Thursday, July 28, 2011

झापडबंद महानगरी जाणिवा


     महाराष्ट्राच्या साहित्यिक-सांस्कृतिक चळवळीत ग्रामीण साहित्याला सुगीचे दिवस आले असताना दुसरीकडे महानगरी संवेदनांचे लेखक हरवले असावेत की काय, अशी अवस्था निर्माण झाली आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात झोकून देत मुक्त अर्थव्यवस्थेचा अवलंब केल्यानंतर बदललेल्या आर्थिक हितसंबंधांनी शेतकरीवर्गाची उत्तरोत्तर परवड कशी होत गेली, त्याचे प्रभावी रेखाटन अलीकडील काळात सदानंद देशमुखांपासून आसाराम लोमटे- आनंद विंगकरांपर्यंतच्या लेखकांनी कमालीच्या संवेदनशीलतेने केले आहे. गावगाड्याच्या परिघात कष्टी होत चाललेले सामान्य माणसाचे जिणे त्यांच्या कथा-कादंब-यांचा आस्थेचा विषय बनताना दुसरीकडे महानगरी वाचकवर्ग त्याच्या जगण्याशी सम साधेल अशा साहित्यापासून अद्यापही वंचित आहे. महानगरी जाणिवेच्या सकस साहित्याची निर्मिती थंडावल्याने होणारी बौद्धिक उपासमार कशाने भरून काढायची, हा या वाचकांसमोर पडलेला मोठाच प्रश्न आहे.

        महानगरी साहित्यात प्रकट झालेले व्यक्तिगत अनुभव समूहाची अभिव्यक्ती प्रकट व्यक्त करण्यात कमी पडतात, इतक्या पराकोटीच्या आत्मकेंद्रिततेचा अनुभव हे साहित्य वाचताना येतो. १९९३मध्ये मुंबईत बाँबस्फोट झाले. पाठोपाठ उसळलेल्या जातीय दंगलींनी मुंबई शहर भाजून निघाले. २००३ मध्ये पुन्हा मुंबईने बॉम्बस्फोट अनुभवले. २००५मध्ये मिठी नदीला आलेल्या पुराने मुंबई जलमय झाली. २००६मध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटांनी मुंबई हादरली. २००८च्या दहशतवादी हल्ल्याने केवळ मुंबईच नव्हे, अवघा देश हादरून गेला. काही अंशी अस्मानी आणि काही ब-याचशा सुलतानी अशा या संकटामुळे समाजमन अक्षरश: ढवळून निघाले. बॉम्बस्फोट असोत अथवा अतिवृष्टी असो, संकटे मानवनिर्मित असोत वा नैसर्गिक... कवितेचा अपवाद वगळला तर यापैकी एकही घटना कथा-कादंबरीचा विषय होऊ शकलेली नाही.

         ९३च्या बॉम्बस्फोटांना तर तब्बल १८ वर्षे उलटून गेली आहेत. तेव्हा एकाच वेळी दिसलेले माणसाचे रौद्रभीषण आणि कमालीचे केविलवाणे   रूप हा कादंबरीविषय का बनू शकत नाही? त्या वेळचा मनुष्यसंहार आणि मानवतेचे दर्शन हा कादंबरीकाराच्या आस्थेचा विषय का बनू शकत नाही? इतकी झापडबंद आत्मकेंद्रितता या साहित्यिकांमध्ये कशामुळे आली असावी? की वेगवान जगामुळे आसपास घटणा-या घटना-प्रसंगांचे आकलन होण्यास आपले साहित्यिक कमी पडताहेतखरे तर जागतिकीकरणाने पुरस्कार केलेल्या अवाजवी व्यक्तिस्तोमातून ते उद्भवलेले आहे. स्वत:ला रोमँटिक म्हणवून घेणारे नवे महानगरी जाणिवांचे साहित्यिक येथील समाजव्यवहारांपासून कमालीचे फटकून असल्याचेही जाणवत आहे. कलेतील प्रयोगशीलता जपण्याच्या नावाखाली समष्टीशी बांधिलकी तोडून टाकण्याचा प्रकार त्यांच्याकडून होतो आहे.

     महानगरांचा पोत बहुरंगी-बहुढंगी असतो. एकाच प्रतलात अनेक सामाजिक वास्तवं इथे नांदत असतात. अशा महानगरी जीवनवास्तवाचे लख्ख प्रतिबिंब कादंबरीच्या कॅन्व्हासवर उमटायचे झाल्यास लेखकाने येथील सर्वसामान्यांच्या जीवनव्यवहारांविषयी कळकळ दाखवणे आणि सजग असणेही गरजेचे आहे. येथील बहुसांस्कृतिकतेच्या मखमली आवरणाखालून वाहणा-या बहुआयामी आणि तितक्याच गुंतागुंतीच्या सामाजिक प्रवाहांचा आणि अंतर्विरोधांचा शोध घेणे व त्यांची संगती लावणे, हे मोठेच जिकिरीचे काम आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु, साहित्यिक म्हणून हे आव्हान यांच्यापैकी कुणीतरी पेलायला नको का, हाच खरा प्रश्न आहे.

एकीकडे महानगरांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्माण होत नाही, अशी ओरड करताना दुसरीकडे वाचक म्हणून आपली संवेदनशीलता कमी तर होत नाही ना, याचादेखील अंतर्मुख होऊन विचार या क्षणी झाला पाहिजे. कारण, आधुनिकतेचे पुरस्कर्ते असणारे आपण महानगरी वाचक अभिव्यक्तीसाठी मराठीचा किती प्रमाणात वापर करतो, याचादेखील विचार केला पाहिजे. केवळ सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून सार्वजनिक व्यवहारांत आपण इंग्लिश बोलणार असू, तर साहित्यिकांकडून सकस लेखननिर्मितीची अपेक्षा कुठल्या तोंडाने करणार? कारण, साहित्यिकसुद्धा त्याच समाजव्यवस्थेतून तयार होत असतात.

ख्रिस्तोफर कॉडवेलने आपल्या इल्युजन अँड रिअ‍ॅलिटीया जगप्रसिद्घ ग्रंथात म्हंटले आहे की, ‘मीम्हणून वावरणा-या कलावंतामध्ये सामाजिक विश्वाने घडवलेली एक विशिष्ट जाणीव असते. कलावंत म्हणून त्या मीला कलात्मक जाणिवेचे महत्त्व वाटते. त्या जाणिवेमध्ये मला जाणवलेल्या माझ्यावर परिणाम करणा-या सर्व कलांचे भान असते. त्याच भावनिक व्यवस्थेतून माझ्यापुढे एक जागरूक विषय उभा राहतो.माझे अनुभव मात्र त्या जाणिवेस विसंवादी असतात. म्हणजेच साहित्याच्या सामाजिक विश्वात न लाभलेला असा एक नवा व्यक्तिगत अनुभव मला येतो. म्हणून मला आत्मप्रकटीकरण करावेसे वाटते. त्यात माझा खासगी अनुभव अशा पद्धतीने व्यक्त होतो की, तो कलेच्या सामाजिक विश्वात अंतर्भूत होऊन त्याला कलाकृतीचे स्वरूप प्राप्त होते. अस्तित्वात असलेले कलेचे जग आणि जीवनव्यवहारातील माझा अनुभव यांच्या समन्वयातून ही गोष्ट साकारते.

        आताच्या महानगरी साहित्यावर नजर फिरवली असता लेखकांचे व्यक्तिगत अनुभव हे इतके व्यक्तिगत असतात की, वाचक म्हणून आपण त्या लेखकाच्या अनुभवांशी जोडूनच घेऊ शकत नाही. इतके ते दूरचे आणि परके वाटतात. मराठी साहित्यातील म्हटल्या तर या उणिवा. त्याची दखल आता नाही तर कधी घ्यायची?
...
'दिव्य मराठी'च्या रविवार पुरवणी 'रसिक'मधील लेख 

Sunday, July 24, 2011

लव्ह ट्वेंटी ट्वेंटी : भाग ३


भांडणं जितकी अधिक, तितकीच प्रेमाची खुमारीही जास्त वाढते, असं या क्षेत्रातले जाणकार महानुभाव सांगतात. प्रेम मोजण्यासाठी भांडणांचाच निकष लावायचा झाल्यास आमच्या प्रेमानं केव्हाच हिमालयाची उंची गाठली आहे, यावर कधी नव्हे ते आम्हा दोघांचंही एकमत होईल. अर्थात ती उंची वाढवण्यात सिंहाचा वाटा माझाच आहे. कारण, इतर गोष्टींप्रमाणेच याही बाबतीत मी पूर्णपणे अमेरिकावादी आहे. अमेरिकेप्रमाणेच मलाही भांडण करायला कारण लागत नाही.
भांडण हे एककल्ली संतापाचंच अपत्य असतं. पण, हे समजूनही मी त्याला आवर घालण्यात यशस्वी होत नाही. स्वतःचं बालिशपण जपण्याची आणि संताप व्यक्त करण्याची हक्काची जागा म्हणजे प्रेयसी असते, यावर माझा ठाम विश्वास आहे. तिनेही या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही.
    मला पडणा-या प्रश्नांचं मूर्त रुप म्हणजे माझा संताप होय. म्हणजे त्यासाठी मी स्वतःलाच जबाबदार मानून काहीएक उपाय केला पाहिजे. तो कोणावरही काढून उपयोगाचा नाही, हे मला कळतं. स्वतःला शहाणीसुरती समजणारी माणसं असं वागत नाहीत, हेदेखील मला माहिती आहे. पण, माझ्या संतापाचा दरारा इतका जबरदस्त आहे की, त्याला घाबरून शहाणपण मागच्या दारानं पोबारा करतं. हे नेहमीच होतं.
    घरचे, दारचे, ऑफिसचे... या सगळ्यांनी डोक्यात घुसडलेला संताप गर्लफ्रेंडवर काढणं, हे काही कार्यकारणभावाचं चपखल उदाहरण असू शकत नाही. मग ते बालिशच म्हणायला हवं ना!
   उर्वरित जगाच्या नजरेत स्वतःची संयमी इमेज जपताना माझ्या संतापाचं एकमेव आणि सॉफ्ट टार्गेट तीच असते. मग यालाही बालसुलभ मूर्खपणा  म्हणणार नाही तर काय ? ते कसं असतं ना... एकीकडे जगाकडून तुम्हाला तुमच्या दिखाऊ शांतपणाचं कौतुकही करवून घ्यायचं असतं नि दुसरीकडे रागीष्टपणाच्या बाबतीत आपण विश्वामित्र, जमदग्नी आणि दुर्वासाच्याच भावकीतले आहोत, हेही दाखवायचं नसतं.  मग रागविसर्जनासाठी हमखास भरवशाची जागा ती कोणती ? नक्कीच प्रेयसी. म्हणजे इतरांच्या मैत्रिणींबाबत मला माहिती असायचं कारण नाही. पण, माझी बुवा तशी आहे. अर्थात तीदेखील संतापी आहे. पण, तिच्या लेखी तिच्या संतापाला प्रायोरिटी माझ्या संतापानंतर आहे. त्यामुळं माझा कोपीष्टपणा सहजच खपून जातो. रागाचं महत्त्व केव्हा असतं ? जेव्हा तो झेलायला कुणीतरी तयार असतो. नाही तर ऊठसूठ चिडणा-यांची काय कमतरता आहे का जगात ? त्यांच्या रागाला कोण हिंग लावून विचारतो.
 तिच्याकडून समजूत काढून घेणं मला फार आवडतं. ही फार आनंददायक प्रक्रिया असते. भोकाड पसरलेल्या लहान मुलाला चॉकलेट दाखवूनअगदी नाहीच दाद दिली तर परीराणीच्या गोष्टी सांगून उगी करावं ना तसं असतं तिचं समजावणं. बहुतेक वेळा तिच्या उत्तरांनी अथवा सांत्वनाने माझं समाधान होतं. तिच्या गाडीच्या डिकीत ठेवलेल्या गुलाबजामांसोबत एक डबा उत्तरांचाही असतो की काय, अशी मला दाट शंका आहे. शिवाय माझ्या तोंडात गुलाबजामचा घास भरवताना, शॉनंय ना माझ्झं बाळ... माझ्झं पिल्लू... अशा प्रकारातलं तिचं माझ्या संतापावर बर्फ फिरवणं असतं. एक अनुभव गारेगार. मनःपूत आनंददायक. असं वाटतं, ते अनुभवण्यासाठी सारखं-सारखं संतापावं. पण, कधीकधी तिच्याही सहनशीलतेचा कडेलोट होतो. आता झाला तसा.
    आमच्या ब-याचशा संध्याकाळी या तलावाच्या काठावर जातात. माणसांनी गजबजलेल्या या शहरात असूनही स्वतःच्या एकांताचा आब राखून असलेला असा तो तलाव आहे. दुपारी एक बाष्कळ करण जोहरटाइप हिंदी पिक्चर पाहून आलो होतो. मेरे मरनें के बाद तुम दुसरी शादी करना…” असं पिक्चर संपायला अर्धा तास बाकी असताना हिरो हिरोईनला सांगतो. कॅन्सरसदृश आजार असतो त्याला. त्यानंतर प्रेमाच्या उदात्ततेबद्दल लोकांना डोस पाजत तो आणि पिक्चर एकत्रच तिरडीवर जातात. सुतकी चेह-यानं प्रेक्षक थिएटरबाहेर पडतात.
     पण, दोन प्रेमीजीवांपैकी एक जण असा स्वर्गलोकी प्रयाण करता झाला, तर पृथ्वीतलावर उरलेल्या दुस-या व्यक्तीच्या पुढील आयुष्य कंठण्याच्या शक्यता नेमक्या काय नि कशा असाव्यात, याची पुसटशीही कल्पना न देता पिक्चर संपवला दिग्दर्शकानं. डायलॉगबाजीचाच निव्वळ भडिमार होता त्याच्यात. ज्या थीमवर तुमचा चित्रपट बेतलेला आहे, त्याबद्दल एक अवाक्षरही न काढता खुशाल पडदा पाडतात ही लोकं. म्हणूनच, ब-याचदा आख्ख्या पिक्चरऐवजी असलाच एखादा नफ्फड डायलॉग राहतो लक्षात. तो डोक्याला खुराक पुरवतो आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी.
    तरी मी पिक्चर सुरू झाल्यानंतर देवाचे आभारच मानले होते. कारण, तो हॉरर मूव्ही नव्हता. ती हॉररपटांची फॅन आहे. तसं मीही तिला त्यावेळी कंपनी देतो. पण, डोळे मिटून. पिक्चर संपेपर्यंत अगदी नकळत माझ्या हातांची पाचही बोटं तिच्या हाताला घट्ट बिलगून असतात. पिक्चर संपतो, तेव्हाच हातांचे घामेजलेले तळवे कोरडे व्हायला सुरुवात होते. उघड्या डोळ्यांनी भुताखेतांचे प्रताप पाहणं, माझ्यासारख्या देवगणातल्या व्यक्तीला मानवत नाही. हॉररपट आवडणा-यांचा गण राक्षस असतो बहुधा.
    संध्याकाळ व्हायला वेळ होता थोडासा. तोपर्यंत सूर्याची किरणं तलावाच्या पाण्यावर चमचमती कशिदाकारी गुंफण्यात एकतानतेनं रंगली होती. वारा सळसळायचा, तेव्हा सूर्यानं विणत आणलेलं ते चमकदार वस्त्रही लाटा-लाटांनी तळपून उठायचं. हिच्या अंगावर तर ते आणखी उजळून दिसेल.
 हळूहळू तलावाच्या शुभ्र पाण्यात संध्याकाळचा करडा रंग मिसळायला सुरुवात झाली. वस्त्र विणण्याचं काम नेटानं पूर्ण करून सूर्य समोरच्या बिल्डिंगआड अस्ताला गेला. त्यामुळं आता कोणी त्या पाण्याकडं पाहिलं असतं, तर त्याला तलावाच्या खोलीचा अंदाज आला नसता. मघापर्यंत बदकं तलावाच्या मध्यभागी घोळका करून दंगा करत होती. आता एक-एक करून ती पायांनी पाणी मागं लोटत काठाकडं परतू लागली होती. पाच फूट अंतरावर असतील, तेव्हा पाण्यात वल्हं मारणारे त्यांचे गुलाबी पंजे दिसायला लागले. आम्ही दोघंही शांतपणे त्यांची लगबग पाहत काठावरच्या हिरवळीवर बसून होतो. त्या शांततेचा भंग करण्याचं महापातक मी केलंच.
पुन्हा मी तो डायलॉग उच्चारला. पिक्चर संपल्यापासून बहुधा दहाव्यांदा तरी असेल. ती त्यामुळंच संतापली होती. पण, आतापर्यंत तरी ती संयम बाळगण्यात यशस्वी ठरली होती. ती रागावली की, तिचा चेहरा विचित्र गोड दिसतो. टोमॅटो सूपसारखा. टोमॅटो सूप लालच असतं. पण, काही ठिकाणी त्याचा रंग जर्दगडद दिसतो. तर काही ठिकाणी शांतफिकट. तिच्या चेह-यावरचा एकजिनसी रक्तिमा रागावल्यानंतर असाच विखुरलेला दिसतो. तिच्या या अवताराला मी कोपामुद्रा असं म्हणतो. तसाच आताही तिचा चेहरा लाल झाला होता.    
प्रश्न पडला की, उत्तर सापडेपर्यंत मला स्वस्थता लाभत नाही. त्यातून त्या पिक्चरमधला तो डायलॉग वाळवीप्रमाणं मेंदू पोखरून थेट आतवर पोहोचला होता. अचानक आलेल्या भूकंपानं सातमजली स्वप्न क्षणार्धात भुईसपाट व्हावं, तसा असतो का हा अकाली मृत्यूचा धक्का ? ज्या व्यक्तीसोबत वाट चालण्यासाठी पावलं उचलावीत, तीच अशी अचानक पुढे निघून जावी आपल्याला पूर्ण रस्ताभर पोरकं करण्यासाठी ? कुठल्या जातकुळीतलं असतं ते दुःख ? की अशा वेळी काही प्लॅन बी ठरवायचा असतो ? की आणखी काही विचार करायचा असतो ? साराच गोंधळ.
.
.
.
उत्तर तिलाही सापडलं नव्हतं, हे तर तिच्या संतापावरून स्पष्टच जाणवत होतं.
.
.
.
स्वतःच्या डोळ्यांतून ओघळणा-या अश्रूंकडे दुर्लक्ष करत तिनं मला आवेगानं पोटाशी कवटाळलं. अदृष्य शक्तीनं फेकलेल्या जाळ्यात अडकण्यापासून मला वाचवण्याची धडपड करत असल्यासारखं होतं तिचं कवटाळणं. संरक्षणाची हमी देणा-या शक्तिकवचाप्रमाणं.

Sunday, July 17, 2011

चाल चवचाल ?

 
जुलैच्या अखेरच्या पंधरवड्यात भारतातल्या मुंबई आणि दिल्लीसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरांतल्या रस्त्यांना न भूतो असा स्लटवॉकपाहायला मिळणार आहे. अर्थात, विथ इट्स ओन देसी व्हर्जन. संपूर्णत: पाश्चात्त्य स्त्रीवादी चळवळीचं अपत्य असलेल्या स्लटवॉकचं मुंबईतलं नाव असेल सिटी बजाओ’, तर दिल्लीतलं बेशरमी मोर्चा’. ‘स्लटवॉकच्या आयोजनकर्त्यांना त्याचं असं देशीकरण करायची पश्चातबुद्धी झाली, हे आपल्या देशातल्या सामाजिक चळवळींचं सुदैवच म्हणायला हवं. 

ढोबळमानाने विचार केला तर जगातल्या स्त्रीजातीला छळणारे प्रश्न सारखेच असल्याचे दिसतील; पण खोलात गेल्यास, भारतीय जात-वर्गव्यवस्थेच्या उतरंडीत पिचलेल्या स्त्रीच्या अडचणी उर्वरित जागतिक स्त्रीसमाजाच्या तुलनेत काही प्रमाणात वेगळ्या आहेत. भारतात होत असलेल्या स्लटवॉकमधील पदयात्रेत पावले टाकण्याची संधी त्या स्त्रीला दुरान्वयानेही मिळणार नाही, हा भाग अलाहिदा. पण, आर्थिक प्रगतीतून उच्च सामाजिक स्तर प्राप्त केलेल्या आणि स्वत:च्या अस्तित्वभानाविषयी जागृत झालेल्या महानगरी स्त्रीवर्गाने पुढारपण घेत पुरुषप्रधान मानसिकतेविरुद्ध बिगुल फुंकून लढाईची सुरुवात केली, ही आनंदाची बाब आहे.

स्लटवॉकच्या माध्यमातून पुरुषी मानसिकतेविरुद्ध उघड बंडखोरीचा पवित्रा आपण का घेतला आहे, हे भारतीय समाजमनाला समजावून द्यायचे असेल, तर त्या आंदोलनाच्या नावाचे भारतीयीकरण आवश्यक होते. एक तर, ‘स्लटहा शब्द एका फारच मर्यादित अशा सामाजिक-सांस्कृतिक वर्तुळात वापरण्यात येतो. शहरी उच्चभ्रू असा तो वर्ग आहे. तसेच, त्या शब्दाचा आविष्कारच मुळातून अमेरिकन सांस्कृतिक अभिसरणाचा परिपाक आहे. तो जसाच्या तसा भारतीय संदर्भात वापरणे कसे शक्य आहे? त्याउलट स्लटसाठी भारतीय प्रतिशब्द वापरला, तर समाजातील मोठय़ा लोकसंख्येला आंदोलनाचा उद्देश लक्षात येईल आणि आंदोलनाचे इप्सित साध्य होईल, हा विचार आयोजकांनी केला असावा. मग त्याचं नाव माल चालमोर्चा असं करण्याचं ठरलं. आपल्याकडे मालहा शब्द स्त्रीच्या बाबतीत निंदाव्यंजक अर्थानं वापरला जातो. तसेच, त्या शब्दाने स्त्रीचा थेट संबंध क्रयवस्तूशी जोडला जातो. या कारणामुळे त्याही नावापुढे फुली मारण्यात आली. शेवटी मुंबईत सिटी बजाओआणि दिल्लीत बेशरमी मोर्चाया नावानं हे मोर्चे काढण्याचं संमत झालं. आपल्याकडे शिटी हा खास पुरुषी कर्तृत्वाचा भाग मानला जातो. या महिनाअखेरीस त्या मुंबईतल्या स्त्रियांच्या तोंडून निघतील. या शिट्यांतून निघणार्‍या आवाजाच्या कंपनांनी पुरुषी मेंदूंमध्ये किमान प्रमाणात तरी संवेदनालहरी निर्माण व्हाव्यात.

या आंदोलनाकडे केवळ एका विशिष्ट सुस्थित आणि सुसंपन्न वर्गातील महिलांचं आंदोलन म्हणून पाहिले जात असले, तरी त्यादेखील सर्वसमावेशक समाजाचाच एक भाग आहेत, हे नाकारून कसे चालेल? स्त्रियांनी घातलेल्या मिनी स्कर्टवरून त्यांची तसली’ (‘तसलीम्हणजे स्लट’. ‘स्लटया शब्दाचा प्रचलित अर्थ वेश्या म्हणून घेतला जात असला, तरी त्याचा मूळ अर्थ अनेक पुरुष जोडीदार असणारी स्त्री अथवा अव्यवस्थित राहणारीअसा आहे. त्यात तिची इच्छा हा घटक महत्त्वाचा मानला जातो.) म्हणून संभावना करणार्‍या आणि त्यांच्या उघड्या मांड्या आपल्यासाठी खुलं निमंत्रण असल्याचं समजणार्‍यांमध्ये शहरी जडणघडणीतल्या पुरुषांचंच प्रमाण लक्षणीय आहे. इतरांची तर बातच सोडून द्या. केवळ अंगप्रदर्शन करणारे तोकडे कपडे घातल्याने स्त्रियांवर बलात्कार होतात, या कुणा कॅनेडियन पोलिस अधिकार्‍याच्या वक्तव्यामुळे जगभरात स्लटवॉकची चळवळ सुरू झाली आहे. त्याचे हे ढोबळ विधान विकृत पुरुषी मानसिकतेने लडबडलेले आणि तितकेच मूर्खपणाचेही आहे. दुर्दैवाने, बहुतांश भारतीय पुरुष या बाबतीत त्या पोलिस अधिकार्‍याचेच भाऊबंद आहेत. चार वर्षांची चिमुरडी असो अथवा पन्नाशीची पोक्त महिला.. बलात्कार करणारे त्यांचे कपडे कसे आहेत, ते पाहत नाहीत. बळजबरीपूर्वक हस्तगत केल्या जाणार्‍या कुठल्याही गोष्टीबाबत वरचढपणा अथवा सत्तेचा दर्प जाणवतो. बलात्कारांचेही तसेच असते. लैंगिक व्यवहारांबाबत काय नैतिक आणि काय अनैतिक, याची चर्चा करण्याची ही जागा नाही. पण, असे व्यवहार करताना परस्परसहमती हा घटक त्यात अनुस्यूत असावा की नाही? की एरवी अप्राप्य वाटणार्‍या गोष्टी थेट बलपूर्वक हस्तगत करायच्या? लैंगिक भावना ही मानवप्राण्याच्या सहजप्रेरणांपैकी एक आहे. त्यामुळे निकोप लैंगिक संबंधांचा पुरस्कार करण्याऐवजी आणि स्त्रीला समतेची वागणूक देण्याची भाषा बोलण्याऐवजी हे कर्मठ आणि सनातनी वृत्तीचे पाखंड बायकांच्या कपड्यांवर का बंधने घालत आहेत? तंग कपड्यांतल्या स्त्रियांनी आत्मप्रतिष्ठा गहाण टाकलेली असते, हा प्रचार कोण करतं आहे? अमुक कपड्यांनी तुमचा गळा जरा जास्तच दिसतो, असा आक्षेप स्त्रियांवर घेणार्‍या मंडळींच्या नजरेला वरची चार बटनं व्हीआकारात उघडी टाकून आपल्या मस्क्युलॅनिटीचं प्रदर्शन करणारा पुरुष कसा खटकत नाही? नखशिखांत साडीत लपेटलेली आणि पेपेची लो-वेस्ट जीन्स घातलेली, या दोहोंमध्ये सेक्स अपीलकुणाचं हे कसं आणि कुठल्या निकषांवर ठरवलं जातं ? ते कोण ठरवतं ? या प्रश्नांची उत्तरं पुरुषी वर्चस्ववादी मानसिकतेत दडलेली आहेत.
..........