Tuesday, December 20, 2011

सातारा ! एक कंदी गाव

      काही गावांचा गोडवा तुमच्या मनात कायम घर करून असतो. तिथल्या आठवणीही मिठास असतात. तुम्ही त्या गावाच्या प्रेमात असता. इतरांना वावगी वाटणारी त्या गावाची एकही गोष्ट तुम्हाला खटकत नाही. कुणी सांगितलं की, ह्या गावात पाणी दिवसाआड येतं. तर तुम्ही म्हणता की, त्यात काय! तरीही भाग्यवानच आहात ! अदिस अबाबा आणि मुम्बासाच्या लोकांना तर आठवड्यातून एकदाच पाणी पहायला मिळतं. कुणी नाकाला रुमाल लावून म्हणाला की, ही उघड्यावरची गटारं आणि डुकरं फार त्रासदायक आहेत हो. तर तुम्ही सांगावं की, मुंबईत तर नाल्यांवर झोपड्या उभ्या राहतात.  कुणी कुरकुरला की, इथले रिक्षावाले भामटे आहेत. फार पैसे उकळतात. तर तुम्ही उत्तरता की, त्यात काय! दिल्लीतले रिक्षावाले तर आख्खा माणूसच लुटून नेतात. सांगायचं तात्पर्य असं की, तुमच्या आवडत्या गावाला नावं ठेवलेली तुम्हाला बिलकुल खपत नाही. आता कुणाला गावद्वेषाची कावीळच झाली असेल, तर त्यांच्यासाठी आपली मराठी भाषा ओवीपासून शिवीपर्यंत किती लवचिक आहे हे तुम्हाला माहिती आहेच. 
 
   ज्या त्या गावाचं वेगळं माहात्म्य असतं, हे खरंच! पण, त्यांच्यातही काही गावं खरंच सुंदर असतात. म्हणजे देवाची कशी काही माणसं अगदी लाडकी असतात ना, तशीच काही गावंसुद्धा देवाची लाडकी असतात, असं वाटतं. त्या गावावर त्याने कायम कृपाछत्र धरलेलं असतं.
   अजिंक्यता-याच्या वळचणीला पाय पोटाशी घेऊन आरामात पहुडलेलं सातारादेखील देवाचं एक लाडकं गाव असावं. इसवी सनाच्या बाराव्या शतकात दुस-या भोजराजानं अजिंक्यतारा बांधून काढला. अजिंक्यता-याच्या शिसवी बुरुजांखाली सातारकरांच्या शेकडो पिढ्या सुखात नांदल्या. आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाहीच्या नाकावर टिच्चून शिवरायांनी उभे केलेले टीचभर स्वराज्य औरंगजेब जेव्हा धुळीस मिळवण्यास आला, तेव्हा महाराणी ताराऊने याच शहरात राजधानी हलवली आणि मुघलांविरूद्ध एल्गार पुकारला. पुढे शाहू आणि ताराबाईत झालेल्या वारणेच्या तहातून छत्रपतींची थोरली पाती स्थापन झाली ती इथेच. शाहूंची फर्मानं घेऊन पेशवा आणि सरदारमंडळींची घोडी खैबरपार सुसाटली ती इथूनच. अटक, पंजाब, दिल्ली, रोहिलखंड, बुंदेलखंड, गुजरात, माळवा, बंगाल, ओरिसा, बंगळूर, म्हैसूर, भागानगर ( म्हणजे आताचे हैदराबाद), जिंजी, तंजावर... जरीपटक्याच्या स्वागतार्थ नौबती झडल्या नाहीत, असा भारतातला एकही प्रांत नव्हता. मराठेशाहीच्या एका देदीप्यमान पर्वाचे आणि अस्ताचे साक्षीदार असणारे असे हे शहर. सरंजामी वातावरणाच्या खाणाखुणा अजूनही या शहरात दिसतात. ( छे.. हे फारच पॅट्रिऑटिक होतंय राव.. खरे म्हणजे, अजूनही मला आपले पोलिस आणि मिलिटरी शोषणकर्त्या फ्युडल राज्यव्यवस्थेचेच हस्तक वाटतात... जाऊ द्या. मध्ययुगातली वांगी मध्ययुगातच ठेवूयात.)
     कर्मवीर भाऊराव पाटलांनी इथेच कराडजवळच्या काले गावात १९१९मध्ये रयतचे रोपटे रुजवले. १९२४मध्ये तिचं मुख्यालय साता-यात आणलं. पिढ्यान् पिढ्या औतकाठी करत वावरात ढेकळं तुडवणा-या महाराष्ट्रातल्या बहुजन पोरांना शिक्षणाचा रस्ता दाखवण्याचं काम याच रयतने केलं. शिवरायांचं रयतकल्याणाचं ध्येय आधुनिक युगात ही संस्था अशा पद्धतीने साध्य करत आहे. लाखो मुलं या संस्थेच्या शिक्षणकेंद्रांमध्ये शिकत आहेत. रयतच्या बोधचिन्हावरचा वटवृक्ष संस्थेचा महाराष्ट्रभर वाढलेला पसारा दाखवतो. (बाप रे! लिहिण्याची ऊर्मी आतून आली की, तिला शैली, रुपबंध आणि आशयाच्या आटोपशीरतेचं बंधन उरत नाही. बहुतेक हा लेख त्याच वाटेवर आहे.)
    तर सध्यादेखील तितक्याच प्रमाणात ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या संपन्न असलेल्या सातारा शहरात आमच्या एका मित्राचे परवा लग्न होते. मुहूर्त दुपारी साडेबाराचा होता. आम्ही निशाचर आहोत. त्यामुळे लग्नाच्या दिवशी पहाटे उठून साता-याची एसटी पकडण्याची हिंमत कुणातच नव्हती. आदल्या रात्री बारा वाजता मुंबई सेंट्रलहून सुटणा-या गाडीने निघायचे ठरले. मुंबईत तेव्हा गाल हळुवारपणे हुळहुळतील, एवढीच माफक गोड थंडी पडली होती. यावरून साता-यात थंडीने कहर केला असणार, या शंकेची पाल माझ्या मेंदूत चुकचुकली. एसटी सुटण्यासाठी एक तास बाकी असताना मी रुममध्ये स्वेटर शोधू लागलो. पोलिसी कुत्र्यासारखी सगळी रुम हुंगूनही अपेक्षित ऐवज हाती लागला नाही. आमच्यापैकी दोघे स्वेटर- कानटोपी घालून थंडीच्या मुकाबल्यासाठी जय्यत तयारीनिशी सज्ज झाले. उरलेला एक माझ्यासारखाच लढाईवर निघालेला, परंतु ढाल-तलवार नसलेला शेंदाड शिपाई निघाला. स्वेटरशिवायच निघावे लागणार, या कल्पनेने आम्ही दोघेही गारठलो. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मी मोबाईलवरून गणेशअण्णाचा धावा केला. देव आणि दैव, या दोन्हींवर काही माझा विश्वास नाही. पण, गणेशअण्णावर आहे. अण्णाजीनं तत्पर कृपा केली. लगोलग त्याचा पो-या पाठवला. त्यानं दात विचकत पिशवीत पेपराच्या आत गुंडाळलेली ओल्ड मंक काढून माझ्या हातात ठेवली. बाकीच्यांनी या गोष्टीला हरकत घेतली. यामुळे कंडक्टर आपल्याला अर्ध्या वाटेतच खाली उतरवू शकतो, अशी भिती त्यांनी मला घातली. पण, रमचे औषधी गुणधर्म मी त्यांच्या गळी उतरवले. न पाहिलेल्या कंडक्टरच्या वतीने त्याच्या सद्वर्तनाची हमीही दिली. शिवाय, अजूनही माणसं रात्रीच झोपतात. त्यांचे आपल्यासारखे नसते, हे मी त्यांना पटवून दिले. अखेर कडवट तोंड करत मित्रांनी अंगावरून वारं गेल्यासारखं आपले चेहरे वाकडेतिकडे केले. या चित्रविचित्र हावभावांनाच परवानगी समजत ओल्ड मंक कोकच्या बाटलीत भरून बॅगेत टाकली. 
    एसटीतून प्रवास करायच्या कल्पनेने एक जण आधीपासूनच नाखूष होता. लब्धप्रतिष्ठीत मंडळी एसटीला लाल डब्बा म्हणून हिणवत असतात. परंतु, उपजीविकेसाठी शहरात स्थलांतर करणा-यांना आपली मुळं नेमकी कुठं रुजलेली आहेत, याची आठवण हा लाल डब्बा करून देत असतो. युरोप-अमेरिकेत रंगावरून वर्णाला आणि आपल्याकडे आडनावावरून जातीला हीन लेखण्याचा प्रकार केला जातो. एसटीला नाके मुरडणा-यांची मानसिकता याच जातकुळीतली असते. लोक सेवेबद्दल तक्रारी करायच्या सोडून एसटीच्या रंगरुपाचीच गा-हाणी गात असतात. असो.
    गाडी खंडाळ्याचा घाट चढून पुण्याकडे येऊ लागली, तशी थंडी झोंबू लागली. पण, तोपर्यंत अर्ध्या-अधिक ओल्ड मंकने आपले काम चोख बजावले होते. मळ्यात राखणीवर असलेल्या कुत्र्यासारखी ती आमच्यापासून थंडीला दूर पळवून लावत होती. तिने पोटात निर्माण केलेली ऊब शरीरभर पोहोचली, तेव्हा डोळ्यांची दारे आपोआप मिटून गेली.
     मोळाच्या ओढ्याजवळ असलेल्या शिंदे फर्निचरवाल्याने एसटी प्रवाशांच्या अभिवादनासाठी सातारा स्टँडच्या प्रवेशद्वाराजवळच फ्लेक्स बोर्ड लावला होता. त्याचे स्वागत स्वीकारून आमची गाडी आत शिरली, तेव्हा सकाळचे साडेसहा वाजले होते.
    जवळपास साडेतीन-चार वर्षांनंतर मी या गावात पाय ठेवला होता. त्या काळात मुंबईच्या बाहेर इतर राज्यांत जाणं झालं. पण, महाराष्ट्रातल्या कुठल्याच गावात मी जाऊ शकलो नव्हतो. बरं वाटलं. निरोप घेतेवेळी या शहराची जी चित्रं मनात जपून नेली होती, ती अजिबातच पुसट झाली नव्हती. चित्रे पुसट झाली की, आठवणींचे रंगही फिके होण्याची भिती असते. मग आपल्या लेखी स्थळाचंही महत्त्व उरत नाही. पण, आता तसं काही झालं नाही. जणू हे गाव माझ्या सवयीचंच होतं.
     आवरून मंगल कार्यालयात पोहोचलो. मित्राला तोंड दाखवण्याचा सोपस्कार पार पाडला. त्याने नव्या वहिनींशी ओळख करून दिली. माघारी फिरलो. पोवईनाक्यावर लाटकरांचे कंदी पेढे तोंडात कोंबले. (हे चितळ्यांप्रमाणे मुंबईत शाखा का काढत नाहीत ?) स्टँडवर आलो. सज्जनगडची एसटी पकडली. 

.
.

रात्री गडावरल्या मारुतीच्या मंदिराबाहेरच्या ओट्यावर बसून आकाशातले तारे मोजायचे होते. ढगांच्या कुटीतल्या यज्ञवेदीवर अनंतकाळापासून ठाण मांडून बसलेल्या वृद्ध सप्तर्षींना नमस्कार करायचा होता. अलिप्तपणे स्वतःपुरतंच चमकणा-या तरूण व्याधाला मुंबईला नोकरीसाठी येतोस का, असं विचारायचं होतं. कोलमडून जात असताना आधाराचा हात पुढे करणा-या एकांतातल्या क्षणांशी भांडायचे होते. समोर उरमोडी धरणाच्या आरश्यासारख्या पसरलेल्या पात्रात स्वतःचा चेहरा निरखायचा होता. मुंबईच्या अप्रतिहत प्रवाहात स्वतःला झोकून दिल्यापासून या धरणाच्या सांडव्यावरून आणि आयुष्याच्या पुलाखालून किती पाणी वाहून गेलं, त्याचा जमाखर्च मांडायचा होता...

Friday, September 30, 2011

निळे निर्माल्य !



    जेवण पचवून झोपण्याच्या तयारीत असलेली मुंबई शेवटचा ढेकर देत होती, तेव्हा दिग्विजय लॅपटॉपवर खुडबुडत होता. त्याचा डेस्क सोडला तर ऑफिसातल्या सगळ्या लाईट्स केव्हाच स्वतःला विझवून अंधारातल्या घुबडाप्रमाणं निपचित बसल्या होत्या. घरी जायच्या ओढीनं डेस्कवरल्या इतर की-बोर्डांवरच्या बोटांनाही जरा वेग आल्याचे आवाजावरून जाणवत होते. टायपून टायपून मानेला रग लागल्यानं त्यानं काही सेकंदांसाठी हातांना सुट्टी दिली. अवघडलेल्या शिरा मोकळ्या करण्यासाठी खोलवर श्वास घेत त्यानं मान डावीकडं वळवली. शिरांना ताण बसल्यासारखं जाणवलं. परत तिला लॅपटॉपच्या पुढ्यात आणून रोखून धरलेला श्वास सोडणार, तेवढ्यात शेजारी सुरू असलेल्या बांधकामावरल्या क्रेनच्या थोबाडात फिट्ट केलेला हॅलोजन ऑफिसच्या पारदर्शक निळ्या काचेला न जुमानता दिग्विजयच्या डोळ्यांत सूर्यासारखा रुतला. 

    त्या रासवट पिवळ्या उजेडानं ऑफिसातली तलम पांढरी शांतता विस्कटली. बुब्बुळांमध्ये आग पेटली. त्या भगभगीत प्रकाशानं आपले डोळे जळून कोळसे होतील की काय, अशी भिती वाटून त्यानं पापण्या मिटून घेतल्या. क्रेन वळाली, तसा हॅलोजनही तोंड फिरवून तिच्यासोबत चालता झाला. दिग्विजयनं डोळे उघडले, तेव्हा ऑफिसमधला मृदू पांढरा प्रकाश देवदूताप्रमाणं पुन्हा परतला होता. क्रेन आता थांबली होती. त्यासरशी मघाशी त्रास दिलेल्या त्या परप्रकाशी सूर्याचं परिवलनही बंद पडलं होतं.
    दिग्विजयचं काम आटपलं होतं. पण, कॉम्प्युटरच्या स्क्रीनला चिकटलेला बॉस काही हलायला मागत नव्हता. तो निघेपर्यंत बाहेर पडायला काही चान्सच नव्हता. शेजारी पाहिलं, तेव्हा मांडीवर बॅग ठेवून बसलेल्या प्रितीनं बाकीच्या सेक्शन्सकडल्या अंधाराकडं सूचक बोट केलं. घरी जाण्यासाठी बॉसकडून सामूहिक परवानगी दिग्विजयनं आणावी, अशी तिची इच्छा होती. मी काय करू शकणार बये! आमच्यापैकी कुणाचं नाही तरी तुझंच ऐकेल बॉस... पण, ओठांशी बाणासारखं आलेलं वाक्य त्यानं गिळलं आणि चेह-याची प्रत्यंचा ताणून हसल्यासारखं दाखवत मानेनंच नाही म्हणून सांगितलं. ती चडफडली. त्याला उगीचच तिच्यावर दया आली.
      काही मिनिटं तोदेखील इतरांप्रमाणंच अस्वस्थ बसून राहिला. जीन्सच्या डाव्या खिशात हुळहुळल्यासारखं झालं. गडबडीत त्यानं मोबाईल कानाला लावला.   
             “ सत्संगाला येतोस का?” दिनेशनं कानात अभंग खणकावला. त्याच्या शब्दांच्या टिप-या मेंदूपर्यंत झिणझिणत गेल्या. प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणं डोळे आपोआप समोरच्या टीव्हीकडं वळले. ब्रेकिंग न्यूजच्या पट्टीपाशी थबकले नि तोंडातून शिटणा-या अँकरला वळसा घालून ते उजव्या बाजूच्या वरच्या कोप-यात सेकंदा-सेकंदाला लुकलुकणा-या घड्याळाच्या दिशेनं लपकले. आकडे नजरेत भरवून घेतले. अकरा त्रेचाळीस. च्यायला! सकाळपासनं मरमर करून दमलोय आपण. शिवाय सत्संग म्हंटलं की तो स्वस्त आरसी पाजणार, जिचा हँगओव्हर दुस-या दिवशी दुपारपर्यंत उतरत नाही. वेश्यांवरच्या (त्याच्या भाषेत कॉलगर्ल्स) अर्ध्या-कच्च्या रिसर्चचे इन्फरन्सेस ऐकवणार. आपल्या स्कँडिनेव्हियन एनजीओची टिमकी वाजवणार. फ्रॉईड, युंग, लोवेनफेल्ड, एहरेनफेल, क्रॉली, श्नाईल्त्झर ,अर्नेस्ट जोन्स... असे जाडजूड संदर्भ फेकणार की, जांभईसाठीसुद्धा तोंड उघडता येणार नाही. कुणी वेश्येनं थेट निरुपण केलं तर ठीक आहे. पण, दिन्याचं रात्रभर चालणारं प्रवचन कोण ऐकून घेणार. तसंही तुका म्हणे शीण, होईल अनुभवावीण... अशा आशयाचं काही तरी तुकोबांनी म्हंटलंच आहे. त्यापेक्षा नक्कोच जाऊयात, असा विचार दिग्विजयनं केला.  
    टीव्हीवरला वेळेचा आकडा दिनेशच्या कानात ओतत तो म्हणाला, ही काय वेळाय का ? अजून बॉससुद्धा ऑफिसातून बाहेर पडला नाहिए… वेळेचं तू नको सांगू मला. मागच्या बुधवारी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर तुमची गँग पहाटे तीन वाजता काकड आरतीला जमा झाली होती काय ? आख्ख्या पार्कावर काळे ढग जमा झालेले पाहिले मी तुम्ही फुकलेल्या सिगारेटींच्या धुरांचे. कसला बोडक्याचा इंटलेक्च्युअल डिस्कोर्स सुरू होता रे तुमचा ? एकाला तरी तोल सांभाळून उभं राहता येत होतं का तुमच्यापैकी ?” प्रश्नासुरासारखा तो उत्तर दे, नाही तर माझ्याबरोबर येच्या पवित्र्यात पलीकडून थेट अंगावरच चाल करून आला. पार्कात काय भरीव विचारमंथन झालं, हे दिनेशला आठवडा झालं तरी सांगितलं नव्हतं. म्हणून तो चिडल्याचं दिग्विजयच्या लक्षात आलं. तो शांतपणे निघालोम्हणाला. अर्थात, मागच्या वेळची निम्मी जॅक डॅनिएल्स दिनेशकडं अजूनही शिल्लक असल्याची ट्यूब ऐन वेळी त्याच्या डोक्यात पेटली होती.
       “ काम नाहिए तर उगीच बॉससमोर शेपटी हलवत बसून राहण्यात अर्थ आहे का ?”  दिग्विजयवर तणतणत शेवटी तो म्हणाला, बच्चे ! दो घंटे से निगार बैठी हैं यहाँ पें. मिलना है  तो जल्दी से टॅक्सी पकड.” पलीकडून नाजूक बोलण्याचा आवाज ऐकू आला. शब्द कळले नाहीत. पण, आवाज परिचयाचा जाणवला. तो ऐकून दिग्विजय शाळकरी पोरासारखा धांदलला. जागेवरून तटकन उठत ओरडला, फुकणीच्या ! बाकीची लांबड लावत बसण्यापेक्षा आधी मुद्द्याचं बोलायला काय झालं होतं ?”  निगारचा गोरा-भुरा शांत सोशीक चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. निळ्या सलवार-कमीजमध्ये गुलाबासारखी डवरून आलेली निगार. ती मागल्या वेळी भेटली होती, तेव्हा किती तरी प्रश्नांनी त्याच्या मेंदूला खिळे ठोकले होते. त्यांची उत्तरं मिळवायची राहून गेली होती. आज कुठल्याही परिस्थितीत भेटायलाच हवं तिला.. मनाशी विचार करत दिग्विजयनं फोन कट केला नि बॉससमोर जाऊन उभा राहिला. सर! घाई आहे. जाऊ का ?”
           “ कुठल्या दिशेचे प्रवासी तुम्ही ?” बॉसनं फिलॉसॉफिकल फिरकी घेतली. म्हणजे ?” “ अरे! सहज आपलं जनरल नॉलेज म्हणून विचारलं. चाललायस कुठं ? अंधेरी की कुलाबा ?” “कुलाबा...बॉसचा खेळकर मूड हीच संमती असल्याचं चाणाक्षपणे लक्षात येऊन तो जाण्यासाठी वळला. पाठून भालजी पेंढारकरांच्या चित्रपटातल्या तिरकस पात्राप्रमाणं बॉसनं डायलॉग हाणला, “ लई दिसांनी तुमचं फिरंगी पाखरू आलंया वाटतं. जावा बिगीबिगी…” ह्युमन काय, वुमन डिग्निटीपण नाही याला. बायको, आई आणि बहीण सोडली की, प्रत्येक बाई याच्या दृष्टीनं पाखरू! जाऊ देत. त्याचा तरी काय दोष ? समाजात प्रत्येक संबंधाला लेबल लावल्याशिवाय भागतच नाही. निगारकडं तर साधं रेशनकार्डही नाही. बंगाली की बांग्लादेशी आहे ती. वीतभर पोटाला कुठे आखीव सीमांचं बंधन असतं. रेशनकार्ड नसलेली माणसं इथल्या व्यवस्थेत सर्वार्थानं अदखलपात्र असतात. मग अशा अस्तित्वातच नसलेल्या माणसांशी उरलेला समाज आपली बांधिलकी अशी ती मानतच नाही. पण, ही माणसं हाडामांसानिशी असतातच अवतीभोवती. अशा किती कोवळ्या गुलाबांना हे शहर चुरगाळून टाकत असेल ?
       प्रश्नांचा असह्य ठणका डोक्यात घेऊन दिग्विजय लिफ्टनं सरसरत खाली आला. गेटवर झोपाळलेल्या चेह-यानं उभारलेल्या टॅक्सीवाल्याला कुलाबाअसं जोरात ओरडून सांगितलं. टॅक्सीवाल्यानं फाटदिशी मीटर खाली घेत डोळ्यांत साकळलेली झोप तंबाखूच्या पिंकेसोबत थुंकून टाकली. वारा जास्तच माजावर आल्यामुळं टॅक्सीवाल्यानं स्वतःच्या बाजूच्या काचा वर केल्या होत्या. दोन्ही बाजूंच्या डेरेदार झाडांनी गाडी कॅडेल रोडच्या तोंडाला लागत असल्याची वर्दी दिली. चौपाटीवरून येणारी हवा इमारतींचा अडथळा चुकवून त्या काळ्या-करड्या काँक्रीटच्या रस्त्यावर स्वतःला वा-यावर सोडून दिल्यासारखी बागडत होती.
      एकुलतं गि-हाईक गवसल्याच्या भावनेतून हवेनं नखरेल होत दिग्विजयचा कान हलक्या दातांनी चावला. मधमाशीचा डंख बसल्यासारखा तो काही सेकंद शहारला. आता तिचा मुलायम हात दिग्विजयचा चेहरा कुरवाळू लागला होता.
     अस्वस्थ होत त्यानं खिशातून बेन्सन लाईटचं पाकीट काढलं. ओठांमध्ये धरलेली सिगारेट डाव्या हाताचा आडोसा करून निरांजनाप्रमाणं तेवणा-या लायटरच्या मंद आगीवर पेटवली. काही सेकंद त्यानं धूर तसाच फुफ्फुसांत घोळवला आणि उरलेला लयीत तोंडातून बाहेर सोडला. शरिरातून निघून बाहेर पडलेल्या त्या धुराचा आकार त्याला मन दगड केलेल्या रानटी पुरुषासारखा भासला. सिगारेटच्या उग्र वासानं दिग्विजयला झोंबून राहिलेली हवा हात-पाय आपटत बाजूला झाली, तेव्हा आपल्या आत्म्याला आणि शरिराला चिकटलेला सगळा किटाळ निघून गेल्यासारखं त्याला वाटलं. बरं वाटल्यासरशी त्यानं आपल्याही बाजूच्या काचा वर केल्या.  
      टॅक्सीत आरंभलेल्या होमात एकापाठोपाठ एक शिलगावलेल्या सिगारेटी फुफ्फुसांचा बळी मागत होत्या. टॅक्सीवाल्यानं शहाणं होत स्वतःच्या काचा खाली घेतल्या. पण, दिग्विजयला कशाचीच फिकीर नव्हती. अखेर धुरांच्या रथातून निगार खाली उतरली आणि दिग्विजयजवळ गेली. कितनी पिओगे आप?”, असं म्हणत त्याच्या तोंडातून सिगारेट काढून घेत पायाखाली चुरडली. ही शेवटची, असे तो म्हणणार इतक्यात आपला गोल्डन कश ओढून झाल्याचं, हातात शेवटल्या सिगारेटची केवळ बट उरल्याचं, पाकिट संपल्याचं आणि तेवढ्याशा वेळात निगार स्वप्नात येऊन गेल्याचं त्याच्या लक्षात आलं.
      दिग्विजयनं काचा खाली घेत ओलसर हवेला नाकात प्रवेश करू दिला, तेव्हा त्याला कोरड्या पडलेल्या फुफ्फुसांवर बर्फाचा गोळा फिरवल्यासारखं वाटलं.
....
बिनस्वेटराचं शहर - भाग 3





Monday, August 29, 2011

श्रावण जाशी, हर्ष मानसी !



   मुंबईत किमान दर्जाची शांततासुद्धा विकत घ्यावी लागते. आम्हा मित्रमंडळींना ती विकत घेण्यासाठी ड्रीमलँड बार हा अतिशय स्वस्त पर्याय आहे. शांतता विकणा-या मॉल्सच्या भपकेबाज गर्दीत अंग चोरून उभं राहिलेलं किराणा मालाचं दुकान असावं, तसा हा बार आहे. मनासारखा एकांत आणि शटर अगोदरच बंद झालं तरी रात्री दीडपर्यंत गप्पा मारण्याची मुभा, या दोन गोष्टींमुळे आम्ही या बारवर निहायत खूष असतो. बारचा मालक गणेशअण्णा तर आमच्या दृष्टीने संतच आहे. बिलावर नेहमीच वीस टक्के डिस्काऊंट. कधी-कधी शिर्डीहून जाऊन आलेला असला की, एक ड्रिंक मोफत देतो. अण्णाच्या पाप-पुण्याविषयीच्या कल्पना नेमक्या काय आहेत, ते मी एकदा त्याच्याकडून समजावून घेणार आहे. 

     शुक्रवारी आम्ही आणि गणेशअण्णादेखील आझाद मैदानावर अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून आलो होतो. त्याशिवाय, आम्ही फेसबुकवर अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणा-या प्रत्येक वॉलवर लाईकचं सिमेंटही थापलंय. मैदानावर उभ्या असलेल्या अनेकांच्या डोक्यावर टोप्या होत्या. पण, आमच्यापैकी कुणाचीच त्या टोप्या घालण्याची हिंमत झाली नाही. कारण, टोप्यांची किंमत आम्हाला फार जास्तच वाटली. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक चारित्र्य आणि थोडासा त्याग. अशा टोपीच्या वजनाने डोकेच दडपून जायचे. किमान गणेशअण्णाला सरकारी वेळेत बार बंद करायला लावूयात आणि मग ती टोपी घालूयात, असा विचार करून आम्ही तिथून निघालो होतो. टोपी घालायची असेल, तर सुरुवातीला एवढी माफक पात्रता तरी आम्ही मिळवायला हवी. आमच्या देशाला पहिल्याच गांधींचे विचार अजूनही पेलवत नाहिएत आणि ते समजावून देण्या-घेण्याची तसदीही कुणी दाखवत नाहिएत. इथे टोपी घातली, रस्त्यावर तासाभरापुरतं एकत्र आलं आणि फेसबुकवर लाईक केलं, की झालं. केवढं सोप्पं आंदोलन आणि केवढी सोप्पी क्रांती !
    अण्णा आणि त्यांचे मुंबई- राळेगणमधले शेलके कार्यकर्ते यांनी सरकारच्या हृदयपरिवर्तनासाठी उपोषण केलं आणि ते यशस्वी झाले. गांधीजी राज्यसंस्थेला necessary evil  म्हणायचे. सुरुवातीस राज्यसंस्थेची मदत घेऊन शोषणमुक्त आणि समतावादी समाज निर्माण केल्यावर नंतर तिची अजिबात गरज उरणार नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. कारण, आपल्या तत्त्वांवर चालणारा माणूस शासनव्यवस्थेचा पांगुळगाडा न घेण्याइतपत नक्कीच प्रगल्भ होईल, इतकी त्यांची त्या तत्त्वांवर श्रद्धा होती. आपल्यात तितके माणूसपण आले आहे, असे वाटण्याजोगी परिस्थिती आज नाही. पण, आपण किमान त्या दिशेने वाटचाल तर करू शकतो. अण्णांसारखा एक गांधीवादी न्याय्य मागण्यांसाठी सरकारला झुकवतो. आपण सारेच गांधीवादी झालो, तर सगळंच विधायक का नाही होऊ शकणार ? सरकारची गरजच उरणार नाही. मग आता नागरिक म्हणून आपण आत्मपरिक्षण करणार आहोत की नाही? भ्रष्टाचाराला विरोध आणि प्रामाणिकपणाचा आग्रह, हे एक मूल्य म्हणून समाजात रुजावं आणि रुजवावं लागतं, हे आमच्या कुणाच्या गावीच नाही. प्रेषित, महात्मा आणि अण्णा समाजसफाईचं काम करतीलच. आता घटनेच्या चौकटीत राहून आपण आपली मने खराट्याने खरवडणार आहोत की नाही, हा प्रश्न आहे.  
    आमच्यातल्या अपूर्णत्वाची जाणीव आम्हाला आहे. म्हणून ती टोपी डोक्यावर चढवण्याची हिंमत होऊ शकली नाही. साईबाबांच्या दानपेटीत हजारो रुपयांची बंडलं बिनदिक्कत टाकणा-या गणेशअण्णानं मात्र ही टोपी तितक्याच सहजतेने घातली. त्याला त्याविषयी विचारलं, तेव्हा तो हसत म्हणाला, अरे! मैं भी अण्णा हैं... दारु पिऊन पिऊन खोबणीबाहेर आलेले त्याचे बटाट्यासारखे डोळे तसेच ओढून घ्यावेत, असं वाटलं होतं. पण, आवरलं. आम्ही काय किंवा तो काय... ह्या अण्णापासून त्या अण्णांपर्यंतचा प्रवास फार मोठा आहे... जाणीव होणं महत्त्वाचं. तिथून पुढला प्रवास करणे, हे ज्याच्या-त्याच्या हातात आहे. तेदेखील असोच.
     आपल्या बारमध्ये दारू पिऊन तार लागलेल्या गि-हाईकांना आणखी उपदेशामृत पाजणे, हा गणेशअण्णाचा छंद आहे. काऊंटरसमोरच्या निमुळत्या उच्चासनावर बसून तो बेसुमार बडबडणा-या गि-हाईकांच्या जिभांना लगाम घालत ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ अशा आविर्भावात बरळत असतो. खोचकपणे का होईना, त्याला संत म्हणण्यापाठीमागचं हे आणखी एक कारण. आपल्या तोंडाचा पट्टा हा संत अजिबात उसंत न घेता चालवीत असतो. परंतु, त्याची एकट्याची संतत्वाची आभा बारला प्रकाशमान करण्यास असमर्थ ठरते. त्यामुळे रात्री उशिरा ऑफिसमधून सुटल्यानंतर आम्ही अकलेचे दिवे पाजळवत ( की उजळवत ?) धुरकट अंधाराने व्यापलेला तो बार आमच्या परीने देदीप्यमान करण्याचा प्रयत्न करत बसतो. आम्ही त्या बारमध्ये ज्या सेक्शनमध्ये बसतो, तिथं कुणाचाही आवाज ऐकू येत नाही. अर्थात त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. कारण तिथं दारुचे रेट जवळपास पाऊणपट जास्त आहेत. त्यामुळेच या सेक्शनमध्ये फारसं कुणी फिरकत नाही. इथं दारू बायका सर्व्ह करतात. या बायकांचं शरीर आणि वय पाहून त्यांना सर्रास आंटी’ म्हंटलं जातं. पण, तुम्ही त्यांच्या ओठांवरील लिपस्टीकचं गडद आवरण काढून पाहाल, तर समोर आई-काकू-मावशी उभे असल्याचाच भास होईल. इतक्या वयाच्या बायका काही नेत्रदीपक असत नाहीत. त्या ग्रँट रोड परिसरातल्या डान्स बारमध्ये (आताचे ऑर्केस्ट्रा बार) काम करणा-या मुलींएवढं कमवतही नाहीत. कारण, बार संपल्यानंतरचे व्यवहार त्या करत नाहीत. त्यांना रात्री अकराची विरार लोकल पकडायची असते. जवळपास सगळ्याच मीरा रोड-नायगाव परिसरात राहतात. घरी त्यांची मुलं वाट पाहत असतात. यांच्यापैकी खूपच कमी जणींना नवरे आहेत. पण, त्यांच्या लेखी नव-यांचे पुरुषत्व आणि अस्तित्व केवळ कपाळावर टिकली लावण्यापुरतेच आहे. त्यामुळे घरे चालवण्याचे काम या बायकांनाच करावे लागते.  
    सीमाने ग्लास मांडले. दारूही ओतून झाली. पण, आमच्याशी एक शब्दही बोलली नाही. ती अशी नाही. प्रचंड बडबडी आहे. पोरांच्या व्रात्यपणाचे किस्से, त्यांच्या शाळेच्या अडचणी आणि सासू अशी वागते वगैरे वगैरे असं बरंच काही सांगत असतं. मन्याने तिला तिच्या गप्प राहण्याचं कारण विचारलं.
.
तिनं एकच शब्द कमालीच्या कोरडेपणानं उच्चारला... श्रावण...
.
श्रावणाचा काय संबंध ? नंतर ट्यूब पेटली. श्रावणात बारमध्ये गि-हाईकं कमी येतात... या महिन्यात तिची नेहमीपेक्षा बरीच ओढाताण झाली असणार. तसा प्रत्येक महिना तिच्या दृष्टीनं परीक्षेचाच असतो. कारण, बारमध्ये होणा-या एकूण कमाईपैकी ३० टक्के हिस्सा त्यांना बारमालकाला आणि १० टक्के हिस्सा त्यांना या बारमधले काम शोधून देणा-या दलालाला द्यावा लागतो. दलालाला पैसे असेही द्यावेच लागतात. कारण, आपली जागा घ्यायला किमान हजार मुली तयार आहेत, याची जाणीव तिला असते. आपण मध्यमवर्गीय श्रावणाची मनमोहक रुपं डोळ्यांत सजवतो. तिचा श्रावण हा असा आहे. तो जितक्या लवकर जाईल, तितकं चांगलं.
दुस-या क्रांतीची हाक देऊन येऊ घातलेल्या नव्या भ्रष्टाचारविरहित समाजव्यवस्थेत तरी तिला माणूस म्हणून स्थान असणार आहे काय किंवा जर ते स्थान मिळणार असेल तर ते कशा स्वरुपाचे असेल, या प्रश्नांची उत्तरं सापडेपर्यंत आपल्याला सीमाला टीप देणं भाग आहे. केवळ तुमचा अहंकार सुखावतो, म्हणून तुम्ही हा माणुसकीचा स्वस्त आणि भंपक देखावा करता, असं कुणी म्हंटलं तरी पर्वा नाही. ठीक आहे. आज तिचं घर चालणं महत्त्वाचं.
 क्रांत्यांचे यशापयश सैद्धान्तिक आणि तात्त्विक भूमिकांवर ठरते. पण, शेक्सपीअरने हॅम्लेटमध्ये म्हणून ठेवलंय की, There are more things in heaven and earth than are dreamt of in philosophy.  स्वातंत्र्याची साठी पूर्ण झाल्यानंतरही सीमा आणि तिच्यासारख्या कोट्यवधी जनतेचं जगणं हे प्रचलित व्यवस्थेच्या परिघावरचं आहे. ते अजूनही मुख्य समाजव्यवस्थेचा भागच बनू शकलेले नाहीत. क्रांतीचं नवं तत्त्वज्ञान हे जगणं समजावून घेईल ? तोपर्यंत सीमाला आमच्यासारख्या लोकांचे ग्लास भरावे लागतील, वासनांध लोचटांचे स्पर्श सहन करावे लागतील, गणेशअण्णाच्या लक्षात येऊ नये, म्हणून काही पैसे त्याची नजर चुकवून तिला आपल्या ब्लाऊजमध्ये कोंबावे लागतील. पण, ती जगेल. जगणं तिला सोडताच येणार नाही. सर्वसमावेशक क्रांतीची वेळ येईपर्यंत ही माणसं उपाशी मरूनही चालणार नाहीत. 
...
'बिनस्वेटराचं शहर'मधील दुसरा भाग

Tuesday, August 23, 2011

अडीच दिवसांचा जागर आणि उताणी घागर


कुठल्या  ना कुठल्या प्रकारचे वाद, हे अलीकडील काळात आपल्या साहित्य संमेलनांचे व्यवच्छेदक लक्षण राहिले आहे. वादांच्या या नौबती साहित्याला चालना देण्यासाठी झडणार असतील, तर त्याला कुणाची ना असण्याचे कारण नाही. पण, साहित्यबाह्य वादाच्या धुरळ्यात पूर्ण संमेलनच झाकोळून जाण्याचे चिंतास्पद प्रकार सुरू झाले आहेत, हे लक्षण काही ठीक नाही.


     
अध्यक्षीय भाषण, कविसंमेलन आणि चार-दोन परिसंवाद वगळल्यास संमेलनाच्या मंडपात फुकाच्या फुगड्या घालण्यावाचून दुसरे काही होत नाही. ज्या मराठी संस्कृती आणि साहित्याच्या उत्थानासाठी हा कोटभर रुपयांचा अक्षरयज्ञ मांडला जातो, त्याचे फलित मिळते का, हा मुख्य प्रश्न आहे. अव्याहत चालत आलेल्या मराठी सृजनाचा प्रगट आविष्कार या अडीच दिवसांच्या संमलेनांतून होत असतो. किंबहुना, तो व्हावा अशा हेतूपोटीच ती आयोजित केली जातात. पण, हा उदात्त हेतू अजिबात साध्य होत नाही. त्यामुळे संमेलनाच्या समारोपानंतर निधी किती शिल्लक राहिला, याचा ताळेबंद जुळवण्याबरोबरच या संमेलनांनी मराठी संस्कृती आणि मराठी माणसाला काय दिले, याचाही जमाखर्चही अग्रक्रमाने मांडला जावा.

 
सांस्कृतिक पुंजी किती जमा झाली, हे पाहायला गेल्यास हिशेब तुटीचाच लागतो. त्यामुळेच अखिल भारतीय साहित्य संस्कृती महामंडळाच्या या संमेलनांशी फारकत घेत महाराष्ट्रातील इतर सामाजिक प्रवाहांनी केव्हाच आपली वेगळी चूल मांडली आहे. अनेक महत्त्वाचे ज्येष्ठ साहित्यिकही या संमेलनांकडे उपेक्षेने पाहतात. त्यांच्यापासून फटकून राहतात. तरीही, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील हा सर्वात मोठा सोहळा असतो, यात कुठलीच शंका नाही. वर्षानुवर्षे संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेवरमराठीची गळचेपी’, ‘सद्यस्थितीत मराठीपुढील आव्हानेया किंवा अशा तत्सम आशयांचे विषय असतातच. आव्हानांचे ठीक आहे. बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक वातावरणात ती वेगवेगळ्या रुपांनी उभी ठाकतच असतात. ती थोपवण्यासाठी आपण काही इतरांशी सांस्कृतिक अनाक्रमणाचा करार करून घेऊ शकत नाही. उलट, संघर्ष आणि समन्वयाच्या खडाखडीतून भाषेचे प्रवाहीपण झुळझुळत राहील. पण, पद्धतशीरपणे होणा-या भाषेच्या गळचेपीसंदर्भात आपण अजूनही ठोस भूमिका घेऊ शकलेलो नाही. मोठी शहरेच काय, तालुका पातळीवरदेखील मराठी माध्यमाच्या शाळा धडाधड बंद पडत चालल्या आहेत. मुंबई विद्यापीठात मराठीत संशोधनासाठी गेल्या दीड वर्षांत एकही पीएचडी अथवा एम. फिल.चा अर्ज दाखल झालेला नाही. उलट, तिथे हिंदी आणि गुजराती भाषांना विद्यार्थी आहेत. हीच केविलवाणी परिस्थिती पुणे आणि नागपूर विद्यापीठांतसुद्धा आहे.

एवढे भयानक संकट उभे ठाकलेले असताना त्याच्या मुकाबल्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या नावाने ठणाणा आहे. साहित्य संमेलनाच्या मंडपात पहिल्या रांगेत बसलेले राजकारणी भाषेच्या भल्यासाठी यंव करू आणि त्यंव करू, अशी भाषणबाजी करत वेळ तेवढी साजरी करून नेतात आणि नंतर हा विषय पुढील वर्षीचे संमेलन येईपर्यंत कानाआड करतात. त्यामुळे अनेक वर्षे रांगेने या एकाच विषयावर परिसंवाद घेण्याची वेळ येणे, म्हणजे परिस्थिती खरोखरच चिंतेची आहे. मराठीच्या बाबतीतील या जैसे थेपरिस्थितीत किमान पातळीवरील तरी सुधारणा व्हायला हवी होती. हे होत नाही, याचा अर्थ प्रशासक- राजकारण्यांना यासंदर्भातील खमका निर्णय घेण्यासाठी भाग पाडणारे साहित्य अथवा संस्कृतीबळ कमी आहे. त्यामुळेच राजकारण्यांची संमेलनांमध्ये लुडबूड वाढली आहे. त्यांच्याकडून संमेलनासाठी निधी मिळवल्यानंतर खांद्यावर येणा-या मिंधेपणाच्या ओझ्याखाली आयोजक-साहित्यिक दबून जातात. चतुर राजकारणी मग संपूर्ण संमेलनच आपल्या हेतूपूर्तीसाठी वेठीला धरतात. हा प्रकार थांबवला, तरच संमेलनांच्या व्यासपीठांवरून होणा-या साहित्यिकांच्या आवाहनांना ही मंडळी गंभीरपणे घेतील आणि मराठीच्या भल्याचा विचार करतील. त्यामुळे निधी उभारणीसाठी राजकारण्यांच्या दारात जाण्याऐवजी खरोखर पर्यायी व्यवस्था होणे आवश्यक आहे. भूमिका घेण्यास साहित्यिक कचरतात, हेदेखील अलीकडील संमेलनांतून दिसून आले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून महाबळेश्वर संमेलनात सारस्वतमंडळींनी डॉ. आनंद यादव यांच्या पाठिशी उभे न राहणे आणि पुण्याच्या साहित्य संमेलनात माणिकचंद गुटख्याच्या प्रायोजकत्वाला साहित्यिकांऐवजी डॉ. अभय बंग यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याकडून पहिला विरोध होणे, ही उदाहरणे बोलकी आहेत. ठाण्याच्या संमेलनाने तर साहित्यिकांच्या कळपात घुसून नथुराम गोडसेबद्दल गौरवोद्गार काढणा-या फॅसिस्ट प्रवृत्तीही पाहिल्या. आयोजकांनी केलेल्या या वात्रटपणाचे भांडवल करणे राजकीय पक्षांकडून सुरू झाल्यानंतर आपल्या साहित्यिकांमध्ये झाल्या प्रकाराच्या निषेधासाठी अहमहमिका सुरू झाली. एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याकरिता समिती स्थापन झाली असताना तिची गोडी लागावी आणि वाचनसंस्कृतीचा प्रसार व्हावा, यासाठी संमेलनांनी व्यापक पुढाकार घ्यायला हवा. अन्यथा, साहित्याचा हा घाऊक उत्सव साजरा करणा-यांपुरतेच त्याचे कवित्व मर्यादित राहील. सर्वसामान्य मराठी नागरिकांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब त्यात उमटायला हवे. समकालीन मराठी वास्तवाशी सलगी करताना त्याची नाळ भूतकाळातल्या सांस्कृतिक वारशाशीही जोडली जायला हवी. हा सोहळा भव्यदिव्य जरू असावा. मराठी माणसाला त्याचा आनंदच वाटेल. पण, त्या भव्य सोहळ्याचे छोटुकले का होईना, पण परिणामही दिसायला हवेत. त्यामुळेच आता तिस-या वर्षात पदार्पण करणा-या अवाढव्य खर्चाच्या विश्व साहित्य संमेलनाला फारशी आडकाठी कुणी घेतली नाही. त्याला हजेरी लावणा-या आमंत्रितांचे वाङ्मयीन कर्तृत्व काय, हा जरी महत्त्वाचा मुद्दा असला तरी परदेशी भूमीवर मराठीचा जागर करण्याकरिता आणि तिथे स्थायिक झालेल्या मराठी माणसांना संस्कृतीच्या मूळ प्रवाहाशी जोडून ठेवण्यासाठी हा उपक्रम स्तुत्यच आहे, यात शंका नाही. उद्या मंगळावर जीवसृष्टी आढळल्यास अथवा चंद्रावर माणसाच्या   फे-या वाढल्यास, तिथेही पहिलेवहिले अंतराळ साहित्य संमेलन आयोजन करण्यासही सर्वसामान्य मराठीजनांची काही हरकत असणार नाही. पण, या संमेलनांचे परिणाम दिसायला हवेत, इतकीच माफक अपेक्षा आहे.
...
'दिव्य मराठी'तील 'रसिक'मधील लेख