील म्हणूनच या कात्रणांचा वापर करत नाही. येथील लोकांची परिस्थिती आणि मन:स्थिती याचं सही सही विश्लेषण या कात्रणांवरील त्याच्या टीका-टिप्पणीतून दिसतं. मान्सूनच्या विलंबाकडे तो नुसत्याच वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत नाही. जर असे झाले असते, तर या दृष्टीमुळे लेखनात येणारा रखरखीतपणा त्याच्या पुस्तकातून खटकला असता. पण शतकानुशतके चालत आलेल्या आणि गावच्या पारांवर चवीनं चघळल्या जाणा-या मान्सूनविषयीच्या दंतकथांचं तो ‘चेसिंग द मान्सून’मधून दर्शन घडवतो. मग ते पुस्तक केवळ माहितीपर अगर प्रवासवर्णनपर न राहता त्याला नर्मविनोदी बाजानं सजवलेल्या ललितलेखनाचं रूपडं मिळतं. ब्रिटिश विनोदाला असलेला शिष्टपणाचा बाज आणि त्याने वापरलेल्या अघळपघळ भारतीय कथांतून सहजतेनं येणारी रंजकता, यांच्या मिश्रणातून पुस्तकातील निवेदन एका लयबद्ध तालात पुढं सरकत राहतं. बंगळूरुनजीकच्या एका गावात वरुणराजाला प्रसन्न करून घेण्यासाठी पुरोहितांच्या सल्ल्यानुसार यज्ञ आयोजित केला जातो. त्यांच्यावर दक्षिणेचा भरभरून पाऊस पाडण्यात येतो. या यज्ञात भरमसाट तूप, खंडीभर कापूर, बराचसा सुकामेवा, असा बराच जंगी बार उडवून दिला जातो. या महागड्या पूजेने वरुण प्रसन्न होतो. पाऊस पडतो, पण तिथून काहीशे मैल अंतर असलेल्या दूरवरच्या खेडेगावात! खर्च केलेल्यांचे खिसे रिकामे होतात आणि गावही कोरडं राहतं. अशा प्रकारची वर्णनं करताना फ्रेटरच्या टिप्पणीतून आपल्या अनावश्यक प्रथांविरोधात व्यक्त होणारी उपरोधाची धार भारतीय वाचकाला बोचत राहते. पण सगळेच मार्ग खुंटल्यावर स्वत:ला तारून नेण्यासाठी सर्वशक्तिमान ईश्वरी शक्तीलाच शरण जाण्याचा रस्ता श्रद्धाळू निवडतात. तो नुसता अंधविश्वास असत नाही किंवा पूर्णाशाने श्रद्धाही! याहून जास्त तो अगतिकतेचा भाग असतो, हे फ्रेटर इथे विसरतो. ज्यांची शेती आणि पर्यायाने जीवन पावसावरच अवलंबून आहे, ते देवाची प्रार्थना करण्याशिवाय आणखी काय करू शकतात? पावसाने हजेरी लावल्यानंतर फ्रेटरचा चेरापुंजीसाठी प्रवास सुरू होतो. या सफरीची पुस्तकात येणारी वर्णनं त्याने केवळ मैलाचे दगड मोजण्याइतकी आणि इतिहास-भूगोल सांगण्यापर्यंत मर्यादित ठेवलेली नाहीत. पाऊस तर आला. पण दरवर्षी बिघडत चाललेल्या मान्सूनचं घड्याळ पुन्हा ताळ्यावर कसं आणायचं, त्याच्यासाठी भारतीयांकडून काय प्रयत्न केले जाताहेत, याचाही तो शोधक नजरेनं वेध घेतो. या बाबतीत सरकारी पातळीवरची अनास्था पाहून तो चरकतो. पण कवयित्री कमला दास आणि त्यांच्यासारखेच इतर बरेच जण पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी झटताहेत, हे पाहून त्याला जरा बरंही वाटतं. पण तो तिथं एका पानापलीकडे जास्त रेंगाळत नाही. हौशी मुसाफिराचा पिंड असलेला फ्रेटर नंतर पुन्हा प्रवासाच्या रंगीत-संगीत आठवणींत मश्गुल होतो. कन्याकुमारी, कोवालम, गोवा, मुंबई, दिल्ली आणि शेवटी चेरापुंजी या प्रवासादरम्यान त्याला भेटलेली असंख्य लहान-मोठी ठिकाणं आणि तिथल्या माणसांच्या आठवणी भारतभर पसरत चाललेल्या मान्सूनप्रमाणेच वाचकाची सोबत करतात. लहानपणापासून उराशी बाळगलेलं चेरापुंजीच्या पावसात भिजायचं फ्रेटरचं स्वप्न पूर्ण होतं. मान्सूनविषयीचं अपार आकर्षण त्याला असा प्रवास करण्यास भाग पाडतं. त्याच्या दृष्टीने मान्सून हा अब्जाधीश आहे, तर युरोपचं हवामान एखाद्या भिका-याचं पोर! युरोपातल्या हवामानाचा दिनक्रम एखाद्या मध्यमवर्गीय कारकुनासारखा असतो, त्याचं सगळं काही विशिष्ट वेळेत आणि ठराविक चाकोरीतच! पण मान्सूनचं तसं नाही. तो त्याच्या मनाचा राजा आहे, एखाद्या लक्ष्मीपुत्रासारखा! लहर आली, तर पॅरिसमधला मुक्काम हलवून थेट विमानात जाऊन बसेल ते लंडनमध्ये दुपारचं जेवण करण्यासाठी!!

इतिहासातलं हरवलेलं पान!




image

सोळाव्या शतकात राजस्थानात घडणारी ही कहाणी. कादंबरी इतिहासात घडते, तिचा विषयही सनातनी, पण परिणाम मात्र आजचा! किरण नगरकर यांनी ‘ककल्ड’मधून दाखवलेल्या मानवी जीवनातील विसंगती वाचकाला बेचैन करून सोडतात.

रणांगणात पाठ फिरवायची नाही, हा राजपुतांचा बाणा.. राजपुतान्याची परपंरादेखील अशाच हुतात्म्यांचे पोवाडे गाणारी! शत्रूला मारता-मारता युद्धभूमीवरच प्राण सोडण्यातच नरजन्माचं सार्थक असतं, हे इतिहासानं राजपुतांच्या रोमा-रोमात भिनवलेलं! सोळाव्या शतकाचा तो काळही त्याला अपवाद नव्हता. राजपूत राज्यांच्या संघाचं नेतृत्व करणारं मेवाड हे बलिष्ठ राज्य आहे. महापराक्रमी राजा संग मेवाडचे सम्राट आहेत. हा एक असा राजा, ज्याने कुठल्याही लढाईत पराभव पाहिला नव्हता आणि अशी कुठलीही लढाई नव्हती, जी तिच्यातल्या हातघाईच्या खुणा महाराणा संगांच्या शरीरावर उमटवायला विसरली नव्हती. लढाईतल्या घावांनी ठिकठिकाणी मोडलेल्या, पण ताठ कण्यानं चालणा-या महाराणा संगांना राजस्थानी आख्यायिकांनी अजरामर केलं आहे. अशा नरपुंगवाच्या पोटी जन्म घेतलेल्या युवराजाचं काळाच्या पुढचं पाहणं! जे समजणं मेवाडच्या सेनापतींच्या आणि जनतेच्या आवाक्याबाहेरचं होतं. किरण नगरकर यांची ‘ककल्ड’ कादंबरी फक्त हाच इतिहास चिवडत बसत नाही. कारण ‘ककल्ड’ तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेणारी केवळ बखर नाही. मानवी जीवनातली गुंतवळ सुटी करून तिची संगती लावण्याचा प्रयत्न नगरकरांनी पूर्वीच्या कादंब-यांतून ताकदीनं केला आहे. ‘ककल्ड’चाही तोच उद्देश आहे. महाराणांच्या गादीचा वारस आणि मेवाडचा युवराज, सतत सावलीसारखं त्याचं रक्षण करणारा मित्र मंगल, मंगलची आई आणि युवराजाची दाई कौसल्या, पतीऐवजी कृष्णावरच प्रेम करणारी युवराजाची पत्नी, महाराणा संगांच्या राणीवशातली पाताळयंत्री राणी कर्मावती, तिचा तापट डोक्याचा सत्ताकांक्षी पुत्र विक्रमादित्य, बृहन्नडा नामक कर्मावतीचा विश्वासू हिजडा सल्लागार, युवराजावर प्रेम करणारी लीलावती अशा ताकदवान व्यक्तिमत्त्वांसह अनेक लहान-मोठ्या पात्रांमध्ये नगरकरांनी ‘ककल्ड’ला गुंफलं आहे. युवराजाला केंद्रस्थानी ठेवून राजगादीसाठीचा संघर्ष, भावा-भावांतील असूया, परकीय आक्रमणांचं भय, अंतर्गत राजकारण, कौटुंबिक असमाधान आणि खुद्द युवराजाच्या प्रामाणिक हेतूंबद्दल आप्तस्वकीयांच्या मनातला संशय अशा व्यापक पटलांवर कादंबरीतल्या घटना घडत राहतात. वाचकाला पुन्हा-पुन्हा विचार करायला भाग पाडतात. ‘ककल्ड’मधून सातत्यानं अधोरेखित होत राहते, ती जीवनातली विसंगती.. irony! युवराजाच्या पत्नीनं स्वत:ला निळ्या मुरलीधराच्या पायी वाहिलेलं आहे. कृष्ण हाच तिच्या जीवनाचं सार आणि सर्वस्व आहे. ती त्यालाच आपला पती मानते, युवराजाला नाही. पती-पत्नी म्हणून दोघांमध्ये कुठलेही व्यवहार ही हिरव्या डोळ्यांची राजकुमारी त्याला करू देत नाही. परिणामी मेवाडची जनता युवराजाला षंढ म्हणून हिणवते. ज्याला स्वत:चं पौरुषत्व सिद्ध करता येत नाही, तो राज्यकारभार आणि लढाईत नेतृत्व काय करणार? म्हणून पदोपदी त्याचा पाणउतारा. अशा कंडय़ा पिकवण्यात त्याची सावत्र आई कर्मावती आणि तिचा पोरगा आघाडीवर. चेहरा निर्विकार ठेऊन युवराज आपल्यावर सोपवलेलं काम करत असतो. राजकारणाची त्याची जाण इतर कुणाहीपेक्षा जास्तच तीक्ष्ण आहे. युद्धापेक्षा शांतीचा पुरस्कर्ता असलेल्या युवराजाला राज्याची तिजोरी विनाकारण लढाईत रिकामी करण्यापेक्षा मेवाडची पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी कारणी लावायचीय. युद्ध हा कायमचा तोडगा कधीच असू शकत नाही, हे त्याला कळलंय. तो ते सांगतोय. पण त्याच्या कपाळावर बसतो, तो भ्याडपणाचा शिक्का. चारण आणि भाटांच्या अतिरंजक कथांवर पोसलेली राजपूत मनं शांतीचा मार्ग स्वीकारण्यास कधीच तयार होत नाहीत. पारंपरिक युद्धतंत्रात बदल करायची त्याची इच्छा असते. माघार घ्यायची कला तो आपल्या सैनिकांना शिकवू पाहतो. सुरुवातीला तो सेनापतींच्या हेटाळणीचं लक्ष्य बनतो. इडरच्या लढाईत त्याचा नवा युद्धप्रयोग यशस्वी होतो. राजपुतांच्या सैन्याची अजिबात हानी न होता ते घवघवीत यश संपादन करतात, तेही पूर्वीच्या पराभवाचं दामदुप्पट उट्टं काढून! त्याचे सैनिक त्याला डोक्यावर उचलून घेतात. पण गनिमी काव्याचे युद्ध पसंत न पडलेल्या मेवाडच्या जनतेकडून त्याचं स्वागत होतं, ते काळे बावटे दाखवून! गनिमी कावा म्हणजे भेकडपणा. तो राजपुतांच्या दृष्टीने लांच्छनास्पद! नगरकरांनी मेवाडचा इतिहास या कादंबरीतून छोट्या-मोठ्या तपशिलांसकट उभा केला आहे. कादंबरीला जरी ऐतिहासिक पार्श्वभूमी असली, तरी विषय मात्र सनातन आहेत. स्वार्थाने बरबटलेले व्यवहार, स्त्रीवरील मालकी हक्काची भावना, प्रेमाचं खरं स्वरूप, युद्धाची अव्यवहार्यता असे आदिम कालापासून चालत आलेले विषय या कादंबरीत मांडले गेले आहेत. यात भावून जाते जाते, ती युवराजाला आपलं राज्य परकीय शत्रूंपासून वाचवण्याची कळकळ, मेवाडला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवण्याची मनीषा, आपल्या कर्तृत्वाने पराक्रमी पूर्वजांच्या पंगतीत बसण्याची महत्त्वाकांक्षा!! पण वेळ विपरीत असते. दुर्दैवाने त्याने टाकलेले सर्व फासे उलटे पडत जातात. कादंबरी वाचताना आपण बेचैन होत राहतो, ते त्याच्या भागध्येयात हळूहळू अटळपणे येणा-या परवडीने! मीरेच्या कृष्णप्रेमाच्या कथा भारतातल्या घरा-घरात भक्तिभावाने श्रवण केल्या जातात. महाराणा संगांच्या आणि इतर पराक्रमी राजपुतांच्या शौर्यगाथा किमान राजस्थानातल्या पोरा-सोरांच्या तरी तोंडावर असतात. पण मीरेच्या नव-याचा साधा उल्लेखही इतिहासातून डोकावत नाही. मीरेचा नवरा आणि महाराणा संगांचा ज्येष्ठ पुत्र, हा इतिहासातलं हरवलेलं एक पान आहे. तेवढं एकच पान ‘ककल्ड’मधून जागोजागी अस्वस्थपणे फडफड करीत राहतं. युवराजाच्या प्रत्येक कृतीतून कृष्ण डोकावतो. कृष्णाने दाखवून दिलेल्या पाऊलवाटांवरूनच तर युवराज चाललेला असतो, जरी तो कृष्णाला प्रतिस्पर्धी समजत असला तरी! हाच कृष्ण आपल्या आणि बायकोच्या नात्यामध्ये सलणारा काटा वाटत असला तरी! ऐन रणांगणातून पळ काढणाऱ्या कृष्णाला नाही का ‘रणछोडदास’ म्हणून हिणवलं गेलं? शत्रू जर आपल्यापेक्षा शिरजोर असेल, तर निष्कारण वाघाच्या जबड्यात तोंड घालण्यात काय हशील आहे? त्यापेक्षा बुद्धिचातुर्याने आपल्या आहे, त्या शिबंदीचा परिणामकारक वापर केला, तर विजयश्री आपल्याच गळ्यात नाही का पडणार? की प्रत्येक लढाईत राजपुतानं ‘केसरिया बाणा’ दाखवणं आवश्यकच आहे. निष्कारण स्वत:चं शीर कापून घेण्याची बिनडोक खुमखुमी कशासाठी? त्यापेक्षा गनिमी काव्यानं शत्रूला नेस्तनाबूत करणंच श्रेयस्कर नाही का? हाही पराक्रमच असतो, हे कृष्णानंच नाही का शिकवलं? बायकोला फितवणा-या कृष्णाचा द्वेष करणारा युवराज आयुष्यभर आचरण करतो ते कृष्णनीतीचं! सुष्टांचं संरक्षण आणि दुष्टांचं निर्दालन, हे त्याच्या राज्यकारभाराचं ब्रीद! पण काळ युवराजाला अनुकूल नसतो. त्याच्या नजरेचा पल्ला इतका मोठा असतो की, इतरांनी त्याला ठार आंधळाच समजावं. बाबर हिंदुस्तानच्या वेशीवर येऊन ठेपण्याअगोदरच तो महाराणा संगांना बजावतो की, आधुनिक शस्त्रं खरेदी करा. ते होत नसेल, तर किमान मुघलांची युद्धनीती समजावून त्याप्रमाणे व्यूहरचना आखा. पण त्याचं म्हणणं धुडकावून लावलं जातं. युद्धाचा निकाल बाबराच्या बाजूनं लागतो. एकाही लढाईत पराभवाचं तोंड न पाहिलेले महाराणा संग भविष्यात वाढून ठेवलेल्या मानखंडनेनं बेचैन होऊन जातात. पण तो त्यांची समजूत घालून चितोडला माघारी फिरण्यासाठी त्यांना कसंबसं राजी करतो.. तर घरभेदीच इथं घात करतात. राणी कर्मावती दरबारी मानक-यांच्या वेशात मारेकरी पाठवते. अन्नात विष कालवून महाराजांना ठार मारण्याचा बेत सफल होतो. त्यांच्या हातून मरायचं नाही, या निर्धारानं राजपूत अंतिम युद्धाच्या प्रसंगी घालतात, तो ‘केसरिया बाणा’ डोक्याला गुंडाळून युवराज कृष्णाजवळ शेवटचा हिशेब चुकता करण्यासाठी पोहोचतो. मारेकरी तिथेही येऊन पोहोचतात. अंत:काळ जवळ आलेला असताना कृष्णाशी तो संवाद साधत राहतो. इतकी र्वष ज्याच्याशी कडवट वैर जोपासलं तो श्रीकृष्ण, राजकुमारी आणि आपण एकच आहोत, हे त्याला उमगतं. तत्क्षणी कृष्ण त्याला राजकुमारीसारखंच स्वत:त सामावून घेतो. मीरेच्या मिथकांशी आणि राजपुतान्यातल्या त्या काळच्या इतिहासाशी सुसंगत अशा विसंगतींमधून ‘एपिक’ म्हणावा इतका प्रचंड मोठा कथाव्यूह नगरकर यांनी रचला आहे. इतिहासानं नोंद न घेतलेल्या, ‘हरवलेल्या’ या पानांमधून आपल्यापर्यंत पोहोचतात ते जगण्यातला अटळपणा, योगायोग आणि विसंगती यांचे धागे. या धाग्यांचा गुंता वाचकांहाती देण्याचं काम ‘ककल्ड’नं केलं आहे.

‘चायनिझम’चे यश!


" चिनी राज्यकर्ते स्वत:ला इतिहासदत्त मध्यवर्ती आणि एकछत्री साम्राज्याचे वारसदार मानतात. हा मध्ययुगीन ताठा तो-यात मिरवतच त्यांचा जगाशी व्यवहार सुरू असतो. साम्यवादाच्या भरभक्कम आवरणाखाली त्यांनी विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसण्याची किमया साध्य केली. नेमकी हीच बाब भांडवलशाही देशांना खटकते. येथील साम्यवादाचेच भांडवल करून हे लोकशाहीवादी देश चीनच्या प्रगतीला नाकं मुरडतात. पण आता हा दृष्टिकोन बदलण्याची गरज येऊन ठेपली आहे. कारण, चीनशिवाय जागतिक बाजारपेठेला कधीच तरणोपाय नव्हता आणि भविष्यात तर अजिबात नसेल. साधनापेक्षा साध्य महत्वाचे, हा मुद्दा जेम्स किंजनं या पुस्तकातून मांडला आहे. "


दहशतवाद्यांनी २००१मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अमेरिकन सुरक्षा दलांचं मुख्यालय असलेल्या पेन्टागॉनवर विमानं धडकवली. पेन्टागॉनचे नुकसान झाल्यानंतर जॉर्ज बुश सैन्यदलांच्या प्रमुखांसह डोक्याला हात लावून बसलेत. अगदी नाऊरू-पालाऊ-टोंगापासून रशिया-इंग्लंड-फ्रान्सपर्यंत सर्व देशांच्या प्रमुखांचे सांत्वनपर संदेश बुश यांना येऊन झालेले आहेत. तेवढ्यात चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा फोन खणखणतो. बुश रिसीव्हर कानाला लावतात. औपचारिक बोलून झाल्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष बुशना विचारतात, ‘काय हो? पेन्टागॉनचे सर्व संगणक जळाले म्हणे?’, ‘ होय! दुर्दैवानं ते खरं आहे’, बुश महाशयांचं दु:ख त्यांच्या बोलण्यातून साफ झळकतंय. ‘काळजी करू नका. पेन्टागॉनमधला सर्व तपशील बीजिंगच्या सव्‍‌र्हरमध्ये एकदम सुरक्षित आहे. आजच्या आजच वॉशिंग्टनला पाठवून देतो’, राष्ट्राध्यक्ष तत्परतेनं उत्तरतात. .. ही अर्थातच वस्तुस्थिती नाही. चीनमध्ये सांगितला जाणारा विनोद आहे हा. पण वारंवार अमेरिकेला ललकारत शड्डू थोपटत ताकद दाखवणा-या चीनच्या वाढत्या सामर्थ्यांची प्रतीती देण्यास त्याच्या आर्थिक, तांत्रिक आणि लष्करी आकडेवारीपेक्षा एवढा विनोद पुरे! जेम्स किंज पत्रकार असल्यामुळेच त्याच्याकडून चीनच्या आर्थिक ताकदीचं विश्लेषण करणारं ‘ चायना शेक्स द वर्ल्ड : राइज ऑफ हंग्री नेशन’ नावाचं हे पुस्तक कळेल अशा भाषेत लिहिलं गेलं असावं! अन्यथा, अर्थशास्त्रज्ञ कशाला एवढी तसदी घेतायत तो ‘फायनान्शिअल टाइम्स’चा बीजिंग ब्यूरो चीफ होता. अर्थविषयक पुस्तकांत परिभाषा आणि आर्थिक संज्ञा अपरिहार्य असतात. वाचकांना या संज्ञांचा शेंडा-बुडखा माहीत नसेल, तर संदर्भ डोक्यावरून जातात. अगोदरच रोजच्या कटकटींनी कावलेले सर्वसामान्य मन अशा पुस्तकांकडे वळू इच्छित नाही. त्यामुळेच, ‘बेस्ट सेलर’च्या यादीत ती पुस्तकं कायम तळाच्या जागी पंगत मांडून असतात. पण किंजने या संज्ञांचा केवळ चवीपुरता वापर केल्यानं दुबरेधपणा टाळत पुस्तक रोचक झालंय. चार्ल्स डार्विनची उत्क्रांती आणि चेअरमन माओची सांस्कृतिक क्रांती, या दोन्ही संकल्पनांना चीनने पार मोडीत काढलं. प्रत्येक उत्क्रांती सावकाश आणि टप्प्या-टप्प्याने होते, हा डार्विनचा सिद्धान्त. पण चीनच्या बाबतीत ते घडलं नाही. चेअरमन माओनंतर १९७९मध्ये डेंग जियाओ पेंगनं चीनची सूत्रं हाती घेतली. त्यानंतर दहा वर्षातच या देशाच्या विकासदरानं आठ टक्क्य़ांच्या पुढे मुसंडी मारली. आपण मात्र स्वातंत्र्यानंतरची ४० वर्षे साडेतीन टक्के विकासदराभोवतीच घोटाळत होतो. या प्रगतीत (?) नियोजनकार आणि राज्यकर्त्यांनी एवढं सातत्य ठेवलं होतं की, जगभरातले अर्थतज्ज्ञ साडेतीन टक्के विकासदराला ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ अशी हेटाळणीजनक अर्थशास्त्रीय उपमा देऊन मोकळे झाले. माओच्या सांस्कृतिक क्रांतीनंतर गळपटलेल्या आणि भयभीत झालेल्या चिनी जनतेला डेंगने मोकळीक दिली. कारखानदारांवरची बंधनं शिथिल केली. थोडक्यात, राज्यव्यवस्थेला साम्यवादाच्या चौकटीत बसवून अर्थव्यवस्थेला भांडवलशाहीच्या ताब्यात दिलं. गंमत बघा, ऐतिहासिक ‘लाँग मार्च’मध्ये माओबरोबर चीन आडवा- उभा पिंजून काढताना पायाचे तुकडे पडलेला हा मनुष्य! हाल-अपेष्टा सहन करत, रानफळं खात माओसोबत एवढं अंतर चालून गेला. राज्य मिळवलं. चँग कै शेकला तैवानमध्ये पिटाळलं. पण माओसमवेत काम करताना त्याला बहुधा कळून चुकलं असावं की, ‘लाँग मार्च’मध्ये आपण फुकाची तंगडतोड केली. साम्यवाद लोकांचं पोट भरू शकत नाही. हा कट्टर कम्युनिस्ट डेंग नेत्याचं धोरण चुकल्यानंतर चिनी जनतेचे हित लक्षात घेऊन ते बदलण्याचे धैर्य दाखवतो. पण त्याचे भारतीय कॉम्रेड्स मात्र अजूनही पोथीनिष्ठा सोडण्यास तयार नाहीत. किंजच्या पुस्तकाचा रोखही त्याच दिशेने आहे. त्याचं म्हणणं असं की, मानवी हक्कांची गळचेपी करत असल्याबद्दल चीनला आतापर्यंत पाश्चिमात्य राष्ट्रांनी वाळीत टाकलं होतं. नेत्रदीपक आर्थिक प्रगती केली असली, तरी त्या देशाचे लगाम हुकुमशहांच्या हाती आहेत, असं म्हणत चीनच्या वाढत्या ताकदीला हेटाळण्यात आलं. पण, परिस्थिती बदललीय. त्यामुळे पाश्चात्त्यांनी चिनी नागरिकांच्या सामाजिक कुचंबणांवर चिंता आणि सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी आपल्या समाजात काय जळतंय, याची काळजी वहावी. पैसादेखील स्वातंत्र्य देतो, हे सत्य चिनी नागरिकांनी आपल्यापुरतं स्वीकारलं आहे. त्यामुळेच नजीकच्या काळात तिथे लोकशाही येण्याची शक्यता नाही. चीनबद्दलचं भाकित आणि भीती दोन शतकांपूर्वीच नेपोलियननं व्यक्त केली होती. हा देश झोपलेला आहे. त्याला तसाच राहू द्या! कारण, तो जागा झाल्यानंतर सगळं जग हादरवून सोडेल, असं नेपोलियन म्हणाला होता. ते खरं ठरलं. किंजने पुस्तकाला शीर्षक देताना याच वाक्याचा संदर्भ वापरला असावा. चीनच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक करताना तेथील पर्यावरणीय दुष्परिणामांबाबत काळजी करत नसल्याबद्दल किंजने चिनी सरकारला चिमटे घेतलेत. आर्थिक प्रगतीत सर्वसमावेशकत्व नसल्याबद्दल साधार चिंता तो व्यक्त करतो. तेथील ७० कोटी जनतेचं उत्पन्न प्रतिदिन दोन डॉलर आहे. अर्जुन सेनगुप्ता समितीच्या अहवालानुसार, ८० कोटी भारतीय दिवसाला २० रुपयांवर गुजराण करतात. १८५०मध्ये शिकागोत काम करणा-या अमेरिकन मजुराला जितके पैसे मिळायचे, त्याच्या फक्त निम्मे पैसे चिनी कामगाराला मिळतात. विकासाचा वेग वाढल्याने चीनमधील शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. तेथील ३० कोटी जनता मध्यमवर्गीय जीवन जगत आहे. पुढील पंधरा वर्षात हा आकडा दुप्पट होईल, असा अंदाज आहे. विकसनशील लोकशाही देशांपेक्षा चीनमधील सुधारणांची गती विलक्षण आहे. ही गती अर्थव्यवस्थेची प्रगती आहे की सूज, याबद्दल कायमच मत-मतांतरे असतील. पण, त्या देशाने कम्युनिझम आणि कॅपिटलिझमच्या मिश्रणातून निर्माण केलेला ‘चायनिझम’ राबवून करून प्रगती साधली, हे मान्य करावं लागतंच. साम्यवादी विचारप्रणालीचा गाभा तोच असला, तरी भिन्न सामाजिक अवकाशांमध्ये तिची रूपं बदलली. औद्योगिक क्रांती आणि सामाजिक परिस्थिती यांच्या अंर्तविरोधातून जर्मनीत मार्क्‍सवाद जन्माला आला. पण, सरंजामी वरवंट्यात पिचलेल्या रशियात तो मोहोरला, बहरला आणि कोमेजला. चिनी शेतक-यांना उज्ज्वल भविष्याचं स्वप्न दाखवणा-या माओनं निरंकुश राज्य केलं. भ्रमनिरास करणा-या माओवादाला डेंगनं दूर सारलं. आता चीन जगातली तिसरी शक्तिशाली अर्थव्यवस्था आहे. आता चीनमध्ये जे काही चालू आहे, त्याला साम्यवाद म्हणावं की आणखी काही, हा केवळ तात्विक प्रश्न आहे. भविष्याच्या गर्भात डोकावता येत नाही. तिआनमन चौकातला उठाव रणगाडे घालून चिरडला गेला. पण कुणी सांगावं, कदाचित मॅन्डॅरिनमध्ये भांडवलवादाचं महाकाव्य जन्माला येईलही. (बट, विथ इट्स ओन चायनीज व्हर्जन!)

अर्थासह अनुवादु..!

" अनुवाद करताना आशयाच्या आत्म्याशी प्रतारणा केली गेली, की मूळ साहित्यकृतीचा खूनपडल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे अनुवादकाची जबाबदारी लेखकाहून मोठी असते। पणसाहित्यविश्वाकडून अनुवादकांची दखल घेतली जात नाही, अशी खंत साहित्य अकादमीच्या वतीनेमुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्यामराठी भाषांतरेया परिसंवादात सहभागीझालेल्या अनुवादकांनी व्यक्त केली. "


सृजनाच्या अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून भाषेचं महत्त्व असले, तरी तिला भौगोलिक मर्यादा पडतात. अनुवादित साहित्यकृतींच्या बाबतीतही हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. भाषेचा अडथळा पार करताना संबंधित साहित्यकृतीचा मूळ गाभा हरवण्याचा धोका निर्माण होतो. ज्या सांस्कृतिक परिपोषणाने तिला साहित्यिक मूल्य आलं आहे, ते अनुवादातूनही सिद्ध करणं, ही मोठीच कसोटी आहे. त्यामुळे एखादी साहित्यकृती हे तिच्यातील वेगळंपण, तिच्यातली अभिजातता, अंगभूत सौंदर्य, सामाजिक, राजकीय आदी संदर्भाच्या अनुषंगाने येणा-या तिच्या मूळ सांस्कृतिक आविष्काराशी प्रामाणिक राहून दुस-या भाषेत प्रकट करणं, हे तितकंच जिकिरीचं आणि आव्हानात्मक काम आहे. साहित्याच्या प्रांतात सृजन आणि अनुवाद यांच्यात डावं-उजवं करण्याची प्रथा आहेच. तिथेही ती निर्धारित मूल्यांच्या मापदंडांवर तोलली जात असली, तरी अनुवादाला दुय्यम स्थान स्वीकारावं लागतं. अनुवाद म्हणजे अनु:सृजन की, सृजनाचे निव्वळ भाषांतर, हा प्रश्न साहित्यक्षेत्रात वारंवार चर्चिला जातो. साहित्य अकादमीच्या वतीने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात भरविण्यात आलेल्या परिसंवादात याच विषयावर विचारमंथन झाले. सहभागी अनुवादक-लेखकांनी अनुवादाचा इतिहास, परंपरा, प्रगती, सद्यस्थिती आणि भविष्यातील आव्हाने यांचा परामर्श घेतला. ख्यातकीर्त साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात शीला कोळंबकर, अपर्णा लांजेवार, दामोदर खडसे, सुनीता परांजपे, लक्ष्मीनारायण बोल्ली, लक्ष्मण हर्दवाणी या मान्यवर अनुवादकांनी आपले विचार मांडले. त्याचा थोडक्यात घेतलेला हा गोषवारा.

अपर्णा लांजेवार यांनी अनुवादित साहित्याची उत्पत्ती विशद केली. भारतीय समाजात उत्तरोत्तर बळकट होत गेलेल्या वर्णव्यवस्थेमुळे ज्ञानाच्या आदान-प्रदानाच्या प्रक्रियेत खंड पडला, हे त्यांनी ऐतिहासिक दाखले देत उद्धृत केले. प्राचीन काळात संस्कृतसारखी समृद्ध ज्ञानभाषा असतानाही तिच्याद्वारे अनुवादाचं काम झालं नाही, असा मुद्दा लांजेवार यांनी आपल्या भाषणात मांडला. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी दाखले देताना म्हटलं की, वैदिक आणि वैदिकोत्तर काळात संस्कृतवर अभिजनांनी मक्तेदारी प्रस्थापित केली. त्यामुळे आपोआपच इतर जाती-वर्ण ज्ञानप्रक्रियेपासून वंचित राहिले. याचा परिणाम भिन्न-भिन्न समाजांमधील सांस्कृतिक देवाण-घेवाण खुंटण्यात झाला. अलेक्झांडरने भारतावर स्वारी केल्यानंतर काही संस्कृत पंडीत आपल्याबरोबर नेले. पण त्यांच्याकडून ग्रीक साहित्य संस्कृतमध्ये अनुवादित होऊ शकलं नाही. अपौरुषेय वेद अथवा गीता यांच्यासारख्या अध्यात्मशिरोमणी ग्रंथांचीही जगाला ओळख होऊ शकली नाही. याउलट, मुस्लिमांनी अरेबिक आणि फारसी भाषेत जगभरातील साहित्य अनुवादित करण्याचा सपाटा लावला. बुद्धाचं तत्त्वज्ञानही पालीतून चिनी-जपानीसारख्या भाषांमध्ये अनुवादित झालं. पण धार्मिक कर्मठतेमुळे संस्कृतने बुद्धाची दखल घेतली नाही. केवळ संस्कृतमध्येच उपलब्ध असलेलं जीवनविषयक ज्ञान मध्ययुगीन संतांनी बंडखोरी करून सामान्यजनांसाठी खुलं केलं. ज्ञानाचा हा ओघ मराठीतही पाझरला आणि समृद्ध झाला. अनुवादाच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर अध्यात्मिक आणि तात्विक क्षेत्रापुरतं कवाडबंद असलेलं मराठी साहित्य खुलं झालं. अमेरिकन रोमॅन्टिसिझमला खतपाणी घालणा-या पूर्वसुरींचा प्रभाव आधुनिक मराठी साहित्यिकांवरही पडला. सगळे विचार रिचवत मराठी साहित्य समृद्ध होत गेलं. आता ही प्रक्रिया समाधानकारक सुरू आहे.

दामोदर खडसे यांनी आपल्या भाषणात शब्दांचं अर्थवाहीपण जपण्यावर भर दिला. ग्रामीण अथवा दलित साहित्यातील परिभाषा इतर भाषांमध्ये उपलब्ध नसतात. शब्द स्वत:सोबत जी संस्कृती वाहत असतात, तिची नाळ तुटण्याचे प्रसंग अनुवाद करताना निर्माण होतात. अनुवादाला चपखल प्रतिशब्द सुचला नाही की, भाषा आपटी खाऊ लागते. अनुवादक भरकटू लागतो. मूळ लेखकाला नेमकं जे म्हणायचं अथवा सुचवायचं आहे, ते अनुवादातून प्रतीत होत नाही. त्यामुळे वाचकाच्या मनात मूळ लेखकाच्या सृजनशीलतेविषयी शंका उत्पन्न होते. नेमक्या याच कारणांमुळे गद्यापेक्षा कवितांचे अनुवाद ही सर्वात आव्हानात्मक बाब आहे. मूळ साहित्यकृतीत वापरल्या गेलेल्या प्रतिमा आणि त्यापाठीमागील संदर्भाचे ग्रहण दुस-या संस्कृतीविश्वात वावरणा-या वाचकांना होणं, यातच अनुवादाचं साफल्य असते. लक्ष्मीनारायण बोल्ली, सुनीता परांजपे, शीला कोळंबकर, लक्ष्मण हर्दवाणी यांनीही आपल्या बोलण्यातून असाच सहमतीचा सूर व्यक्त केला. अनुवादाला बरे दिवस आले असले, तरी अनुवादकांना चार दिन सुखाचेयायचे आहेत. त्यांची आर्थिक पिळवणूक, लेखक-प्रकाशकांकडून होणारी हेटाळणी या व्यावहारिक मुद्यांकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आलं.

अनुवाद करताना आशयाच्या आत्म्याशी प्रतारणा केली गेली, की मूळ साहित्यकृतीचा खून पडल्याशिवाय राहत नाही. सृजनाची अभिव्यक्ती स्वभाषेतून करणा-या लेखकाला प्रकटीकरणाचे बंधन नसते. किंबहुना, या स्वैर, तरीही आवश्यक स्वातंत्र्यामुळेच तो अस्सल साहित्याचा निर्माता ठरतो. चोखंदळ वाचक त्याला डोक्यावर घेतात. पण, हे साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित करणा-याची जबाबदारी लेखकाहून मोठी असते. अनुवादकाला एकाच वेळी विभिन्न सांस्कृतिक अवकाशांमध्ये वावरावे लागते. अनुवादाच्या माध्यमातून एका अपरिचित संस्कृतीची ओळख तो दुस-या समाजातील वाचकांना करुन देत असतो. एका अर्थाने तो अव्याहत चाललेल्या सांस्कृतिक दिंडीचा बिनीचा शिलेदार आहे. जागतिकीकरणानंतर भाषेच्या उदारीकरणाचेही दिवस आले आहेत. आतापर्यंत स्वकोशात मग्न राहिलेल्या जागतिक पटलावरच्या विविध संस्कृती एकमेकांशी देवाण-घेवाण करू लागल्या आहेत. त्यामुळे विरोध आणि विकासाच्या प्रक्रियेला कधी नव्हे इतकी प्रचंड गती मिळाली आहे. आपली नितांतसुंदर मराठी भाषाही याला अपवाद कशी असेल? विकासाच्या प्रक्रियेत आत्मविश्वासाने सहभागी व्हायचं की, विरोध करून खोटा अहंगंड आणि दुबळा न्यूनगंड पोसायचा, याचा निर्णय आपणच घ्यायचा आहे. चक्रधर-ज्ञानोबांनी जोपासलेला मराठीचा वटवृक्ष आणखी बहरेल की झडेल, हे त्यातूनच तर ठरेल!

Friday, April 29, 2011

भांडवलवाद ‘कल्याणकारी’?


" गरिबीचं दुष्टचक्र भेदणारा आणि भांडवलाद फक्त नफेखोरीभोवती फिरू नये, हेही बजावणारा विचार बांग्लादेशातील ‘ग्रामीण बँके’चे जनक आणि नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मुहम्मद युनुस यांनी ‘बिल्डिंग सोशल बिझनेस’ या नव्या पुस्तकात मांडला आहे...."



स्वार्थी आणि आत्मकेंद्री वृत्ती हा मानवी स्थायीभाव असतो आणि तरीही परस्परांविषयीचा स्नेहभावही त्यात अनुस्यूत असतोच. पण, स्वार्थ हाच मानवी अस्तित्वाचा पाया मानून भांडवलवादाने इतर पैलूंकडे दुर्लक्ष केले आहे. माणसाला केवळ पैसे छापणारा यंत्रमानव गृहीत धरून भांडवलवादाने आपल्या नफेखोरीची उभारणी केली आहे. साहजिकच ती एकांगी आणि अपूर्ण आहे. कुणाचेही व्यक्तिमत्त्व राजकीय, सामाजिक, भावनिक, आध्यात्मिक, पर्यावरणीय आदी व्यामिश्र गुंतागुंतीचा परिपाक असतो. पण, भांडवलवाद हे सगळं नाकारून केवळ आर्थिक बाजूवर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे यातून उभं राहिलेलं भांडवलवादाचं व्यक्तीविषयीचं आकलन अतिशय मर्यादित आहे. सव्‍‌र्हायव्हल ऑफ द फिटेस्टसारखं अघोरी तत्त्वज्ञान त्याचा पाया आहे. त्यामुळे अगोदरपासूनच आर्थिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या बलिष्ठ असलेले अधिकाधिक संपत्ती कमवताना दिसताहेत. तर, गरीब नुसतेच उपेक्षेचे धनी ठरताहेत. मग ठराविक वर्गाचेच हितसंबंध जपणारा भांडवलवाद व्यापक आणि मानवतावादी कसा करता येईल? प्रचलित विचारांच्याच चौकटीत काम करून तिला कल्याणकारी अधिष्ठान कसे प्राप्त करून देता येईल? बांग्लादेशातील ग्रामीण बँकेचे जनक आणि नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांनी त्यासंबंधीचे आपले विचार बिल्डिंग सोशल बिझनेसया पुस्तकातून व्यक्त केले आहेत.

या पुस्तकात त्यांनी मार्क्‍सवादाइतक्याच आदर्श संकल्पना रेखाटल्या असल्या, तरी त्यांच्या प्रत्येक विचाराला वास्तवाचा भरभक्कम पुरावा आहे. गरिबी ही वंचितांनी निर्माण केलेली कीड नाही. त्यासाठी सभोवतालचे विविध घटक कारणीभूत असतात. भांडवलवादी विचारांच्या एकांगी पायावर उभ्या राहिलेल्या आर्थिक संस्थांचा त्यात मोठा वाटा आहे. स्वत:ची काळजी घेण्याबरोबरच समाजाच्या विकासात योगदान देण्याइतकी क्षमता प्रत्येक मनुष्यातच असते. फक्त सध्या ज्या वातावरणात आपण राहतो आहोत, त्या वातावरणात अशा क्षमतांचा विकास करण्याची संधी काहींनाच मिळते. बहुतेकांना मिळत नाही. गरिबी ही भांडवलवादात असलेल्या त्रुटींचे अपत्य आहे. या त्रुटी दूर करून आर्थिक संस्थांची उभारणी केली, तर गरिबीचे निश्चितच निर्मूलन होऊ शकते. बांग्लादेशातील गरीब महिलांसाठी ग्रामीण बँक सुरू करून त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी जवळपास चार दशकं युनुस यांनी यशस्वी धडपड केली. गरिबी ही कृत्रिम गोष्ट आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या भांडवलशाही व्यवस्थेची पुनर्रचना करून गरिबी नष्ट करता येऊ शकते, हा विचार युनुस यांच्या मनात बळकट झाला. बँकांनी कर्ज देण्याचे जे निकष ठरवलेत, त्या निकषांच्या आधारावर जगातली दोन तृतीयांश लोकसंख्या कर्ज घेण्यास नालायक ठरते. ज्यांना कर्जाची गरज इतरांपेक्षा जास्त असते, त्यांनाच बँकेचे दरवाजे बंद होतात. मग सावकार चक्रवाढ व्याजाने त्यांना कर्ज देतो. व्याज फिटतच नाही आणि मुद्दल जिथल्या तिथे राहते. गरिबीचे हे दुष्टचक्र पिढ्यान्पिढ्या सुरूच असते.

युनुस यांनी ग्रामीण बँकेची 1978मध्ये सुरुवात केली. गरिबांना कर्ज देण्याची हिंमत दाखवून त्यांनी हा प्रयोग यशस्वीही करून दाखवला. त्यामुळेच आता जगभरातल्या आर्थिक संस्थांनी मायक्रोक्रेडिटला गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली आहे. 2008च्या जागतिक मंदीने प्रचलित भांडवलशाही व्यवस्थांमधील अपयश अधोरेखितच केले. सिटीबँक, लीमन ब्रदर्स अशा धनाढ्य संस्थांचे दिवाळे निघण्यास सुरुवात झाली होती, तेव्हा मायक्रोक्रेडिटवर आधारलेल्या संस्था केवळ तगच धरून राहिल्या नव्हत्या. त्या जोमाने वाढतही होत्या. या पार्श्वभूमीवर जागतिक मंदी ही संधी मानून रूढ व्यवस्थेत बदल घडवून आणणे महत्त्वाचे आहे, असं युनुस यांचं म्हणणं आहे. भांडवलवादावरील विश्वास उडालेल्या वातावरणात नवे उपाय सांगणारं हे पुस्तक गरिबी दूर करण्यासाठी वास्तववादी विचारांचा पाठपुरावा करतं. आतापर्यंत केलेल्या प्रयोगांचे सकारात्मक परिणाम पाहूनच युनुस सोशल बिझनेसच्या संकल्पनेचा आग्रह धरतात.

सोशल बिझनेसया संकल्पनेत गुंतवणूकदाराच्या वैयक्तिक फायद्याला महत्त्व न देता इतरांचे हित साधण्याचा आग्रह असतो. पण, त्यातही कठोर व्यावसायिक दृष्टिकोन आवश्यक आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली..टाइप विचारांना त्यात अजिबात थारा नाही. एखाद्या व्यवसायात केलेली भांडवली गुंतवणूक भरून निघावी, इतपत उत्पन्न त्यातून अपेक्षित असतेच. शिवाय, त्यातून होणारा नफा पुन्हा सोशल बिझनेसमध्येच गुंतवला जातो. पैसा मिळवल्याचं नाही, पण आपण मानवतावादी भूमिकेतून हे सारं करत आहोत, एवढंच समाधान त्यातून मिळतं. कुठल्याही आर्थिक प्राप्तीची अपेक्षा ठेवायची नाही. सेवाभावी वृत्ती मनुष्यात असतेच, या गृहितकावर युनुस यांनी सोशल बिझनेसच्या संकल्पनेचा डोलारा उभा केला आहे. आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, रोजगार निर्मिती या क्षेत्रांत युनुस यांनी उभ्या केलेल्या कंपन्यांचे काम जोरात सुरू आहे. अनेक नामवंत कंपन्या त्यांच्या उपक्रमात आपले योगदान देत आहेत. ही चळवळ आणखी व्यापक झाली, तर जगभरातली गरिबी काही वर्षातच नष्ट होईल, अशी युनुस यांना आशा आहे. सोशल बिझनेससुरू करण्यासाठी लागणारा पैसा अशाच कंपन्यांकडून किंवा बिल गेट्स- वॉरन बफे यांच्यासारख्या जगातल्या धनाढ्य देणगीदारांकडून मिळवायचा, असा त्यांचा साधासरळ हिशेब आहे.

आर्थिक, सामाजिक, शेतीविषयक, आरोग्यविषयक, पर्यावरणविषयक असे सारेच प्रश्न एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. त्या प्रत्येक क्षेत्रात सोशल बिझनेसला वाव आहे. युनुस यांच्या म्हणण्याप्रमाणे या संकल्पनेचा सर्वात जास्त फायदा सरकारला होईल. शेवटी, शासननिर्मिती ही प्रजेचे हित साधण्याकरता झालेली आहे. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सोशल बिझनेससरकारची मदत करू शकतात. युनुस यांच्या बांग्लादेशातील प्रकल्पांनी ते करून दाखवलंय. बांग्लादेशातील गरिबीचा दर 1991मध्ये तब्बल 57 टक्के होता. तो आता 40 टक्क्यांवर आला आहे. इतर राष्ट्रांच्या तुलनेत तो जरी जास्त असला, तरी दरवर्षी दोन टक्के या वेगानं तो कमी होतोय. किमान, हे यश लक्षात घेऊन तरी जगभरातील सरकारांनी आपल्या आर्थिक धोरणांत बदल करावेत, असा युनुस यांचा आग्रह आहे. स्वप्नाळू समाजवादाप्रमाणेच सोशल बिझनेसची संकल्पनाही स्वप्नवत असल्याचे ते कबूल करतात. पण, स्वप्न पाहणा-यांनीच जगाचा चेहरामोहरा बदलला आहे. अशक्य ते शक्य करून दाखवलं आहे. त्यामुळे आमचे विचार स्वप्नाळू वाटत असतील. पण, जग गरिबीमुक्त करण्याची ताकद याच विचारांत आहे, असं सांगून युनुस यांनी पुस्तकाचा समारोप केलाय. केवळ नफाप्राप्तीचे उद्दिष्ट ठेवणा-या लोकांकडून सोशल बिझनेससंकल्पनेची मोडतोड होऊ शकण्याची भीती ते वर्तवतात. तसं होऊ नये, यासाठी या मानवतावादी उपक्रमात सहभागी होणा-यानी वॉचडॉगची भूमिका निभावण्याची गरज असल्याचे सांगतात. या धोक्यापासून तर समाजवाद आणि मार्क्‍सवादही स्वत:ला वाचवू शकलेले नाहीत. त्यामुळे भांडवलशाहीचा हा नवा अवतार त्याचं आदर्शवादी अधिष्ठान कुठपर्यंत जपू शकेल, ते येणारा काळच सांगेल!





श्रीमंतीचा अर्धवट 'गेटवे' ...!


"कालानुरूप बदलत गेलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात अधिक संपत्तीसंचय करणाऱ्या व्यक्तींचं प्रातिनिधिक चित्रण या पुस्तकात असल्याचा दावा क्रॉसेन यांनी केला आहे। मात्र त्यांनी जगातल्या श्रीमंतांच्या इतिहासाचा श्रीगणेशा गझनीच्या महमूदापासूनच का सुरू केला, याचे उत्तर देण्याची तसदी घेतलेली नाही."

माणूस भटक्याप्रमाणं जगणं सोडून एका जागी स्थिर झाला, तेव्हा त्याच्या कळपाचं रूपांतर समाजात झालं. या समाजातील प्रत्येक व्यक्तीला इच्छा असो अथवा नसो, जगण्याच्या लढाईत अस्तित्व टिकवून ठेवण्याकरता इतरांशी संबंध ठेवण्यावाचून पर्यायच नव्हता. माणूस म्हणून लागणा-या गरजा भागवण्यासाठी ते आवश्यकच होतं. उत्पादनाच्या प्रक्रियेतील या अपरिहार्य संबंधांतूनच प्राथमिक स्तरावरची तत्कालीन अर्थव्यवस्था आकाराला आली. त्यानंतर या अर्थव्यवस्थेला आधार म्हणून समाजाचे कायदेकानून अस्तित्वात आले. उत्पादनाची साधने जसजशी बदलत गेली, तसतसं अर्थव्यवस्थेचं स्वरूपही बदलत गेलं. या अर्थव्यवस्थेमागील कार्यकारण भाव समजून घेत तिने निर्माण केलेल्या संधींचा लाभ उठवण्याचं कौशल्य दाखवणारी व्यक्तिमत्त्वं त्या- त्या काळातल्या धनाढय़ांच्या यादीत जाऊन बसली.

प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन काळातल्या अनेक व्यक्ती त्यांच्या डोळे दिपवणाऱ्या संपत्तीच्या वर्णनानं समाजात दंतकथा होऊन बसल्या आहेत. आतादेखील मुकेश अंबानी यांच्या अँटिलियानामक प्रासादतुल्य घराच्या किमतीचा खर्च वृत्तपत्रात वाचून आणि बिल गेट्स नि वॉरन बफे यांच्या संपत्तीचे वाढते आकडे ऐकून आपल्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण होतं. एवढी अमाप संपत्ती त्यांनी कशी मिळवली असावी, याचा शोध त्या कुतुहलापोटीच घेतला जातो.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या विख्यात पत्रकार सिंथिया क्रॉसेन यांना बहुधा आपल्या द रिच अँड हाऊ दे गॉट दॅट वेमधून हेच मांडायचं असावं. पण, खुद्द युरोपाशी संबंधित ऐतिहासिक दस्तावेजांच्या विपुलतेमुळे म्हणा अथवा भारत-चीनच्या इतिहासाकडे नजर न गेल्यामुळे म्हणा, त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक इतिहासाचा समग्र आढावा घेत नाही अथवा युरोपचाच इतिहास फार जोरकसपणे मांडतं, असं हे पुस्तक वाचताना राहून- राहून वाटतं.

लालित्यपूर्ण लिखाण हे सत्यान्वेषी आणि नि:संदिग्ध मांडणीला पर्याय ठरू शकत नाही. सिंथिया क्रॉसेन यांनी शाब्दिक चमत्कृतींची ढाल पुढं केली आणि बखरवाङ्मयातील उता-यांचा वाचकांवर मारा केला असला, तरी त्यांच्या लिखाणातली अपूर्णता लपत नाही. ते प्रवाही आहे, पण, तरीही दोन- अडीच हजार वर्षाचा कालपट सलगपणे उलगडून दाखवणारं नाही. म्हणूनच ते वाचनीय आहे, पण अभ्यासनीय नाही. वॉल स्ट्रीटवरच्या घडामोडींचा बारकाईनं अन्वयार्थ लावून वार्ताकनाच्या क्षेत्रात मानदंड प्रस्थापित करणा-या क्रॉसेन यांच्यातल्या पत्रकारानं लेखिका म्हणून असं सुमार दर्जाचं पुस्तक का लिहावं, हे समजत नाही. सहजासहजी उपलब्ध झालेल्या दस्तावेजांच्या आधारानंच आपल्याला काय म्हणायचंय, याची मांडणी केल्यानं क्रॉसेन यांना पुस्तक लिहिण्यास कमी श्रम पडले असतील. पण, युरोपाशिवाय जगाच्या पाठीवर नांदणा-या इतर समृद्ध संस्कृतींकडेही त्यांनी लक्ष दिलं असतं, तरी या पुस्तकाला अभ्यासग्रंथ म्हणून आकार आला असता.

भारतावर सतरा वेळा स्वा-या करून अमाप लूट मायदेशी नेणाऱ्या गझनीच्या महमूदापासून क्रॉसेन यांचा पुस्तकाचा प्रवास सुरू होतो, तो बिल गेट्सपर्यंत जाऊन संपतो. कालानुरूप बदलत गेलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात अधिक संपत्तीसंचय करणा-या व्यक्तींचं प्रातिनिधिक चित्रण या पुस्तकात असल्याचा दावा क्रॉसेन यांनी केला आहे. मात्र त्यांनी जगातल्या श्रीमंतांच्या इतिहासाचा श्रीगणेशा गझनीच्या महमूदापासूनच का सुरू केला, याचे उत्तर देण्याची तसदी घेतलेली नाही. सांस्कृतिक अभिनिवेशाची झूल न पांघरताही या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यास हेच दिसतं की, क्रॉसेन यांनी महमूदपूर्व काळातला इतिहास मांडण्यात कुचराई केली. अथवा, युरोपातल्या डार्क एजमुळे तिथं शतकानुशतके वास करत आलेलं आर्थिक- सांस्कृतिक दरिद्रीपण आणि सुदूर पूर्वेचा चीन वा भारत यांच्याबाबत असलेलं अज्ञान, या दोहोंतला मध्यममार्ग म्हणून गझनीच्या महमूदाला आपल्या पुस्तकात अग्रक्रम दिला असावा.

महमूदानं सतरा वेळा भारतावर स्वारी केली, हा इतिहास सांगूनच त्या थांबल्या आहेत. त्या काळातला अतिश्रीमंत प्रदेश म्हणून भारताविषयी परकीयांमध्ये आकर्षण होतं, हे सांगताना भारतात ही श्रीमंती कुठून निर्माण झाली असावी, याची कारणं तपासण्याची जरुरी क्रॉसेन यांच्यासारख्या शोधक नजरेच्या पत्रकाराला भासली नाही. जगातील इतर प्रांतांतील मानवसमुदायांना जगण्याची भ्रांत पडलेली असताना भारतात त्या काळी सरप्लसनिर्माण करणारी एक प्रगत अर्थव्यवस्था अस्तित्वात होती. त्याकडे मात्र या पुस्तकात पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतं.

क्रॉसेन यांचं हे पुस्तक पावणेतीनशेच्यावर पानांचं आहे. त्यापैकी सुमारे दीडशे पानं त्यांनी प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील श्रीमंतांच्या वर्णनात घालवली आहेत. त्या काळातल्या नवकोट नारायणांमध्ये गझनीचा महमूद, तलवारीच्या धाकावर युरेशिया जिंकणारा चंगीझ खान, आशियाई, अरबी आणि युरोपीय व्यापा-यांना संरक्षण पुरवून त्यांच्याकडून दलाली वसूल करणारा आफ्रिकेचा मनसा मुसा, स्वत:च धार्मिक कायदे पायदळी तुडवून आणि चर्चचा धाक दाखवून कॅथॉलिक जनतेकडून संपत्ती उकळणारा पोप अलेक्झांडर सहावा, पंधराव्या शतकातील जर्मन बँकर जॅकोब फुगर आणि जॉन लॉ यांचा समावेश आहे. ही माणसं अतिधनाढय़ होती, यात दुमत असण्याचं कारण नाही.

पैशाच्या परिभाषेत मोजदाद करता येईल, असं स्वरूप तोपर्यंत आर्थिक व्यवहारांना आलं नव्हतं. त्यामुळं या व्यक्तींच्या श्रीमंतीचं चित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर लख्ख उभं करण्याच्या प्रयत्नांत त्यांनी शब्दांची पैशापेक्षाही अमाप उधळण केली आहे. परंतु, या व्यक्तिमत्त्वांच्या समकालिनांचा धांडोळा घेण्यात मात्र आळस केला, असं नमूद करावसं वाटतं. उदाहरणार्थ, त्यांनी उल्लेख केलेल्या जॉन लॉ आणि फुगरच्या काळात (सतराव्या शतकाच्या आगे-मागे) भारतामध्ये मुगल साम्राज्यालादेखील कर्ज देणारे वीरजी व्होरा आणि जगतशेटसारखे व्यापारी अथवा बँकर अस्तित्वात होते. इतकी श्रीमंती केवळ दोघांकडेच आणि भारतातच असेल, असं समजण्याचं कारण नाही. चीनमध्येही तसे श्रीमंत असतील. क्रॉसेन यांना स्थावर- जंगम मालमत्ता लक्षात घेऊनच तत्कालीन व्यक्तींची संपत्ती आणि त्यांच्या यशाचं गमक सांगायचं होतं, तर भारतात आणि चीनमध्ये तेवढी श्रीमंती नक्कीच होती.

मुद्दा हा आहे की, क्रॉसेन यांनी स्वत:ला समजलेला आणि सांगायला सोप्पा जाईल, असाच इतिहास या पुस्तकातून मांडला आहे. एखादं गृहितक अगोदर मांडायचं आणि त्याप्रमाणे प्रमेयांची मांडणी करायची. मग त्यातील एकांगी निष्कर्षानाच सिद्धांताचं रूप द्यायचं, असा हा प्रकार एकंदर प्रकार आहे.

मध्ययुगीन इतिहासाशी खेळताना उडालेली लेखिकेची भंबेरी अचानक थांबते, ती जॅकोब फुगर आणि रिचर्ड आर्कराईटवर लिहिलेल्या प्रकरणांपासून! पंधराव्या शतकात युरोपात आलेलं प्रबोधनाचं युग या काळात अगदी समेवर पोहोचलं होतं. भरपूर लिहिलं जात होतं. त्यामुळं फुगर-आर्कराईटच्या काळातले संदर्भ मिळवताना क्रॉसेन यांना फारशी तोशीस पडलेली दिसत नाही. आर्कराईटवरील प्रकरणातून त्यांनी औद्योगिक क्रांतीतून युरोपात उदयाला आलेली भांडवलशाही व्यवस्था आणि त्यातून नवउद्योजकांना निर्माण झालेल्या संधी यांचा अगदी नेमक्या शब्दांत ऊहापोह केला आहे. तर, कल्पनेच्या बळावर उद्योजकीय भरारी घेऊन जगावर अधिराज्य प्रस्थापित करता येते, हे बिल गेट्सनं दाखवून दिल्याचा मुद्दा मांडत आता श्रीमंत होण्यासाठी या संगणकतज्ज्ञाच्या पावलावर पाऊल टाकून मार्गक्रमणा करणे उपयुक्त ठरेल, असा त्यांनी पुस्तकाचा समारोप केला आहे.

थोडक्यात, संकलित केलेल्या माहितीला पुस्तकरूप देण्यासाठी केवळ सोय म्हणून त्यांनी जगातल्या श्रीमंतांचा इतिहास लिहिण्यास दहावं शतक प्रमाण मानलं असावं. युरोपीय इतिहासतज्ज्ञांनी लिहिलेला भारताचा इतिहास त्यांनी अभ्यासला असता, तर सम्राट अशोकाच्या काळात भारतात प्रचंड समृद्धी नांदल्याचे त्यांना दिसले असते किंवा गुप्तकाळावर नजर टाकली असती, तर त्याला भारताचे सुवर्णयुग म्हटले गेल्याचीही त्यांना कल्पना आली असती. जेणेकरून, तत्कालीन भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात उमटले असते व हे पुस्तक सर्वसमावेशक झाले असते.

प्रहार - १० जानेवारी २०११

द्रौपदीचे महाभारत


" महाभारतानं द्रौपदीला ठरवून दिलेल्या भूमिकेचं समर्थन करत असल्याचा आवेश बॅनर्जींनी द्रौपदीच्या तोंडी घातलेल्या निवेदनात नाही। पण, परिस्थितीच्या हातचं खेळणं बनल्याची हताशा मात्र जरूर आहे. ही परिस्थितीच द्रौपदीच्या व्यक्तित्वाविषयी गैरसमज निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळं पुरुषसत्ताक वर्चस्ववादी व्यवस्थेनं विद्ध केलेल्या या असामान्य चरित्रनायिकेची वाचकांना नवी ओळख करून देणं आवश्यक होतं. ‘पॅलेस ऑफ इल्युजन्स’नं हे काम अगदी चोख बजावलं आहे."


महाभारत कुणामुळं घडलं? द्रौपदीमुळं! रामायण कुणामुळं घडलं? सीतेमुळं! भारतीय व्यावहारिक संकेतांमध्ये कार्यकारणभावाची ही सरळधोपट मीमांसा शतकानुशतकं प्रचलित आहे. गप्पाटप्पांत, भांडणतंटय़ात हे दोन्हीही दाखले अगदी सहज तोंडावर फेकले जातात. कथा-पुराणांकडं बोट दाखवत स्त्रीवर दोष टाकला, म्हणजे आपल्याही घरातलं महाभारत-रामायण सुफळ संपूर्ण झाल्यासारखं वाटत असावं बहुधा आपल्याला! सीतेला तरी पतिव्रता म्हणून पुजलं जातं. पण, द्रौपदीच्या नशिबी तेही भाग्य नाही. एक अहंमन्य रुपगर्विता की समंजस राजकन्या? सुलक्षणा पतिव्रता की पाच पुरुषांची केवळ शय्यासोबतीण? इंद्रप्रस्थातल्या राजवैभवाने तृप्त झालेली सम्राज्ञी की हस्तिनापूरची धूळधाण करू पाहणारी महत्त्वाकांक्षिणी? कालौघात फडफडून गेलेलं नुसतंच दुबळं पान की खरंच इतिहास घडवणारं तेजस्वी आख्यान? कोण? द्रौपदी नक्की कोण?

महाभारतासारख्या लाखभर ओव्यांच्या महाकाव्याचे नायक आणि खलनायक भारतीय संस्कृतीच्या अव्याहत प्रवाहात आपल्या प्रत्येकाच्या मनाच्या गाभ्यापर्यंत वाहत आलेत. पण, द्रौपदीची ओळख मात्र आपल्या लेखी अजूनही धूसरच आहे. कृष्ण, अर्जुन, कर्ण, भीष्म.. हे अनेक कादंबरीकारांचे कथाविषय झालेत. पण, द्रौपदीला मध्यवर्ती भूमिकेत ठेवून कादंबरीच्या रूपानं महाभारताचं पुनर्लेखन फार कमी वेळा झालंय. किंबहुना, जवळजवळ नाहीच. चित्रा बॅनर्जीसारख्या लेखिकेनं मात्र द्रौपदीला आवाजमिळवून दिलाय. बॅनर्जींनी उभ्या केलेल्या पॅलेस ऑफ इल्युजन्समधून ती आपल्याशी बोलते.

या पुस्तकातनं द्रौपदी जे बोलते, ते वकिली थाटाचं अजिबात नाही. इतर पात्रांप्रमाणं महाभारतकारांनी तिलाही एक भूमिका ठरवून दिली होती. स्त्रीप्रधान समाजव्यवस्था लोप पावत चालल्याचा तो काळ होता. त्यामुळं महाभारतातली सारी स्त्रीपात्रं आपापल्या भूमिकेच्या ओझ्याखाली घुसमटल्यासारखी वाटतात. कुणीतरी जिवाच्या आकांतानं कानात ओरडून आपल्या व्यथा सांगाव्यात आणि नेमकं त्याच वेळी आपण बहिऱ्याचं सोंग घ्यावं.. स्त्रियांच्या बाबतीत महाभारताच्या कर्त्यांचं असं धोरण आहे. द्रौपदीला तर व्यास आणि तत्सम ऋषींनी या महाकाव्यात लीड रोलच बहाल केला होता. पण, तिचं व्यक्त होणं, हे आपल्याला महाभारतातील इतर पुरुषपात्रांकडून समजावून घ्यावं लागतं. कारण या नायिकेला मुक्यानं वावरावं लागेल, अशी व्यवस्था संपूर्ण महाभारतभर करून ठेवण्यात आली होती. मग तिच्या घुसमटीची दाहकता किती पराकोटीची तीव्र असेल?

द्रौपदीच्या आविष्कारस्वातंत्र्याला वाव देत बॅनर्जींनी तिची ही घुसमट संपवलीय. महाभारताच्या पटलावर द्रौपदीचं व्यक्तित्व आकार धारण करायला सुरुवात करतं ते तिच्या स्वयंवरापासून. स्त्रियांसाठी नवरानिवडीचं स्वातंत्र्य तेव्हा जवळपास संपल्यात जमा होतं. द्रुपदराजानं आपल्या मुलीसाठी तोलामोलाचा नवरा निवडण्यासाठी मोठीच कठीण परीक्षाच ठेवली होती. द्रौपदीला मिळवू पाहणाऱ्याने हवेत चक्राकार फिरणा-या माशाच्या डोळ्याचा खाली पाण्यात पाहत धनुष्याने लक्ष्यभेद करायचा होता. हे अवघड काम करू शकणारे कर्ण आणि अर्जुन असे दोनच धनुर्धारी. पण, कर्णाची जात आडवी आली. त्यामुळे क्षत्रियत्वाचा तोरा मिरवणाऱ्या द्रुपदाला तो नकोसा होता. द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न याने धनुष्य उचलू पाहणा-या कर्णाला मोडता घातला. त्यामुळं खवळलेल्या कर्णानं सरळ युद्धाचाच पवित्रा घेतला. तोपर्यंत अज्ञातवासात असलेले पांडव वारणावतातील लाक्षागृहात जळून खाक झाले होते, ही अफवा सर्वजण खरी मानून चालत होते. मग कर्णासारख्या महारथीसमोर धृष्टद्युम्न आणि इतर राजांचा काय निभाव लागणार? कौरवांसोबत असला, तरी कर्ण सुसंस्कृत आणि धर्मप्रिय व्यक्ती म्हणून ओळखला जात होता. समाजाचे कायदेकानून सांभाळत होता. मग आपल्या भावाचं मरण टाळायचं असेल, तर कर्णाला कसं थोपवावं, हा विचार द्रौपदीनं करणं साहजिक आहे. ‘‘मी सूतपुत्राला वरणार नाही..’’ इति द्रौपदी. युद्धानं जे झालं नसतं, ते द्रौपदीच्या या एका वाक्यानं केलं. प्रचलित धर्म सांभाळण्याबाबत ख्याती असलेल्या कर्णाच्या बरोब्बर बाण वर्मी लागला. तेजोभंग झालेला हा योद्धा हात चोळत जागेवर जाऊन बसला. भावाचे प्राण वाचवणारी द्रौपदी मात्र एक अहंमन्य राजकन्या म्हणून इतिहासात बदनाम झाली.

दुसरा प्रसंग द्रौपदीच्या नव-यांच्या बाबतीतला. दुर्योधनाचं द्यूत खेळण्याचं निमंत्रण धर्मराज युधिष्ठिरानं स्वीकारलं. अट्टल जुगारी शकुनीच्या फाशांत अडकून राज्यासकट सर्वच गमावलं. स्वत:बरोबर भाऊदेखील पणाला लावले. हरला आणि कौरवांचा गुलाम होऊन बसला. गुलामांचा कशावरच हक्क नसतो. त्यामुळं द्रौपदी आता स्वतंत्र स्त्री होती. तरीही, युधिष्ठिरानं तिलादेखील पणाला लावली. हा शेवटचा डावही तो हरला. द्रौपदी कौरवांची दासी बनली. भरसभेत तिला विवस्त्र करण्याची आज्ञा दुर्योधनानं दु:शासनाला दिली. होऊ घातलेली विटंबना टाळण्यासाठी ती सभेतल्या सर्वाकडं साकडं घालत फिरली. पण, तिच्या मदतीला कुणीही धावलं नाही. मोठ्या आशेनं भीष्माच्या पुढय़ात जाऊन उभी राहिली. काकुळतीनं त्याला विनवलं,‘‘पती गुलाम झाल्यानंतर तो पत्नीला पणाला लावू शकतो काय? याला धर्म म्हणायचा काय ते सांगा?’’ खांदे पाडत भीष्म उत्तरतो,‘‘बाई! धर्म जरी असला, तरी तो बलवानांचाच असतो.’’ पितामह म्हणवणा-या आणि समस्त कुरुवंशाच्या आदराचं प्रतीक असलेल्या भीष्मानंच असं झटकल्यावर धर्माची व्याख्या कुणाकडनं समजावून घ्यायची तिनं?

स्त्रीला विषमतेची वागणूक देणाऱ्या तत्कालीन व्यवस्थेनं आपला पुरुषी व्यवहारवादाचा खुंटा या प्रसंगातून हलवून बळकट केलेला आढळतो. तत्कालीन संस्कृती आणि लोकव्यवहाराच्या चलनवलनाबद्दल द्रौपदीनं मोठंच प्रश्नचिन्ह उभं केलं. या प्रश्नानं सभेतले सारे विद्वतजन हबकले. गोंधळून मोठय़ा आवाजात धर्मशास्त्राबद्दल चर्चा करू लागले. बुभुक्षित लांडग्यांनी वेढलेल्या एका विचारप्रवण विदुषीची आर्त हाक त्या कोलाहलात विरून गेली. पत्नीला जुगारात लावूनही धर्मशील म्हणवल्या जाणाऱ्यांचा हा बुळगट पांडवप्रताप’! हा सारा प्रसंग महाभारताच्या सभापर्वात येतो. त्याचं वर्णन करताना बॅनर्जी यांच्या लेखणीनं अचानक लख्ख तळपणाऱ्या तलवारीचं रूप घेतलं असावं, असंच वाटतं. त्या तलवारीची धार एवढी तेजतर्रार, की आपण कापले गेलोय, हे मानेलाही कळू नये.

भारतीय संस्कृती कर्मठतेच्या समेवर पोहोचली होती, हे दाखवणारे सारे दाखले द्रौपदीच्या बाबतीत ठळकपणे आढळतात. सत्यवती, कुंती आणि द्रौपदी.. महाभारतातली ही तिन्ही महत्त्वाची स्त्री पात्रं समाजव्यवस्था पुरुषकेंद्री आणि प्रतिगामी कशी होत चालली होती, हे दाखवतात. सत्यवतीचा औरस मुलगा विचित्रवीर्य आणि लग्नाआधीचा व्यास. पण, व्यासमुनींना कौरव-पांडव पितामह म्हणत. तसेच, सत्यवतीदेखील आपल्या या अनौरस मुलाला अभिमानानं मिरवत असे. सत्यवतीची नातसून कुंती. म्हणजे दोघींमध्येही साधारण दीड-दोन पिढय़ांचा फरक. पण, कर्णाला मुलगा म्हणून कवटाळण्याचं धैर्य काही कुंतीला होऊ शकलं नाही. तेव्हा नियोगाच्या पद्धतीला मान्यता असल्यानं इतर मुलांच्या बाबतीत कुंतीकडं कुणी बोट दाखवू शकलं नाही, हे बरंच म्हणायचं! द्रौपदीचं तर असं काहीच नव्हतं. पण, तरीही पाच पांडवांची बायको म्हणून ती हेटाळणीचा विषय ठरली. खुल्या असलेल्या भारतीय समाजात महाभारत काळात झपाटय़ाने लोकव्यवहाराचे निकष कसे बदलत गेले, हे दाखवणारा महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तऐवज म्हणजे महाभारत!

पाच पती असूनही हस्तिनापूरच्या दरबारात त्यांचा पुरुषार्थ आपल्या लज्जारक्षणासाठी पुरा पडला नाही, ही खंत पांचालीला जन्मभर सतावत राहिली असणार. सामायिक मालकी असलेल्या वस्तू जरा निष्काळजीपणेच हाताळल्या जातात. बसगाडय़ा नाही तर रेल्वेची अवस्था पाहिल्यावर हे पटतं. पण, त्यांना निषेधाच्या प्रतिक्रिया नोंदवता येत नाहीत. इथे तर जिवंत भाव-भावना असलेली पांचालीसारखी मानी स्त्री होती. राग मुकाटय़ानं गिळून ती पुनश्च पतिसेवेत रत झाली, तरी अपमानाची डागणी धुवून निघाली नसणार. पहिला पांडव असलेल्या कर्णाविषयीचं तिचं आकर्षण यातूनच उफाळून आलं असावं. बॅनर्जींनी कादंबरीतले कर्णाविषयीचे तिचे विचार स्पष्टपणे ह्या आकर्षणाचं सूतोवाच करतात. ती कृष्णाला पाठिराखा मानते, तसा राजकीय मुत्सद्दीपणा शिकवणारा गुरुदेखील. रात्रीच्या अंधारात अश्वत्थाम्यानं द्रौपदीची सर्वच्या सर्व मुलं कापून काढली. संतापाच्या आगीत पेटून उठलेल्या द्रौपदीचा अश्वत्थाम्याच्या कपाळावरचा मणी काढेपर्यंतचा आकांत अंगावर शहारे आणतो. सुडाची भावना संपली. पण पुत्रविरहाचं दु:ख मरेपर्यंत सोबत करणार, हे सत्य उमगल्यानंतर ती कोसळून पडते. बॅनर्जींनी सारेच क्षण जिवंत केले आहेत.

महाभारताची इतिश्री करणारा शेवटचा प्रसंग पांचालीवर सर्वात जास्त अन्याय करणारा आहे. ती आणि पाच पांडव स्वर्गाची वाट चढत असतात. क्रमाक्रमाने ती आणि इतर चार पांडव मरून पडतात. एकटा युधिष्ठिर सदेह स्वर्गारोहण करतो. सर्वात आधी द्रौपदी मरते. तिच्या अगोदर मरण्याचं कारण अथवा तिनं गृहस्थाश्रमात केलेलं पाप कोणतं, तर पाच पांडवांमध्ये तिचा ओढा अर्जुनाकडं सर्वाधिक होता. (जरी तिनं व्यासमुनीनं आखून दिलेल्या गृहस्थाश्रमाचं काटेकोरपणे पालन केलं असलं तरी. केवळ मनातच ठेवलेल्या या अधिकच्या प्रेमभावनेबद्दल तिला सर्वात अगोदर मरण्याची शिक्षा!)

महाभारतानं द्रौपदीला ठरवून दिलेल्या भूमिकेचं समर्थन करत असल्याचा आवेश बॅनर्जींनी द्रौपदीच्या तोंडी घातलेल्या निवेदनात अजिबात नाही. पण, परिस्थितीच्या हातचं खेळणं बनल्याची हताशा मात्र जरूर आहे. त्यामुळं पुरुषसत्ताक वर्चस्ववादी व्यवस्थेनं विद्ध केलेल्या या असामान्य चरित्रनायिकेची वाचकांना ओळख करून देणं आवश्यक होतं. पॅलेस ऑफ इल्युजन्सनं हे काम अगदी चोख बजावलं आहे.

लिहिता सर्जन...!



नेचरअथवा लॅन्सेटसारख्या एका विशिष्ट वर्तुळात फिरणा-या मासिकांना फारसा वाचकवर्ग नसतो. कारण, त्यातलं लिखाण जितकं अभ्यासनीयअसतं, तितकं ते वाचनीयठरेलच, याची खात्री देता येत नाही. कारण, या माहितीपर लेखांची क्लिष्ट आणि बोजड परिभाषा. अ‍ॅरिस्टॉटलच्या सौंदर्यशास्त्राशी उभा दावा मांडून लिहिण्यात आलेले हे लेख सर्वसामान्य वाचकांच्या नजरेत निर्जीव आणि शुष्क ठरतात. म्हणूनच वाचकांनी डॉक्टरमंडळींकडून उच्च अभिरुचीच्या साहित्याची अपेक्षा करणं, म्हणजे त्यांनी खरडलेलं प्रिस्क्रीप्शन आपल्याला समजावं, अशी अपेक्षा करण्यासारखं आहे. त्यामुळंच द एम्परर ऑफ ऑल मालडीज् : अ बायोग्राफी ऑफ कॅन्सरला नॉन फिक्शन गटात मिळालेलं पुलित्झर आश्चर्याचा सुखद धक्का देतं नि सिद्धार्थ मुखर्जीच्या साहित्यिक कर्तृत्वावर शिक्कामोर्तबही करतं. मुखर्जी यांचं वैद्यकशास्त्रातील कौशल्य आणि उत्कृष्ट लेखनकलेच्या बाबतीतलं सव्यसाची सर्जन अगदी लखलखीतपणे दाखवून देणारं हे पहिलंच पुस्तक आहे.

या पुस्तकाच्या स्पर्धेत निकोलस कार यांचं द शॅलोज् : व्हॉट द इंटरनेट इज डूइंग टू अवर ब्रेनआणि एस. सी. ग्वायनी यांचं एम्पायर ऑफ द समर मूनही पुस्तकं होती. परंतु, मायकेल स्कूब, अर्नोल्ड इसाक्स आणि रॉबर्ट ली हॉत्झ यांच्या ज्युरीमंडळानं द एम्परर ऑफ मालडीज्ला सरस ठरवत त्यावरच पुलित्झरसाठी शिक्कामोर्तब केलं. हे पुस्तक केवळ केस स्टडीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. कारण, ते कॅन्सरला कथेच्या केंद्रस्थानी ठेवून सुमारे दोन हजार वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक दस्तऐवजांनिशी प्रवास सुरू करत तत्कालीन सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेचा धांडोळा घेत समकालीन वास्तवाच्या विश्वाची सफर घडवून आणतं. मानवजातीचा प्रदीर्घ काळापासून कॅन्सरशी लढा सुरू आहे. या आजाराचं उच्चाटन करण्यासाठी वैद्यकशास्त्रानं जे प्रयत्न केले, त्या प्रत्येक टप्प्यावरचं चित्रण या पुस्तकात आहे. डॉक्टरांच्या चित्रविचित्र प्रयोगात स्वखुशीनं गिनी पिगबनलेल्या कॅन्सरग्रस्तांची हृदयद्रावक कहाणी आहे. अठराव्या शतकाच्या शेवटी कॅन्सरवर केवळ शल्यक्रिया हाच पर्याय असल्याचा ठाम समज असलेलं वैद्यकशास्त्र केमोथेरपीचा वापर करायला शिकलं. आता केमोथेरपीसह विविध आयुधांचा गरजेनुसार एकत्रित वा वेगवेगळा वापर होतो आहे.

कॅन्सरला अद्यापही वाघाची गुहा समजलं जातं. तीत प्रवेश करणा-याला पुन्हा परतीची वाट नसते, हा गैरसमज मोठय़ा प्रमाणावर प्रचलित आहे. पण, नवनव्या उपचारांमुळे बरे होण्याचे अथवा जीव वाचण्याचं प्रमाण वाढलं आहे. मुखर्जी यांच्या पुस्तकाचा रोखही तोच आहे. कुठली तरी गोष्ट अगदी आतून शरीर पोखरून टाकत चालल्याची किंवा आजारी पडल्याची भावना वाटत असूनही आपल्याला नेमकं काय होतंय, याचा अंदाज रुग्ण बांधू शकत नाही. कॅन्सरभोवती असलेलं हे गूढ भयग्रस्ततेचं वलय हटवणं, हा आपल्या पुस्तकलेखनाचा उद्देश होता, असं मुखर्जी यांनी एका मुलाखतीत यापूर्वीच सांगितलंय. कॅन्सरवर उपचार करणारी तज्ज्ञमंडळी ज्या गोष्टींमुळे टेकीस येत, त्याच वातावरणात मुखर्जीही काम करत होते. अजूनही करतात. पण, या आजारावर विजय मिळवण्याचं स्वप्न ते कायमच पाहत आलेत. ज्या डॉ. डेव्हिड स्कॅडन यांच्या मार्गदर्शनाखाली मुखर्जी यांनी हार्वर्ड विद्यापीठात उच्च शिक्षण घेतलं, त्या स्कॅडन यांनी विद्यार्थीदशेतल्या मुखर्जी यांच्या पुलित्झरच्या निमित्तानं आठवणी जागवताना भविष्याचं आशादायी स्वप्न रंगवणारा मनुष्य,’ असंच वर्णन मुखर्जीचं वर्णन केलं!

सध्या अमेरिकेत कॅन्सरचे सुमारे 15 लाख रुग्ण आहेत. भारतातही ही संख्या जवळपास दुप्पट आहे. त्यात वर्षागणिक दहा हजार रुग्णांची भर पडते आहे. कॅन्सरभोवती असलेलं अनावश्यक फोबियाचं वलय झुगारून देऊन त्या आजाराला सामोरं कसं जायचं, याच्या प्राथमिक तयारीसाठी मदतीला येणारं आणि कॅन्सरशी झुंज द्यायला सज्ज करणारं हे पुस्तक मुळातूनच वाचणं गरजेचं आहे. अमेरिकन वाचकांनी तशी पसंतीची मोहोरही या पुस्तकावर उमटवली आहे. म्हणूनच टाइम’, ‘न्यूयॉर्क टाइम्सआणि ऑफ्रा मॅगझीनच्या 2010च्या बेस्टसेलरच्या यादीत या पुस्तकाचा समावेश होता.

चाळिशीत असलेल्या मुखर्जी यांचा जन्म दिल्लीत झाला. प्राथमिक शिक्षण तिथेच घेतल्यानंतर पदवी मिळवण्यासाठी ते स्टॅनफर्ड विद्यापीठात दाखल झाले. स्टॅनफर्डविषयी त्यांना लहानपणापासूनच अतीव आकर्षण होतं. दहावीत असताना त्यांचे वडील शिबेश्वर आपल्या मुलाला घेऊन स्टॅनफर्ड आणि हार्वर्ड दाखवण्यासाठी घेऊन गेले होते. त्या वेळी स्टॅनफर्डमध्ये एकापेक्षा एक विद्वान मंडळी शिकवत. नोबेल पारितोषिक मिळवणा-या प्राध्यापक मंडळींना तिथं तोटा नव्हता. त्यांना पाहून प्रभावित झालेल्या सिद्धार्थनं हार्वर्डऐवजी स्टॅनफर्डलाच पसंती दिली. स्कॉलरमंडळी ज्या शिष्यवृत्तीसाठी अक्षरश: जीव टाकतात, ती ऑक्सफर्ड विद्यापीठाची -होड्स स्कॉलरशिपही त्यांनी पटकावली. हार्वर्डमधून पीएच. डी. मिळवल्यानंतर ते अमेरिकेतच स्थायिक झाले. सध्या ते कोलंबिया विद्यापीठामध्ये वैद्यकशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. याच विद्यापीठाच्या हर्बर्ट आयर्विग कॉम्प्रेहेन्सिव सेंटरमध्ये त्यांचं कॅन्सरपेशींवर मूलभूत संशोधन सुरू आहे. कॅन्सरविषयक त्यांच्या संशोधनाबद्दल टाइमनं त्यांचा जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश केला होता.

कॅन्सरविषयीचा भयगंड दूर करण्यासाठी सुरू झालेला हा प्रवास लांब पल्ल्याचा आहे. त्याचे काही टप्पे वैद्यकशास्त्रानं यशस्वीरित्या पार केले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत परिस्थिती बरी आहे. कॅन्सरच्या काही प्रकारांवर पूर्णाशानं नसलं, तरी बहुतांशी नियंत्रण मिळवण्यात वैद्यकशास्त्र यशस्वी ठरत आहे. शत्रू कोण आहे, हे एकदा हुडकून काढलं म्हणजे त्याच्याविरुद्ध रणनिती आखायला सोपं जातं. व्यूहरचनेबरहुकूम शत्रूचा नि:पात करता येतो. पण, कॅन्सरच्या समूळ नाशाची रणनिती अद्यापपावेतो ठरवताच आली नव्हती. पण, कॅन्सरपेशींवर सुरू असलेले संशोधन ही रणनीती सिद्ध करण्यास यशस्वी ठरेल, असा संशोधकांना विश्वास वाटतो आहे. त्यामुळे सकारात्मक भविष्याची आशा करत हा लढा सुफळ संपूर्ण केल्याशिवाय मानवजात राहणार नाही.

Thursday, April 28, 2011

बिनचेह-यांची आत्मकथा



तब्बल शंभर वर्षाचं आयुष्य जगलेल्या उल्रिकसारख्या सर्वसाधारण माणसाची आत्मकथा राणा दासगुप्तानं ‘सोलो’तून चितारली आहे. कर्तृत्वसंपन्न आयुष्य जगण्याची त्याची महत्त्वाकांक्षा परिस्थिती कशी थिजवून टाकते, हे त्यानं पुस्तकातून मांडलंय. सातत्याने बदलणा-या परिस्थितीच्या आवर्तनांमध्ये गुरफटलेला उल्रिक वाचकांना खिन्न करतो. विसाव्या शतकाचा पूर्वार्ध स्फोटक होता. त्यात दोन महायुद्धं लढली गेली. लाखो माणसं मेली. एक क्रांतिकारी विचारधारा उदयाला आली. महायुद्धांत मेलेल्यांइतकेच बळी देऊन तिचं स्वागत करावं लागलं. या सगळ्या स्थित्यंतरांमधून नागमोडी वळणं घेत उल्रिकचं आयुष्य सुरू राहिलं. तो दीर्घ आयुष्य जगला. पण पाहिजे ते नाही बनू शकला!!

मनुष्य बली होत नहीं
समय होत बलवान!
भिल्लन लुटै गोपिका
वहीं अर्जुन, वहीं बाण!!

परिस्थितीचं सामर्थ्य इतक्या चपखल शब्दांत आणि चार ओळींत कबिरानं सांगून टाकलंय. कुरुक्षेत्रावर अर्जुनाने खेचलेल्या गांडीव धनुष्याच्या प्रत्यंचेचा नुसता टणत्कार ऐकून मी-मी म्हणणा-या अतिरथींनी शस्त्रं टाकली. युद्ध संपल्यानंतर त्याच अर्जुनावर श्रीकृष्णाने गोपिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवीत, त्यांना द्वारकेत पोहोचवायला सांगितलं होतं. पण रानटी भिल्लांच्या हल्ल्यापुढे अर्जुनाचं क्षात्रतेज गळून पडलं. त्याच्या डोळ्यांदेखत भिल्लांनी गोपिकांचं हरण केलं. द्रोणाकडून धनुर्विद्या शिकलेला, इंद्राचा आशीर्वाद लाभलेला आणि शंकराकडून पाशुपातास्त्र मिळवलेला हा अर्जुन त्या वेळी एवढा गलितगात्र का झाला असावा? त्याचं देवत्व एका क्षणापुरतं मान्य करूनही त्याला परिस्थितीनं कसं हतबल बनवलं, हा प्रश्न डोकं पोखरणारा आहे. ज्याने कौरवांच्या अठरा अक्षौहिणी सैन्याचा नाश केला, त्या अर्जुनाने भिल्लांवर सोडलेले बाण निष्प्रभ कसे ठरले असावेत? त्याचं अवतारकार्य संपुष्टात आलं होतं, असं ‘टिपिकल मायथॉलॉजिकल’ उत्तर मानून हा प्रश्न सोडून देण्यासारखा नाही. ‘परिस्थिती’ हाच विषय केंद्रस्थानी ठेवून लिहिणा-या लेखकांची संख्या फार कमी आहे. पण भारतीय वंशाच्या आणि इंग्लंडमध्ये वाढलेल्या (आता दिल्लीत स्थायिक) राणा दासगुप्ताने ‘परिस्थिती’ या विषयाच्या अनुषंगाने ‘यूँ होता, तो क्या होता’ अशा पठडीतली अप्रतिम कादंबरी लिहिलीय. ‘सोलो’ असं शीर्षक असणारी ही कादंबरी प्रस्थापित समाजव्यवस्थेत होणाऱ्या व्यक्तिगत आकांक्षांचा कोंडमारा दाखवते. वाचकाला उदास मनस्थितीत ढकलते. उल्रिक नावाचं पात्र कादंबरीचा नायक आहे. युरोपात घरघर लागलेली सरंजामदारी व्यवस्था, तिचं पतन, पहिलं महायुद्ध, साम्यवादाचा उदय, हिटलरची रक्तरंजित कारकीर्द, दुसरं महायुद्ध, या युद्धानंतर ‘सुपरपॉवर’ झालेल्या रशियाने गलितगात्र बाल्कन राष्ट्रांच्या गळ्यात घातलेला साम्यवादाचा फास, मार्क्‍सच्या तत्त्वज्ञानाची पूर्व युरोपातून झालेली पीछेहाट आणि लोकशाहीपाठोपाठ आलेली मुक्त अर्थव्यवस्था..इतका दमवणारा कथापट राणा दासगुप्तानं ‘सोलो’तून उभा केलाय. एवढ्या सामाजिक स्थित्यंतरांचे ताणे-बाणे अनुभवणा-या उल्रिकला म्हणूनच त्यानं शंभर वर्षाचं आयुष्य बहाल केलंय. जगाच्या पाठीवर किमान तीनशे पन्नास कोटी लोक राहत असतील, तर उल्रिकदेखील त्यांच्यापैकीच एक! समाजाच्या लेखी कर्तृत्ववान आयुष्य जगून पुरुषार्थ सार्थकी लावावा, अशी इतरांप्रमाणेच त्याचीसुद्धा इच्छा आहे. पण परिस्थितीमुळे सपक आयुष्य त्याला जगावं लागतं. ते का जगावं लागलं, याची तर्कशुद्ध कारणमीमांसा पुस्तकातून होते. लोकशाही आणि साम्यवादी व्यवस्थेतल्या परिस्थितीमध्ये प्रचंड फरक आहे. व्यष्टीपेक्षा समष्टी महत्त्वाची, हा विचार साम्यवादाच्या केंद्रस्थानी आहे. तुम्हाला मोठेपणी काय बनायचंय हो? अशी वास्तपुस्त या व्यवस्थेत कोणी करत बसत नाही. ‘स्व’ला तिलांजली देऊन समाजहिताला प्राधान्य देत कल्याणकारी लोकराज्याची निर्मिती करावी, असं स्वप्न पाहत युरोपात साम्यवादाचा प्रयोग राबवण्यात आला. या प्रयोगातून कुणीच सुटलं नाही. साम्यवादी जोखडाखाली घुसमटून गेलेल्या शास्त्रज्ञांना कारखान्यात मजूर म्हणून काम करायला लागलं आणि बुद्धिवाद्यांनी आपापली प्रतिभा छळछावण्यांमध्ये शेवटचे आचके घेताना पाहिली. उल्रिकनं आपलं उमेदीचं आयुष्य एका साम्यवादी व्यवस्थेत घालवलं, हे इथं लक्षात घ्या. या व्यवस्थेच्या उदात्त सामाजिक हेतूंबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण त्याच व्यवस्थेनं उल्रिकच्या महत्त्वाकांक्षेचा गळा घोटला. साम्यवादाच्या राबवणुकीतून उद्भवलेली ‘परिस्थिती’ इतकी बलिष्ठ बनली की, उल्रिक आणि त्याच्यासारख्या कित्येकांना या ‘परिस्थिती’शी जुळवून घ्यावं लागलं. मोर्चे, उपोषणं आणि निवेदनं असले लोकशाही मार्ग येथे निषेधासाठी उपलब्धच नव्हते. बीटल्सची एखादी ध्वनिमुद्रिका जरी कुणाच्या घरात सापडली, तरी सैबेरियाच्या थंडीत कुडकुडून मरण्यासाठी त्याची रवानगी व्हायची. परिस्थितीची प्रतिकूलता साम्यवादी व्यवस्थेतून धारदारपणे रेखाटता येईल, याच हेतूपोटी बहुधा लेखकाने कादंबरीत उल्रिकचं कर्मभूमी म्हणून बल्गेरियाची निवड केली असावी. अशी परिस्थिती साऱ्या पूर्व युरोपातच त्या वेळी निर्माण झाली होती. त्यामुळे उल्रिकसारखं बिनचेह-याचं आयुष्य जगलेल्या, साम्यवादाच्या वरवंट्याखाली चेचून गेलेल्या आणि कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी न मिळालेल्या हजारो जणांची ती आत्मकथा बनली आहे. परिस्थिती पालटवून यश मिळवल्याचा दावा अनेक जण करतात. यशासाठी बदललेल्या ‘परिस्थिती’ला ‘क्रेडिट’ जसं आपण देतो, तसं अपयशाचं पितृत्वदेखील ‘परिस्थिती’लाच स्वीकारायला लावावं. कारण यश-अपयश परिस्थितीजन्यच असतं, असा विचार लेखकानं या पुस्तकातून मांडलाय. त्याला पलायनवादी वृत्तीचा म्हणून हिणवण्यात काही अर्थ नाही. याही विचारावर विचार व्हावा, एवढीच लेखकाची अपेक्षा असावी. अमुक-अमुक शंभरीपार जगले किंवा जगतायत, याची गिनीज बुकात नोंद होते. बेभरवशाचं आयुष्य झालेल्या या जगात इतकी र्वष जगणा-या माणसांचं कौतुक होणं, ही गोष्ट स्वाभाविकच मानली पाहिजे. रोजचा व्यायाम कधी चुकवला नाही, इतकं सोडलं तर त्यांच्याबद्दल आणखी काही कळायला मार्ग नसतो. वय वगळता त्यांच्याबद्दलच्या बाकीच्या गोष्टींना या बुकात जागा नसते. इतरांनाही केवळ त्यांच्या दीर्घायुष्याचंच अप्रूप असतं. ही माणसं काही आत्मचरित्र लिहायच्या फंदात पडत नाहीत. कारण सामान्यांच्या आत्मकथांना वाचक नसतो. समाजही आदर्श व्यक्तिमत्त्वांच्याच शोधात असतो. कारण भविष्याची उत्तुंग स्वप्नं सजवण्यासाठी त्याला प्रेरणेची गरज असते. हे तथाकथित आदर्शदेखील आपल्या यशाचं ‘मार्केटिंग’ करण्यात तरबेज असतातच. ‘सॉलिड रिटर्न्‍स’ मिळवून देणा-या विम्याच्या ‘पॉलिसी’ची जाहिरात आपण टीव्हीवर पाहतो. त्याच वेळी मुंग्यांएवढ्या अक्षरांत धोक्याची सूचना देणारी ओळ चटकन नजरेसमोरून सरकून जाते. आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या आत्मकथांमध्येदेखील अशा धोक्याच्या ओळी गाळलेल्या असतात. यशाचं ‘पावित्र्य’ कमी करणं त्यांना परवडणारं नसतं. त्यांनी ठरवलेल्या या ‘उंची’ फूटपट्ट्या लावल्या, की इतरांनी त्यांच्या परीने आयुष्याशी केलेला झगडा आपोआपच बिनमहत्त्वाचा ठरतो. यशाचं परिस्थितीजन्य मूल्यमापन अधोरेखित करण्याचा लेखकाचा उद्देश या कादंबरीतल्या आईनस्टाईनच्या कथेनंतर पूर्ण होतो. पण ‘ साठा उत्तराची कहाणी सुफळ’ करणारा कादंबरीचा शेवट वाचताना असं वाटतं की, लेखकानं स्वत:च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेऊन ही कादंबरी अजिबात न पटणा-या ‘मेलोड्रॅमॅटिक’ पद्धतीनं संपवली आहे. बहुधा तोच आपण निर्माण केलेल्या या पात्राच्या इतक्या प्रेमात पडला की, सहानुभूतीचा फायदा देऊन उल्रिकला आपल्या आयुष्याचा शेवट गोड करण्याची मुभा त्याने दिली असावी, अशी शंका घ्यायला जागा आहे. -
‘कुणी नाही’ची आईनस्टाईनशी भेट

उल्रिकचा जन्म पहिल्या महायुद्धाच्या थोडासा अगोदर झालाय! आई आणि वडील बल्गेरियातल्या एका खेडय़ात लहानाचे मोठे झालेले. त्यांच्या पिढीत शिकणारे ते पहिलेच. हे त्रिकोणी कुटुंब सोफिया या राजधानीच्या शहरात राहतंय. रेल्वे कंपनीत इंजिनीअर म्हणून काम करणा-या त्याच्या वडिलांना जर्मनीच्या प्रगतीचं फार अप्रूप आहे. जे जे जर्मन म्हणून काही आहे, त्या सर्व गोष्टींच्या ते प्रेमात आहेत. आपल्या पोराचं ‘उल्रिक’ हे जर्मन नाव त्यांनी याच भावनेतून ठेवलंय. बर्लिनहून बगदादला जाणारा रेल्वेमार्ग तयार करण्याचं काम त्यांची कंपनी करीत आहे. उल्रिकचे वडील महत्त्वाकांक्षी आणि विज्ञानप्रेमी! विज्ञानाच्या साहाय्यानं प्रस्थापित व्यवस्थेत सुधारणा करीत राहण्याचं आपलं काम आहे, या भावनेनं वागणारे! पहिलं महायुद्ध सुरू होतं. जर्मनीचा अपमानजनक पराभव होतो. जगभर मानखंडना व्हावी, अशा अपमानजनक अटी व्हर्सायच्या तहानं जर्मनीवर लादल्या जातात. या संपन्न राष्ट्राचं वैभव लयाला जातं. रेल्वे सुरू करून मध्य आशियात प्रभाव निर्माण करण्याची जर्मन महत्त्वाकांक्षा खच्ची होते. वडिलांचं कामही जातं. तिथपर्यंत सुबत्तेत जगलेल्या उल्रिकच्या कुटुंबाला आर्थिक चटके बसू लागतात. त्यातून संगीतात ‘करिअर’ घडवण्याचं स्वप्न पाहणारा उल्रिक ‘पर्याय’ म्हणून रसायनशास्त्रात आवड ‘उत्पन्न’ करतो. जिवाभावाचा मित्र बोरिस ह्याला मात्र मनसोक्त आयुष्य जगताना तो पाहत असतो. बोरिसच्या संगीतप्रेमानं तो कधी जळफळतोही आणि मित्र आपली आवड पुढे नेत असल्याबद्दल समाधानही पावतो. बल्गेरियन सरकारविरुद्ध बंड पुकारल्याबद्दल विशीतल्या बोरिसला गोळ्या घातल्या जातात. एव्हाना घरची परिस्थिती फारच बिकट बनलेली असते. बर्लिनमधलं रसायनशास्त्राचं शिक्षण आणि ज्यू युवतीवरचं प्रेम अध्र्यावर सोडून सोफियात परतलेला उल्रिक लग्नाच्या बंधनात अडकतो. पण ते अपयशी ठरतं. सगळी भौतिक सुखं आपल्या पायाशी असावीत, अशी त्याच्या बायकोची इच्छा! नोकरी सोडण्याचं टुमणं ती त्याच्यापाठीमागे लावते. परिस्थितीनं हतबल झालेला उल्रिक नोकरी सोडू शकत नाही.. मग बायको नव-यालाच सोडते. एका धर्मगुरूबरोबर पाट लावून अमेरिकेत दुसरं आयुष्य सुरू करायला निघून जाते. दोन वर्षाचं पोरगंही तिच्याबरोबरच नेते. उल्रिक एकटा पडतो. आयुष्य एकसुरी बनतं. दुस-या महायुद्धापर्यंतचं ‘सोलो’चं कथानक तुफान वेगानं पुढं सरकतं. सारं काही विसरून उल्रिक पुन्हा आयुष्य सावरायला धडपडू पाहतो. पण तोपर्यंत ती ‘परिस्थिती’ उद्भवलेली असते. रशिया बल्गेरियासकट सगळी बाल्कन राष्ट्रं पंखांखाली घेते. साम्यवाद अंमलात येतो. लेखकानं उल्रिकची परवड, ह्याच एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं असलं, तरी दुसरीकडे वाचक म्हणून बाल्कन राष्ट्रांमधील कायमचीच उफराटी सामाजिक स्थितीदेखील आपल्या मनात रूतत राहते. मध्ययुगापासूनच बाल्कन अस्मितेला आणि संस्कृतीला इतरांनी कायम सुरुंग लावलेत. या प्रदेशाला ऑस्ट्रियन साम्राज्याच्या माळेत गुंफण्यात आले. ऑटोमन तुर्कानी त्याचे लचके तोडले. जर्मनीने बोचकारले. रशियाने ओरबाडले. ‘नाटो’ने लष्करी तळ प्रस्थापित केले. या सा-यांच्या बलात्काराने गलितगात्र झालेली अनेक बाल्कन राष्ट्रं सध्यादेखील अशांतच आहेत. साम्यवाद जाऊन नावापुरती लोकशाही आली, तरी अजूनही बहुतांशी ‘परिस्थिती’ तीच आहे.. उल्रिकच्या जमान्यातली! साम्यवादी व्यवस्थेशी जुळवून घेतलेला उल्रिक नव्या उमेदीनं आयुष्यात रंग भरू पाहतो. वर्षामागून र्वष जातात. अपयशी ठरलेल्या साम्यवादाची जागा लोकशाही घेते. नव्या व्यवस्थेबरोबरच नवी ‘परिस्थिती’ जन्माला येते. लोकशाहीमध्ये सर्वाना विकासाची समान संधी मिळत असली, तरी उल्रिकचं म्हातारपण तिचं चीज करायला असमर्थ ठरतं. आयुष्याच्या उतरणीला अंधत्वाशी सोबत करणारा उल्रिक तोपर्यंतच्या सा-या घटनांची जुळवाजुळव करतो..संगती लावतो.. उत्तरं शोधतो. अपूर्ण आयुष्य जगल्याची रूखरूख आयुष्याच्या संधिकाळी त्याला खंतावत असते. आईनस्टाईनची गहाळ झालेली महत्त्वाची कागदपत्रं परत करण्याच्या निमित्तानं उल्रिक बालपणी त्याला भेटला होता. त्या वेळी ह्या थोर संशोधकानं उच्चारलेल्या ‘ आय वुड बी नथिंग विदाऊट यू’ या आशीर्वादपर शब्दांनी उल्रिकच्या कायमचं घर केलेलं आहे. ‘आपणही कुणी तरी आहोत’ हा त्याचा अहम् हे वाक्य कायम कुरवाळत राहिलं. पण तो ‘कुणी तरी’ बनलाच नाही. मग एवढ्या महान व्यक्तीचे बोल खोटे कसे ठरले, याच प्रश्नाने त्याचा पिच्छा पुरवला. बराच काळ लोटल्यानंतर आईनस्टाईनच्या वाताहात झालेल्या कौटुंबिक आयुष्याबद्दल कळतं. कमावलेलं यश जपण्यासाठी आपण बायका-मुलांना खड्यासारखं वगळलं, याचा सल आईनस्टाईनच्या मनात सदैव होता आणि ह्या अपराधीपणाच्या भावनेतूनच हा जगद्विख्यात शास्त्रज्ञ उल्रिकजवळ ‘ते’ शब्द बोलून गेला. त्याच्या यशाची चिरेबंदी कमान ही कुटुंबीयांच्या बलिदानावर उभी राहिली होती, या एका सत्याचा उलगडा झाला. उल्रिकला पडलेल्या निम्म्या प्रश्नांची उत्तरं या सत्यानं दिली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आईनस्टाईनभोवतालची ‘परिस्थिती’ त्याचं यश वाढवत राहिली. अन्यथा, हिटलरच्या राजवटीत आईनस्टाईनच्या तोडीच्या शास्त्रज्ञांचं ज्याप्रमाणे शिरकाण झालं, तीच गत त्याचीही झाली असती. ज्या ‘परिस्थिती’नं स्वित्झर्लंडलडमध्ये काम करणा-या मामुली कारकुनाला विसाव्या शतकातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक बनवलं आणि इतरांना मृत्यूच्या दाढेत ढकललं, तीच ‘परिस्थिती’ उल्रिकच्या आयुष्याचं मातेरं करायला कारणीभूत ठरली. आता उल्रिकचे उरले-सुरले प्रश्नही निकालात निघाले.
बहुआयामी, कृतिशील लेखक..
राणा दासगुप्ता हे आजच्या घडीचे, भारतीय वंशाच्या इंग्रजी लेखकांमधले एक अग्रणी. त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९७१ रोजी ब्रिटनमधील कँटरबरी येथे झाला, केम्ब्रिजमध्ये वाढलेल्या राणा यांचं महाविद्यालयीन पदवीचं शिक्षण मात्र ऑक्सफर्डच्या ‘बालिओल कॉलेज’मध्ये झालं. नंतर अमेरिकेत, विस्कॉन्सिन प्रांताची राजधानी मॅडिसन इथल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन’मध्ये ते शिकले आणि वयाची तिशी पार केल्यानंतर दिल्लीतच राहू लागले. ‘सोलो’ ही त्यांची दुसरी कादंबरी, त्याआधी २००५ मध्ये ‘टोकिओ कॅन्सल्ड’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि ब्रिटिश ललितलेखनाच्या प्रतिष्ठेच्या ‘जॉन लेवलिन ऱ्हाइस पारितोषिका’साठी ‘संभाव्य पाच’ पुस्तकांच्या यादीपर्यंत तिनं धडक मारली. याच यादीत अरविंद अडिगा यांची बुकर-विजेती ‘व्हाइट टायगर’देखील होती (आणि तीही बक्षिसापर्यंत पोहोचली नव्हती), हे विशेष. ‘एकविसाव्या शतकातले, जागतिकीकरणोत्तर काळातले इंग्रजी लेखक’ ही जशी हरी कुंझरू, अरविंद अडिगा यांची ओळख आहे, तशीच ती राणा दासगुप्ता यांचीही आहे, हे नक्की! मात्र बहुआयामी कृतिशीलतेच्या मोजपट्टीवर राणा दासगुप्ता आणखीच सरस ठरतात.. त्यांनी टिपलेली छायाचित्रं, ‘येथे घाण करू नये’ या आज्ञार्थी विधानाची खिल्ली उडवणारी त्यांच्या ब्लॉगची रचना, ‘ग्रॅण्टा’सारख्या प्रतिष्ठित नियतकालिकात दिल्लीमधल्या अतिश्रीमंतांच्या माजलेपणाबद्दल त्यांनी लिहिलेला लेख आणि त्यामागला ‘संजीव नंदा खटल्या’चा संदर्भ.. हे सारं दासगुप्ता यांच्या प्रतिभेची बहुविधता सिद्ध करणारं आहे! सोबतची- आजच्या बल्गेरियातल्या उदास छटा टिपणारी छायाचित्रं अर्थातच राणा दासगुप्ता यांनी टिपलेली आहेत..

Tuesday, April 19, 2011

‘पाऊलो’वाटेवरचं पुस्तक!


" स्व-शोधनाचा दुसरा-तिसरा असा कुठलाही मार्ग नसून तो फक्त प्रेम आहे, हा आग्रही विचार पाऊलो या पुस्तकातून मांडतो. प्रेमात पूर्ण शरणागती आवश्यक असते. एकदा प्रेमाला शरण गेले की, मनात निर्मम भाव उत्पन्न होतो. अशा निर्ममपणातूनच आसक्ती आणि द्वेष या मुख्य मानवी विकारांपासून मुक्तता मिळते आणि आपल्या हृदयात आतापर्यंत दबून गेलेला आत्म्याचा सच्चा आवाज ऐकू येऊ लागतो. पाऊलोच्या पुस्तकाचं आशयसूत्र हे आहे."

मनात असणा-या प्रचंड अंतर्विरोधांवर मात करून एखाद्या निर्णयाची अमलबजावणी करणं हे फारच अवघड काम आहे. त्या अंतर्विरोधांच्या आवर्तनातच इतकं भांबावून आणि भरकटून जायला होतं की, आपण आहे तिथंच बरं आहे, असं मनाशी पक्कं करून आहे त्याच जागी थांबून राहतो. किंबहुना आपला इगोकुरवाळत ठेवता येईल, अशा पद्धतीनं त्या न घेतलेल्या निर्णयांचं समर्थन करतो. कारण, अशा मोठ्या हिकमती निर्णयांबरहुकूम चालण्यासाठी मनात जी जिगर लागते, ती प्रत्येकात असतेच असं नाही. त्या निर्णयाच्या परिणामांचा विचार करूनच अनेकांचं निम्मं अवसान गळतं. त्यातील बहुतांश जण आपण अपयशी ठरू, असा विचार करून पहिलं पाऊल टाकायच्या आतच पाय मागं घेतात. प्रेमासारखा अवघड विषयही त्यातच मोडतो. आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यानं नकार दिला तर काय? त्यामुळे ते व्यक्त न करता मुग्ध स्वरूपातच ठेवलेलं बरं! अनेकांच्या प्रेमाची इतिश्री अशाच पद्धतीने होते. हिकमत आणि नजाकत, अशा दोन गोष्टी प्रेम व्यक्त करायला लागतात.

प्रेम करायला हिकमत लागते, हे माहीत आहे. पण, ते नजाकतीतून कसं व्यक्त होतं, ते अनुभवायला पाऊलो कोहलोचं बाय द रिव्हर प्रेडा, आय सॅट डाऊन अँड वेप्टहे पुस्तक वाचायला लागेल. पाऊलो या पुस्तकातून फक्त प्रेमाबद्दलच बोलतो, असं नाही. कर्मकांडविरहित असा जो धर्माचा मूळ आविष्कार, जो फक्त आणि फक्त प्रेमातूनच व्यक्त होतो, त्याबद्दलही तो या पुस्तकातून वाचकांना सांगतो. मुळात तो त्याचा पुस्तक खपवण्याचा एव्हर हिटफॉर्म्युलाच आहे. तो स्वत: शुद्ध स्वरूपातील धर्म जपण्याचा पुरस्कार करणारा आहे. गूढवादाचं त्याला अतोनात आकर्षण आहे. त्यामुळं त्याला सेमिऑटिक्स’ (ज्याला आपण मराठीत चिन्हशास्त्र असं म्हणतो)च्या भाषेत बोलायची फार खोड आहे. शब्द एखादी गोष्ट सांगत असला, तरी अर्थात काही वेगळंच अनुस्यूत असतं. पाऊलोची पुस्तकं ही अशी असतात. धर्माचा गाढा अभ्यास असला, तरी तो मांडण्याची त्याची हातोटी धर्ममरतडांसारखी पढीक नाही. माणसाला त्याच्या आयुष्याचं प्रयोजन काय आहे, हे सांगण्यासाठी धर्म आहे. कर्मकांडांसाठी तर तो मुळीच नाही. पाऊलो याच गोष्टीचा पुरस्कार करतो. त्यामुळेच त्याच्या पुस्तकांमधून धर्म ठिकठिकाणी डोकावत असला, तरी तो कर्मठ आणि साचेबद्ध नसतो. धर्मानं सांगितलेली जगण्याची मूलभूत तत्त्वं तो स्वत:च्या अनुभवांतून व्यक्त करीत असतो. वॉल्डनकाठी हेन्री डेव्हिड थोरोनं जे प्रयोग केले, त्यातून अमेरिकन रोमँटिसिझमच्या तत्त्वज्ञानाच्या चळवळीला बळ मिळालं. पाऊलोचं हे पुस्तकही याच वाटेवर चालायला लावणारं आहे. या पुस्तकाचं शीर्षकही ज्यू धर्मियांच्या प्राचीन सुक्तांमधील अतिप्रसिद्ध काव्यपंक्तीवर बेतलेलं आहे. बाय द रिव्हर्स ऑफ बॅबिलॉन, देअर वी सॅट डाऊन, वी वेप्ट, व्हेन वी रिमेम्बर्ड झिऑन’, ही ती ओळ! बॅबिलोनियन आक्रमकांनी जेरुसलेम जिंकून घेतलं आणि ज्यूंना मायभूमीतून परागंदा व्हावा लागलं. त्या दु:खाची आठवण म्हणजे, हे काव्य!

प्रेमातसुद्धा अशीच काहीशी मोठी किंमत मोजावी लागते, हे सांगण्यासाठी पाऊलोनं या ओळींचा वापर केला असावा. पुस्तकातील नायिका पिलार ही एका शहरवजा गावातील विद्यापीठात शिकणारी मुलगी आहे. स्वत:चं स्वातंत्र्य जपणारी, जीवनातल्या उलट-सुलट आवर्तनांनी भांबावलेली आणि आयुष्याला समजू पाहणारी! बालवयात आपल्या शेजारी राहणा-या मित्राच्या प्रेमात पडलेली. पण, काही काळानंतर तो स्वत:च्या आयुष्याचा शोध घेण्यासाठी दूर निघून जातो. त्यांचं प्रेम तसंच अबोल आणि अव्यक्त राहतं. तीदेखील नंतर अनेकांच्या प्रेमात पडते. पण, त्यांच्याकडून होणा-या अपेक्षाभंगाचं दु:ख पिलारची पाठ सोडत नाही. प्रेम म्हणजे नेमकं काय, हे कुणालाच कधी कळत नाही, या मतावर ती ठाम होत जाते. हा ठामपणा साहजिकच तिच्या प्रेमप्रकरणांतील अपेक्षाभंगातून आलेला असतो. त्यामुळे मनात उमटणारा भावनांचा फुलोरा चेह-यावर दिसणार नाही, अशा पद्धतीने वागण्यात ती तरबेज झालेली आहे. पण, तेवढ्यात तिच्या आयुष्याला वेगळं वळण मिळतं. पिलारला अचानक बालपणीच्या त्या मित्राचा फोन येतो. तो आता आध्यात्मिक गुरू झालेला असतो. आयुष्यात वावटळीप्रमाणे छळणा-या काही प्रश्नांपासून सुटका करण्यासाठी त्याने धर्माचा आश्रय घेतलेला असतो. त्याची कितीही आजूबाजूच्या परिसरात पसरलेली आहे. ती मात्र अजूनही तशीच आहे, विमनस्क आणि गोंधळलेली! तो तिला एका कार्यक्रमाचं निमंत्रण देतो. काही दिवसांच्या या प्रवासात पिलार आणि तिचा हा मित्र प्रेमासह आयुष्यातल्या ब-याच अतार्किक आणि गूढ गोष्टींबाबत चर्चा करतात. ही चर्चा होते, ती फ्रान्समधल्या पायरिनिज पर्वतरांगांतून वाहणा-या प्रेडा नदीकाठी! प्रेम आणि आयुष्य, यांचं मर्म या प्रवासात कसं उलगडत जातं, याचा नितांतसुंदर अनुभव हे पुस्तक देतं. प्रेमातलं सुख पचवण्याची आणि प्रेमभंगाचं दु:ख भोगण्याची ताकद कशी मिळवायची, याबद्दल पाऊलोनं जे काही काव्यात्म स्वरूपात सांगितलं आहे, ते अफलातून आहे.

प्रेमाची उपपत्ती, अर्थ आणि परिणाम, याबाबत इथे चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. त्यासाठी हे पुस्तक मुळातूनच वाचायला हवं. स्व-शोधनाचा दुसरा-तिसरा असा कुठलाही मार्ग नसून तो फक्त प्रेम आहे, हा आग्रही विचार पाऊलो मांडतो. प्रेमात पूर्ण शरणागती आवश्यक असते. एकदा प्रेमाला शरण गेलं की, मनात निर्मम भाव उत्पन्न होतो. अशा निर्ममपणातूनच आसक्ती आणि द्वेष या मुख्य मानवी विकारांपासून मुक्तता मिळते आणि आपल्या हृदयात आतापर्यंत दबून गेलेला आत्म्याचा सच्चा आवाज ऐकू येऊ लागतो. पाऊलोच्या पुस्तकाचं आशयसूत्र हे आहे. प्राथमिक अवस्थेतल्या निसर्गपूजकांपासून ख्रिश्चनांपर्यंतच्या सर्व धर्मीयांमध्ये प्राचीन काळापासून स्त्रीलादेखील ईश्वराचं मूर्तस्वरूप मानलं जात होतं. पण, कालौघात तिच्याकडे दुर्लक्ष होत गेलं. पाऊलोनं बाय द रिव्हर प्रेडा..मध्ये स्त्रीतल्या देवत्वाचं महत्त्व पुन्हा अधोरेखित केलं आहे. पाऊलोच्या सर्व पुस्तकांत चमत्कारांचं स्तोम फार आढळतं. तसं त्याला तार्किकतेला आव्हान देणा-या मेटाफिजिकलआणि सुपरनॅचरलगोष्टींमध्ये रस असणं स्वाभाविक आहे. कारण, तो स्वत:ला साक्षात्कारी पुरुष समजतो. भयंकर अस्वस्थतेतून हिप्पी कल्चरकडे वळालेला आणि अंमली पदार्थाच्या तावडीत सापडलेला पाऊलो या साऱ्या दिव्यातून बाहेर पडला, तो या तथाकथित साक्षात्काराच्या अनुभूतीनंतर! तोपर्यंत त्यानं जगलेलं आयुष्यच इतकं वादळी आणि अनुभवांच्या दृष्टीने रसरशीत होतं की, आतापर्यंत या अनुभवांवर त्याच्याकडून दीड डझन पुस्तकं लिहिली गेली. आयुष्याच्या उमेदीच्या काळात झालेली त्याच्या मनाची तडफड वाचकांना अजूनही प्रचंड अस्वस्थ करून सोडते. त्यामुळेच दरवर्षी प्रसिद्ध होणा-या बेस्ट सेलरपुस्तकांच्या यादीत पाऊलोची किमान आठ पुस्तकं तरी असतातच.